Sunday, December 9, 2012

एसटीची रंगभूमी!

महाराष्ट्रातील परिवहन मंडळाने एसटी गाडयांच्या  माध्यमातून एक अभूतपूर्व संपर्कपर्व  घडवून आणले आहे.एक सामाजिक ,राजकीय,सांस्कृतिक अभिसरण आंदोलन उभे केले आहे.याची विचारवंतानी ,लेखकांनी फारशी दखल घेतलेली आढळत नाही.आज एसटी गाडया म्हणजे जणू देहातील मज्जासंस्था वा नससंस्था बनल्या आहेत.देहातील लक्षावधी पेशी जाणिवांचे दळणवळण  घडवतात.मेंदूकडे वार्ता पुरवतात.मेंदूचे संदेश गात्राना सांगतात.देहाचे स्वास्थ्य ,अस्वास्थ्य माणसाला कळत  राहते.महाराष्ट्रातील सर्व माणूसवस्त्या बहुतांशी एसटीने जोडल्यात.माणसे एकमेकाना जोडलीत.भेटवली  आहेत.उपजीविकांच्या जागा त्याना दाखवल्या आहेत.तिकडे नेले आहे.परत आणले आहे.पाठीवरची ओझी उतरून घेतलीत.यामधून कितीतरी आनंद ,धन्यता ,दुःख -दैन्य  सांगत कथा खुल्या होतात.कथा,कादंबरी,नाटक याना कथानके उपलब्ध झालीत.
                  एसटी गाडी ही  गरिबांचे प्रवाससाधन आहे. साहजिकच एसटी रंगभूमी ही  श्रमिक ,कष्टकरी ,गरीब माणसाची लोकरंगभूमी आहे.घरोघरी भरपूर स्वास्थ्य ,खुळखुळाट असणारी माणसे आज दारी दोन किंवा तीन चारचाकी वाहने बाळगून आहेत.आरामशीर,प्रचंड भाडेदर असणारी गाडी लीलया अंगाखाली घेऊन गुबगुबीत माणसे सहली,मौजमजा करायला जातात.वातानुकूल खाजगी शयनगृहे घेऊन चक्रवर्ती अप्सरा धावतात.श्रीमंतापरी गरिबा कोठे दरवळ तो सुखवितो?कच्चीबच्ची ,थाळी-चिरगुट यांच्यासह बाहेर पडतात त्याना महाराष्ट्रात फक्त एसटी गाड्यांच  कुशीत घेतात."जेथे जेथे काबाडकष्टी -तेथे तेथे धावे एष्टी "हे गरिबाचे वाहन एसटी रंगभूमीने नित्य  न्याहाळून घेतले पाहिजे.त्यामधून स्वतःची नाटके रंगभूमीला मिळतील.विषयानुसार सादरीकरणाचे आकृतिबंध (Forms)उभे करावे लागतील.रंगभूमी नित्य परिवर्तनशील ,लवचिक असते.साहित्य स्वतःचा आकृतिबंध घेऊन जन्माला येते.यासाठी एसटी श्रमिक रंगभूमीने (तिला लोकनागर रंगभूमी असेही म्हणता येईल.)एकूण लोकरंगभूमीशी गहिरे नाते जोडावे.भावना,आवेग त्यांच्या पायाखालच्या मातीची भाषा बोलतात.पूर्वीचे वग  वाचावेत.जात्यावरच्या ओव्या ऐकाव्यात.श्रावणातल्या कथा समजून घ्याव्यात.आठवडी बाजारातील घासाघीस ऐकावी.फुक्कट चौकश्या करून चालू लागलेल्या इष्टुरफाकड्याकडे  बघत पाटीवाली म्हणते "खिशात न्हाई आना  आणि म्हने पाटील म्हना !" याने एकूण मराठी रंगभूमीचाच  कायापालट होईल.
                          आज मला एसटी नावाचा जो लोकजागर दिसतोय,ऐकायला येतोय ,वृत्तपत्रातून पोचतोय त्याच्या  आधारे मराठी नाटकासाठी दोन आग्रही विषय  मला जाणवत आहेत.
                 १. कालचक्र सतत फिरते तसे महाराष्ट्राचे  दैनंदिन जीवनचक्र एसटीच्या रूपाने सतत फिरत आहे.एसटी बंद  की  महाराष्ट्रही एकदम बंद होतो.हे ध्यानात घेऊन सारे आंदोलक महाराष्ट्र बंद पाडण्यासाठी एसटी गाड्या  प्रथम बंद पाडतात.आंदोलक लगोलग बसेस फोडतात,तोडतात ,आगी लावतात.गेल्या काही महिन्यात  किती एसटी गाड्या जाळून टाकल्यात याचा हिशेब करावा.कुचंबलेली ,भ्यालेली,होरपळलेली अश्राप  माणसे डोळ्यासमोर आणावीत.महाराष्ट्रातील ही  एक सार्वजनिक शोकांतिका वरील सर्व हिंसक घटनांच्या  संवेदनशील,सूक्ष्म ,साक्षेपी ,निःस्पृह विश्लेषणातून एसटी रंगभूमीला "अग्निदाह ","अग्निदिव्य" किंवा "दाह"नावाचे ताकदीचे नाटक देऊ शकते.
                      २.एसटी कर्मचारीही श्रमिक वर्गातील आहेत.येथे पेशा महत्त्वाचा .जात ही  महत्त्वाची नाही.
     शारीरिक कष्ट करणारा बसचालक (ड्रायव्हर )हा घटक एक उदाहरण आहे.या चालकाचे गाडी चालवणे,दुरुस्त करणे, एकाग्रचित्त राहणे,मुक्काम करणे, आसरा-अन्न,संसारापासून सतत दूर राहणे,बायकापोरांची  काळजी,मुख्य म्हणजे शारीरिक आरोग्य हा विलक्षण अस्वस्थ करणारा विषय आहे.वाहनचालकाच्या  आरोग्यविषयक समस्यांचा गंभीरपणे विचार आयुर्वेदाचार्य श्री.बालाजी तांबे यांनी नुकताच  दै.सकाळच्या आरोग्य पुरवणीमधून मांडला आहे. तर या चक्रधरांच्या संसार कथा नाटकाना आशय पुरवतील. एसटी कर्मचारी कलाकार,कथाकार म्हणूनही प्रवेश करतील.पहाडी आवाजात पोवाडे ऐकवणारा एक कंडक्टर मला मिरज-बोरीवली  बसमध्ये भेटला होता.आजरा -पंढरपूर बसमध्ये माणुसकीचा गहिवर आणून सगळ्या  प्रवाशाना सांभाळत नेणारा कंडक्टर मी देखिला .बसची पंढरी झाली.या विठोबाला आणाना  रंगभूमीवर!
                         कला क्रीडा क्षेत्रात स्पर्धा घुमू लागल्यात. तिथेही जागतिकीकरण येते आहे.जागतिक पातळीवरची सुवर्ण, रजत पदके मोह घालीत आहेत.लोककलांचे श्वास घुसमटत आहेत.मातीशी नाते तुटत आहे.आईचे दूध  बाटलीत भरले जात आहे.अखिल भारतीय मेळाव्यात आमचे डफ ,झांज,तुणतुणे शहरी सोंग बनले.स्वयं  नादब्रह्मात गुंगून जाणारा जो  खग त्याला पक्षीप्रदर्शनात कंठ फुटत नाही.नाटक हे कलाकार व प्रेक्षक यांनी एकमेकाना भेटणे आहे. लोककलांमध्ये प्रेक्षकसुद्धा रंगभूमीचा एक भाग असतात.नाटक म्हणजे आपण आपल्याला  पाहणे असते. दाखवणे  कमी असते.स्पर्धा या चुरस,द्वेष, संशय वाढवतात.तडजोडी करायला लावतात.मग नाटकावरचे लक्ष उडते.कलाकाराना चिंब होता येत नाही.म्हणून स्पर्धांच्या आहारी जाणे नको. नाटकाने स्वतःची रबरी गादीवरची कबड्डी होऊ देऊ नये!महाभारतापासून कबड्डी हा सामूहिक व्यायामप्रकार  ठरला आहे. अभिमन्यू,अर्जुन कबड्डीपटू होते.कबड्डीचा सूर हा प्राणायाम आहे.शिवरायांनी मल्लखांबासारख्या व्यायामप्रकाराना खास प्रोत्साहन दिले.मातीतली कबड्डी गावोगावी आणली.गावाच्या वेशीवर मारुतीचे देऊळ आणि गावात तालीम आली की सशक्त तरुण वर्ग गावाचे रक्षण करू शकतो.रामदासाना  ही  दृष्टी होती.कबड्डी रबरी गादीवर वर मर्यादित झाली  तर छोट्या छोट्या तालमीनी काय करावे?क्रीडा संस्थांनी महागडी रबरी  गाद्या  कोठून आणाव्यात ?कबड्डी, नाटक हे बहुजनांचे जगणे आहे.तो एक जागर आहे.या दृष्टीने  स्पर्धा जरूर  करावी पण ती स्वतःशी!आपणच आपणाला सतत मागे टाकत जावे.नाटक हा प्रयोग असतो. आवृत्ती काढणे नसते.प्रत्येक प्रयोगात नाटक कलाकारांना नव्याने कळत जाते.स्पर्धांच्या जल्लोषात नाटकांचे  हे प्रयोगपण हरवणार नाही,हे आपण जरूर जरूर पाहिले पाहिजे!
 पानवाला !

No comments:

Post a Comment