Friday, February 18, 2011

आई न घरी न दारी!

 आईला मारून तिचे काळीज आपल्या प्रेयसीला द्यायला धावत निघालेल्या मुलाची कथा सानेगुरुजीना सुचली.ठेच लागून खाली पडलेल्या मुलाला आईच्या काळजाने "बाळ, लागले का रे तुला?"असे काळजीने विचारलेले गुरुजीनी ऐकले.कवी यशवंतानी तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी आहे, असे सांगून कित्येकान्च्या डोळ्याला पाणी आणले.या आईचे महात्म्य किती किती प्रकारानी जगभरच्या माणसानी गावे हो?विंदा करंदीकर यानी तर सत्ययुगाच्या अखेरची एक गोष्टच कवितेत आणली.ते म्हणाले" सत्ययुगाच्या अखेरीस प्रेम आणि द्वेष यांच्यात लढाई झाली.द्वेष विजयी झाला आणि प्रेम आईच्या हृदयी लपून बसले."आई आपल्या मैत्रिणीच्या मुलालाही अंगावर पाजते.मैत्रिणीला पान्हा फुटत नाही म्हणून!राजस्थानच्या विष्णोई जमातीचे साऱ्या चराचर सृष्टीवर प्रेम.आईविना पोरक्या झालेल्या तान्ह्या हरीणपाडसाला स्तनपान देणारी विष्णोई माता मी फोटोत पाहिली.मूल घाबरले की 'बाप रे!'असे म्हणते.वेदनानी कासावीस झाले की 'आई ग!' म्हणते.बाप कथित असतो.आई एक तथ्य असते.Mother is a fact. Father is a fiction.शुक्रपेशी फलित झाली की बापाचा सम्बन्ध संपला,असे एका कथालेखकाने म्हटले आहे.गे आई,थोर तुझे उपकार!
                    यशवंतांच्या नंतर मराठीतील आई कुठे गेली?असा प्रश्न कुसुमाग्रजाना पडला.मलाही वाटू लागते की कुठे जाते ही आई काही काही वेळा?सांगली महापालिकेने नुकताच झोपड़पट्टी हटाव कार्यक्रम घाव घालत राबवला.झोपड्या उडवून लावल्या. सामान रस्त्यावर फेकले.झोपडी उध्वस्त!संतप्त! शिव्या,दगडफेक  हे समजता येते.पण एका मातेने काय करावे?तिनेआपले दोन वर्षांचे मूल कडेवरून उचलले आणि दाणदिशी दगडावर आपटले.मुलाने डोळे फिरवले .बेशुद्ध झाले.रक्ताने भिजले.सुरक्षा दलातल्या दोन तरुण स्त्रिया पुढे आल्या मुलाला उचलले.औषधपाणी केले.त्या पोलिस बाईनी तान्ह्याला उचलले.सख्ख्या आईने आपटले.मुलाची ती आई तेव्हा कुठे गेली असेल हो?प्रश्न आपण  जिवंत राहण्याचा असेल तर माणसाना कठोर व्हावे लागते हे मला ठावूक आहे. कित्येक वन्य जमाती अन्नाला महाग झाल्या,वैराण वाळवंटी वा बर्फमय प्रदेशातून कित्येक महिने हाय हाय करीत जावे लागणार म्हटले की म्हातारी माणसे बिनदिक्कत मारून टाकावी लागतात ,हे मी वाचलेआहे.पण आजच पेपरात मी वाचले की आईचे बापाशी नाते तुटले आणि कुठे तरी नवीन जमले.आई मग उठली.मोका साधला.आठ वर्षांच्या आपल्याच मुलीचे नाक आणि तोंड दाबून धरले.भल्या पहाटेच्या अंधारात ती आई लेकीचे प्रेत कुठेतरी फेकायला निघाली.लोकांना दिसली आणि फसली.
                                            सानेगुरूजी या आईला काय म्हणणार?त्याना कधी ही आई दिसलीच नव्हती.माकडीण नाकातोंडात पाणी जाऊ लागले की पिल्लाला आपल्या पायाखाली घेते. ही माणसाने लिहिलेली कथा आहे.पण परवाच डिस्कव्हरी वाहिनीवर पाहिले की मरून पडलेल्या आपल्या पिल्लाजवल माकडमाता शोकाने जाते.त्याला नाना प्रकारे तपासते.परिवाराला बोलावते .सर्वजण येतात. पिल्लाची बारीक पाहणी करतात.माता मग ज़रा दूर जाते.डोळे पंजाने पुसत राहते.दुष्काळ पडणार.खायला कमी असणार .लेकरानी जगावे म्हणून वानरी झाडाच्या ढोलीत ,धान्य आणि फळजाती चावून चावून बनवलेले लाडू    ठेवते आणि मग नरमादी दोघेही लाकडाच्या खोडावर प्राण सोडतात.मारुती चितमपल्ली यानीच हे लिहिलय!माणसाची मादी मग काही वेळा आपल्याच पिलांचा प्राण का घेते?तिचे स्तन्य पार आटून का जाते?
                                                मला सरोगेट आईबद्दल आज तरी काही म्हणायचे नाही.पण सरेंडर -Surrender-आईचे मात्र काही कळत नाहीसे होते आहे.चार दोन वर्षांच्या कराराने तरुण तरुणी एकत्र येऊ पाहत आहेत.ती नर आणि मादी म्हणून राहतात.बाप आणि आई म्हणून नाही.सोविएत रशियाचा मार्ग ठीक होता.मुले सरकारने आपले धन म्हणून वाढ करायला न्यावीत.पुढे श्रमिक शक्ति हाताशी येते.आता गर्भाशय जिथे विकायला बाजारात येते,तिथे मूल ही क्रयवस्तू बनणार हे निश्चित!पण बैंड  लावून ,भटजी बोलावून ,पंक्ती उठवून ,मंगलाष्टक म्हणून ,अग्निसाक्ष विवाह होतात.मधुचंद्र धुंद होतो.ट्याहा होते.आजोबा आजी डोळ्यातून निरांजने दाखवतात.पुढे रान सुकते.विवाहाला तडा जातो. मग भटजी जोड़ी बदलून मंत्राला आणतात.सप्तपदी पुन्हा एकदा साता जन्मांची आण घेऊन येते.आधीचे मूल मात्र कोठेतरी लांब भेदरून,गुदमरून उभे राहते.बन्सीधराला आई मिळते तर बाप परागंदा होतो.बाप जवळ तर आई नव्या संसाराला लागलेली.बन्सीधराने  आता कोठे जावे?श्री.म.माटे यानी लिहिलेली कथा आठवत राहते.परवा दोन डोहाळजेवणप्रकार पहायला मिळाले.कुठे बारशांचे थाट उडालेले ऐकले.अंगाई गीते म्हटली गेली."कित्ती क्यूट आहे बाळ!"म्हणून कौतुक करीत पोक्त मंडळी गोड तोंडाने घरी परतली.पहिल्या लग्नाची मुले भेदरल्या ,हरवल्या डोळ्यानी कुठेतरी एकाकी जगत होती.त्याना आता कोण जवळ घेणार?आईची माया त्याना कुठून मिळणार? मला खरच प्रश्न पडतो .पहिली आई दुसरे आईपण भोगायला बोहल्यावर चढते.डोहाळ जेवण उखाणे घेऊन सजवते.जुनी आई नव्या बापाला घेऊन नव्या संसारात नव्या मुलाच्या कौतुकाला लागते ,तेव्हा तिला पहिल्या मुलाची एवढीतरी आठवण येत असेल का?मला बापाबद्दल काही प्रश्न विचारायचे नाहीतच.शुक्रबीजाच्या फलनापासून त्याचा सम्बंधच तुटलेला असतो.पण आईचे काय? एका मुला-मुलीची आई नव्या गर्भाधानाची नवलाई मिरवत राहते,तेव्हा तिच्या आधीच्या लेकराच्या डोळ्यातले आसू काही म्हणजे काहीसुद्धा तिला दिसत नसतील का?
                                                          घटस्फोट कोर्टात सहीशिक्क्यानी पक्के होतात.पोटगी म्हणून बाईला रक्कम मिळते.मुलाच्या शिक्षणासाठी,पोषणखर्च म्हणूनसुद्धा पैसे मागितले जातात."मरू दे तिकडे ब्याद" म्हणून पैसे फेकले जातात.पण परित्यक्त आईनेच दुसरा घरोबा केला तर मुलाला कोण शिकवणार?कोण त्याला ठेवून घेणार?आजोबा आणि आजीच  वृद्धाश्रमात गेले तर?
                                  माझ्या दारी सकाळच्या कोवळ्या उन्हात एक गोड चेहरा असणारा गुबगुबीत मुलगा काखेला रामदासी झोळी लावून 'जय जय रघुवीर समर्थ'पुकारत आला.मुलगा वात्सल्य जागे करणारा होता.चेहरा कोमल ,बालसुलभ भाव सांगणारा.नरसोबावाडीतून आलो म्हणाला.तेथेही कुठूनतरी आलेला.आईबाप आठवायचे.देवाच्या हवाली केले म्हणाला.वाडीला ओवरीत राहतो ,भिक्षा मागतो.अन्न छत्रात जेवतो.लोक कपडे देतात.मला हुंदका फुटला.मुलगा मात्र स्थिर चेहरा घेऊन उभा.त्याला खाऊ घातले.नवे धोतर दिले.पैसे दिले.पुन्हा ये म्हटले.मुलगा 'जय जय रघुवीर समर्थ'म्हणत पुढे गेला.पुन्हा आला नाही.वाडीत चौकशी केली.उत्तर आले."येथे असा एक चांगल्या घरचा मुलगा आलेला खरा.पण आता कुठे ते ठाऊक नाही.अशी मुले येतच राहतात"या मुलांच्या आया कुठे असतील बरे?जगभर माणसांची गुलामगिरी वाढत आहे.भारतात गरीबी आहे.गरीबी तिथे मुले भारम्भार!"तुमच्या मुलाना कामाला लावतो.शिकवतो"असे सांगून काही पैसेही घेऊन मुले नेली जातात.परदेशात त्यांची विक्री होते.भारतातसुद्धा गुलामांचे जगणे कमी संख्येने नाही.
                                             अरबस्थानात उंटाच्या मानेला बांधलेले मूल जीवाच्या आकांताने ओरडत राहते.ऊंट आवाजाला घाबरून जोराने धावत सुटतो.त्याचा शर्यतीत नंबर लागतो.बक्षीस मिळते.उंटाच्या मानेला बांधलेले मूल कोणत्या आईने पाठवलेले असेल?त्याची आई त्यावेळी कोठे असेल?ती कुणाच्या दारी आणि कुणाच्या घरी संसार करीत असेल बरे?
    पानवाला.

Monday, February 7, 2011

कविता वेचत जाणारा एक वेडा चकोर!

मला कधीतरी अचानक पंचवीस पैशांचे कार्ड पोस्टातून येते. पत्ता लिहिण्याच्या बाजूला भारत सरकारच्या कल्याण मंत्रालयाचा गुलाबी छापील संदेश असतो. मागील कोऱ्या बाजूवर मात्र वेड्यावाकड्या ओळीमधून शब्दांची उभी आडवी पाखरेच पाखरे असतात. एका वेड्या कविताप्रेमी जीवाने चोच भरून जमा केलेल्या कविता माझ्यापुढे मांडलेल्या असतात. खिडकीसमोरच्या फांदीवर नाचरा पक्षी शेपटीचा पंखा फुलारून कधी बसेल याची खात्री नसते. मात्र तो आला की चोच इकडे तिकडे फिरवेल, मानेचा नखरा दाखवेल. तालात काय नाचेल. तसाच हा कलंदर कविता-संकलक आपल्या उरावरच्या रेघा किती किती प्रकारे मला दाखवेल याची आधी दाद लागत नाही. तो तशी दाद लागू देणारही नाही. पण दाद मागत मात्र राहणार. या भन्नाट माणसाने प्रथमच मला लिहिले होते ,"काव्याला दोन गोष्टी मारक ठरतात. एक-जाण नसते त्याची मिळत राहणारी दाद आणि दोन-जाणकाराचे मौन! तुम्ही मौन सोडले आहे ना?"

या लोकविलक्षण कवितावेड्याच्या एका पायावरून आणि उजव्या हातावरून वारे गेले आहे. पण डाव्या हातात संचार भरलाय. असे वारे गेले म्हणून काय झाले? कवितेचा श्वास वारा अंगभर घुमतोय ना? बोलणे कमी. बघणे हेच बोलणे. डोळे सदोदित कविता शोधणारे. कुणाकुणाला कविता धाडत राहणारे. फायलीच फायली अवती भवती. त्यात कविता गरम गरम श्वास टाकत असतात. या कविता त्याने कुठून आणल्या? कुण्या कवीच्या त्या आहेत?कधी त्या भेटल्या? हे असले कधीही त्याला विचारायचे नाही. भुंगा पुढे आला तर त्याला कुणी विचारते का  की बाबा तू कोण, कोणत्या फुलामधून मध जमा केलास म्हणून? त्याला तरी ते सांगता येणार का? तो काय म्हणेल? तो म्हणेल,"मधुकर माझे नाव असे. जिथे जिथे रसगंध उमलती तिथे तिथे मम गाव वसे!" या कवितावेड्या संकलकाने पहिल्याच पत्रात मला लिहिले होते-"मी पाठवलेल्या कविता हा माझा आनंदाचा ठेवा आहे.या कवितामधून मी आई वडीलाना शोधत असतो. ते मला दिसतात. संग्रहित कवितामधून आपल्याला झाडे, चिमणी पाखरे, शेत एवढी प्रकर्षाने भेटतील. कृपया यांचे कवी कोण एवढे विचारू नका. मी लिहीत नाही." "मी लिहीत नाही म्हणजे मी कविता लिहिणारा नाही", की "याबाबत मी काही लिहिणार नाही" या संदिग्धतेचा मीही कधी बाऊ केलेला नाही. आयुष्याचे शेत, आई-वडिलांची झाडे आणि फांद्या-फुलांचा निवारा करणारी जिवाची पाखरे एवढा संदर्भ मला पुरेसा आहे. पाखरू आयुष्याच्या संध्यासमयी काळजात कविता जपून आहे हेसुद्धा मला ठाउक आहे. मला पाखराचे पंख मोजायचे नाहीत. त्याच्या उरातली कविता वाचायची आहे.

कविता हे खरोखरीच वेड आहे. मग हे वेड कसे आणि का बरे लागत असावे? कविता ही तरी काय चीज आहे? लिहिली म्हणून ती कविता असते का? गायले गेले म्हणून गीत गाणे बनते काय? उच्चारला गेला तरच तो शब्द असतो का? तसे असेल तर मग आत्मसंवादच गेला. 'शब्दाविन संवादिजे'असे माऊली  का बरे म्हणाली असेल? तरीसुद्धा शब्द हवाच असतो. शब्दांच्या पलीकडे जे काही असते ते सांगायलासुद्धा शब्दानाच यावे लागते. शब्द हे साक्षात ब्रह्म आहे.कविता म्हणजे तुम्हाला सांगतो, एक यड ताक आहे.कविता हा माणसाचा श्वासवारा आहे. माणूस जन्माला येतो आणि मग त्याला श्वास मिळतो हे खरे नाही. श्वासवाराच माणसाच्या रूपाने आईच्या उदरात, घरट्या मधील पिलासारखे ऊर वरखाली करीत राहतो. मग बाहेर येतो. श्वासवाराच डोळे उघडतो. त्याला गंध भेटतो. रसवेदन खुलवते. श्वासवाराच नादब्रह्माचा अवतार! असा हा श्वासवारा मग जीवाला ऊन, पाऊस, नाजुक पाऊले आणि कठोर रपाटे यांची विलक्षण दुनिया दाखवत राहतो. कविता माणसाला उपरी नसते. ती त्याच्या रक्तात, हृदयाच्या ठोक्यात असते. 'सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे. प्रीतिसारिकेचे गीत तियेचे ऐकावे कानी - आणि मग बनवावे मन धुंद रंगुनी काव्यसुधापानी' हे वेड बालकवीना  गुरुजीनी लावले काय? 'स्वयं नाद्ब्रह्मात गुंग  होणारा, शब्दजगताचा चतुर विधाता तो - जगन्मोहन या खगापरी गातो' अशी ग्वाही चंद्रशेखर कवीनी दिलीय ना?

जेव्हा तुम्ही कविता समरसून वाचता, तेव्हा तुम्ही स्वतः कवीच असता. प्रा.रमेश तेंडुलकरानी १९९७च्या अधिष्ठान या दिवाळी अंकात लिहिलय,"एके काळी प्रत्येक आदिमानव हा कवी होता. वस्तूना शब्द देणे  हीच स्फूर्ति होती. एकेकाळी जग कसे ताजेतवाने, गरमगरम, अगदी फ्रेश होते. अशा वेळी बोलणे म्हणजेच कविता करणे. म्हणून तर साहित्याला वाणीमय - वाणीरूप असे म्हणायचे ना? आणि पुन्हा असे की कवींची नावे विचारण्याची आपली परंपरा नाही. लोकगीते कोण लिहिते? ती सर्वांची असतात. रानात सीता प्रसूत होते. कशी? लोकगीत आपणाला सांगते-

                              'एवढ्या वनामंदी कोण रडते ऐका--
                               सीतेला समजाया बोरीबाभली नायिका'

लोकगीत गायले जाते ते ऐकायचे. कुणी लिहिले, उच्चारिले ते विचारायचे नाही. माझा वेडा चकोर कविता संकलक मला कार्डामधून उरीचे उसासे कळवतो.

   'उगवायच म्हटल काहीही तरी--जमिनीसारख मन थोड़े तरी --सुपीक असायला हवे'
   'बकुळी म्हणते सावळ्या रंगान हिरमुसायचे नसते --गुण गंधाने सर्वाना जिंकायचे असते'
   'मी झाडाला चिमण्या पाखरांशी आणि चिमण्या पाखराना झाडांशी बोलताना पाहिलय,
   'आणि मीही माझे एकटेपण जपत--आईला तुलशी रोपाशी बोलताना कैकदा पाहिलय'   
   'सबंध अंगभर दाटीवाटीने फांद्या खोचून घेतल्या--तेव्हा कुठे मी झाडासारखा दिसू लागलो,
   'वेदना रुतल्या नाहीत--फान्द्याना पाने होती, फान्द्याना फुले होती,
    'चिमण्या पाखरांची खूप खूप वाट पाहिली --हात पसरले पण पाखरे काही परतली नाहीत'  

माझ्या वेड्या कवितावेचू मित्राचे शेत कधीच अंधारून गेले आहे मग ----
           "शिवारात आता बैल दिसत न्हाईत --का कुणाची बी --
             माज्या s s राजा, माज्या s s सर्जा  अशी साद येत न्हाई--
             सार शिवार आता मुकं झालय"

असे शिवार मुके होते तेव्हा कविताही मुकी  होते. आणि मग मुकेपण स्वतःच कविता बनते!

- पानवाला.