Sunday, February 17, 2013

स्त्रीची गुलामगिरी !

स्त्रियांना वाली उरला आहे का? श्री.म.माटे यांनी कळवळून लिहिलेल्या एका लेखाचे हे शीर्षक आहे.१९५०च्या मानाने लिहिलेल्या निबंधाची शाई आज पुरती  वाळून गेली असली तरी अक्षरातील आग अजून धगधगत आहे.'हाय ए नारी! अजब तेरी कहानी --आंचलमे है दूध और आंखमे है पानी 'ही  व्यथा मांडणारे मैथिलीशरण जाऊनही दशके उलटलीत.पण नारीचे भय इथले संपत नाही.वीरभोग्या वसुंधरा तशा बलात्कारभोग्या नारीच्या डोळ्यातील जलधारा !
                                             ज्या क्षणी निसर्गाने स्त्रीच्या पोटात गर्भ ठेवला ,त्या क्षणी स्त्रीची गुलामगिरी सुरू  झाली .तिची देहरचना भुरळ घालणारी ठेवली.पण,शरीर हतबल राखले.बाईवर पुरुष बलात्कार करू शकतो.पण,सूड म्हणून बाई पुरुषावर बलात्कार करू शकत नाही.निसर्गाने स्त्रीवर क्रूर अन्याय करून ठेवलाय.तिला भोगदासी बनवली.कोणत्याही अर्थाने ती कामवालीच!सभ्य ,सुसंस्कृत पुरुषमन स्त्रीच्या मनाचा  विचार करू शकते.पण अस्मिता,अभिमान,चैतन्य यांनी बहरून ,फुलून येणारे स्त्रीमन कामांध बैलाना का म्हणून उलगडावे?
                                            स्त्री आणि पुरुष यांचे परस्पराबद्दलचे अनिवार आकर्षण ही  वस्तुस्थिती आहे.जगातल्या सर्व स्त्रिया नाहीशा झाल्या तर पुरुषांनी जगायचे तरी कशासाठी? असा प्रश्न पु.भा.भावे यांनी विचारला .तो विचारताना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभावतीबाई होत्या.ग्रीक पुराणकथेनुसार प्रथम स्त्री आणि पुरुष अशी दोन भिन्न शरीरे नव्हती.एकच मोठया चेंडूच्या आकाराचा माणूस होता.चार हातांचा आणि चार पायांचा!प्रचंड ताकद होती त्याला.देवाने माणसाला मधोमध कापले ते भीतीपोटी!तेव्हापासून स्त्री आणि पुरुष हे मानवी शरीराचे दोन्ही भाग अनिवार ओढीने एक होऊ पहातात.पण,आज प्रश्न स्त्री-पुरुष आकर्षण हा नाही.पुरुषाने स्त्रीच्या जगण्याचा चोळामोळा ,चिखलगोळा करून आपल्याच माणूसपणाचा नरक बनवला आहे.नरेचि केला हीन किती नर!हा प्रश्न प्राचीन काळापासून समाजातील विचारवंताना पडलेला आहे.
                                            स्त्री-पुरुष देहरचना ,अनिवार कामप्रेरणा ,बाराही महिन्यांचा हैदोस या सर्व वास्तवामधूनच मला वाटते ,'मानवी मूल्य 'नावाची औषधी माणसाला सापडली असावी.पशू  कधीही बलात्कार करीत नाहीत.त्याना प्रणयाराधनाने संमती मिळवावीच लागते.शिवाय त्यांचे ठराविक हंगाम असतात.माणसाला मग आपल्या जगण्यावर आपणहून निर्बंध आणावेच लागतात.फाशी किंवा लिंगविच्छेदन  ही भीती तकलादू असते. जयवंत दळवी यांच्या 'पुरुष' नाटकातील अंबिका आपटे हि तडफदार बंडखोर स्त्री मात्र   आपल्यावरील बलात्काराचा सूड म्हणून गुलाबराव जाधवाचे लिंगविच्छेदन घडवून आणते.बंडा नावाच्या जहाल तरुणाची तिला साथ मिळते.तरीपण विदारक इतिहास असा आहे की माणसे सातत्याने सर्वसंहारक युद्धावर जात राहिली.युद्धकाळातच जेत्याचे सैन्य जित  राष्ट्रात घुसते तेव्हा सैनिक कुठल्याही देशाचे असोत,ते बंदुका बाजूला ठेवून विजारीची बटणे सोडू लागतात.दुसरे महायुद्ध घ्या!पराभूत झालेल्या जर्मनीतील स्त्रिया असोत,व्हिएतनाममधील अमेरिकेचे भक्ष्य ठरलेल्या स्त्रिया असोत,जपानी सैनिकांचे भीषण बलात्कार असोत सर्वत्र स्त्रिया कामवासनेच्या भयानक बळी ठरल्या आहेत.भारताच्या फाळणीवेळच्या कथा तर आजही 'जळो जळो जिणे,  लाजिरवाणे' करून  सोडतात.
                                                 जे मानवी आहे ते सारे मानीव आहे.नर आणि मादी ही   दोनच नाती निसर्ग जाणतो. आई,बाबा,भाऊ,ताई ही नाती माणसाने निर्माण केली आहेत.जगण्याला सुगंध आणला आहे.वासनांचा दर्प घालवला. देहभाव ही  प्रकृती.देहाची दादागिरी रोखण्यासाठी येतो तो देवभाव.त्याला संस्कृती म्हणायचे.संस्कृती  म्हणजे माणसानेच आपल्या जगण्याला दिलेला आकार.ज्याला कुठे आणि कसे थांबावे हे कळते  त्यालाच चालण्याचा आणि धावण्याचा अधिकार असतो.गाडी चालवायला शिकणारा जो त्याला भरधाव गाडी कोठे  कशी कचकन थांबवायची हे शिकावे लागते.हे थांबणे आपल्या आणि  इतरांच्या हिताचे असते.मनाला ब्रेक नाही ही  आजची शोकांतिका आहे. माझे 'अस्तित्व 'ही एकच  गोष्ट मला पक्की ठाऊक आहे.त्या  अस्तित्वाला कुठे न्यायचे ,कसे बदलायचे,सजवायचे हे सारे माझे मी ठरवीन.तुम्ही कोण सांगणार?नाहीतरी  सामान्य माणसाचे जगणे म्हणजे श्री.ना. पेंडसे यांच्या 'गारंबीच्या बापू' मधले व्याघ्रेश्वराचे देऊळच !आण्णा खोतांच्या प्रणयलीला व्याघ्रेश्वराला साक्ष ठेवूनच होणार.असा एक हताशपणा साहित्यामधून रोजच्या जगण्यात  उतरतो आहे.पण,माझे 'अस्तित्व'निश्चित झाल्यावर त्या अस्तित्वाच्या अर्थपूर्णतेचा विचार नको का? ही  मानवी मूल्ये सांगणारी कथा महाभारतात आहे.रामायणात आहे.श्री.म.माटे सांगतात 'स्त्रीचे अपहरण करणारा  जो त्याला देहांताचे शासन करणे हे रामायणाचे सारसर्वस्व आहे.द्रौपदीचा अवमान आणि आणि त्यासाठी  श्रीकृष्ण भगवानांनी घडवून आणलेले भारतीय युद्ध हीच महाभारताची मध्यवर्ती कल्पना आहे. महाभारताची मुख्य निशाणी  द्रौपदीच्या मानभंगाचा सूड ही आहे'.माणूस हे नुसते जगत राहणे नाही.ते सतत घडत  राहणे असते.माणूस बनण्यासाठी ती उमेदवारी असते.
                                                     आज तरुणाई भरकटत आहे.तरुणांच्या जगण्यापुढे सुंदर सुंदर स्वप्नेच नाहीत."जीवनदीप जले ऐसा --सब जगको ज्योति  मिले'हे गीत त्यांच्या कानावर पडत नाही.मोठी माणसे माती पिकवत नाही. फक्त खात राहतात.आणि रानटी कुत्री शिकार शोधण्यासाठी रानभर झुंडीने धावत राहतात.शिकार खाली पडायच्या  आधीच निम्मी खाऊन टाकतात.असेच सावज परवा दिल्लीत खाल्ले गेले.गल्लीतही वेगळे  घडणार नाही.
                                                एक अस्वस्थ करणारी बाब म्हणजे शाळा, महाविद्यालये यामधील पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी जी मराठी, इंग्रजी पाठ्यपुस्तके तयार होताहेत त्यातील मजकूर.त्याचे कठोरपणे  परीक्षण करायला हवे. धड्यांचे गाभे न्याहाळले पाहिजेत.परिवर्तनवाद, दलितवाद यांच्या नावाखाली  नको ते साहित्य मुला-मुलीपुढे येते  आहे का ते पाहणे गरजेचे आहे.मुलाच्या ठायी आईबद्दलचे सुप्त लैंगिक  आकर्षण म्हणजे इडीपस कॉम्प्लेक्स .इडीपस हा राजा होता.दलित जीवनाची या देशांतील उपेक्षा असह्य  आहे.पण एक दलित कवी लिहितो "हे भारतमाते !मी इडीपस बनून तुझ्या कुशीत शिरलो तर काय करू?"ही  कविता पाठ्यपुस्तकात आली तर कळण्याचे तारतम्य मुलाना आणि शिकवण्याची पुरती पक्वता शिक्षकांना  असेलच का? कुसुमाग्रजांनी एक कथा सांगितली .बकाल चाळीतल्या बेकार मवाल्यांनी आवारातली  एक कोंबडी चोरून कापली.शिजवली.ताटे मांडून सारे खायला बसले.तेवढ्यात उघड्या दरवाज्यातून  कोंबडीची सात पिले आत आली.चिव चिव करीत पातेल्याभोवती फिरू लागली.मवाल्यांच्या डोळ्यातही पाणी आले.ते ताटे टाकून  निघून गेले.हा साहित्यातला परतत्त्वस्पर्श  पाठ्यपुस्तकामधून घडवायला  हवा की  नको? स्वातंत्र्यदेवीची हीच विनवणी आहे --
                                  "'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी
                                                   करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळू नका!"
 पानवाला.