Sunday, December 5, 2010

कॉमन सेन्सला श्रद्धांजली!

कॉमन सेन्स म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. ते मेले आहे म्हणून त्याला लंडन टाईम्सने श्रद्धांजली वाहिली होती म्हणे. कित्येक वर्षे हे व्यावहारिक शहाणपण आपल्या संगे जगले होते. इतका काळ आपली साथसंगत केली की ते व्यावहारिक शहाणपण किती वयाचे होते ते सांगता येणार नाही. शिवाय नोकरशाही दफ्तरखान्याने कॉमन सेन्सची फाईल कधीच गहाळ केली आहे. सकाळी लवकर घरट्यातून बाहेर पडणारे पक्षी अधिक भक्ष्य खातात. आपले जगणे नेहमीच न्यायाने चाललेले नसते. कदाचित आपलाच काही दोष असेल. हे व असेच काही धडे त्या शहाणपणाने आपणाला शिकवले होते. कमाईच्या हिशेबाने खर्च करावा. पोराटोरामच्या हाती नव्हे तर प्रौढ पोक्त माणसांच्या स्वाधीन सत्ता करावी. या तत्वाच्या आधारे कॉमन सेन्स जिवंत होता. धर्माचा बाजार झाला. बळी गेलेल्यापेक्षा गुन्हेगारानाच सवलती वारेमाप मिळू लागल्या. तेव्हा कॉमन सेन्सने अंथरुण धरले. दरवडेखोरापासून बचाव करण्याचे स्वातंत्र्य निघून गेले. उलट घरलुटारूच घरमालकावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करू लागला, तेव्हा कॉमन सेन्सने आपला प्राण सोडला. त्या आधी कॉमन सेन्सचे आई वडील "सत्य आणि विश्वास" मेलेले आहेत. कॉमन सेन्सची बायको "दूरदृष्टी" परलोकी गेली आहे. "जबाबदारी" नावाची मुलगी नजरेसमोर मरण पावली आणि "बुद्धी" नावाच्या पोटच्या मुलाने आपला श्वास थांबवला आहे. कॉमन सेन्सची सावत्र भावंडे कब्जा करुन आहेत. त्यांची नावे अशी--

१. मला माझे हक्क पक्के ठाऊक आहेत.
२. ते मला लगेच मिळाले पाहिजेत.
३. दुसराच कुणीतरी दोषाचा धनी मानावा.
४. सगळ्यानी मिळून माझा बकरा केला आहे.

कॉमन सेन्स मेले याची वार्ताच नसल्याने अगदी मोजकी माणसे मर्तिकाला हजर होती.

थॉमस फ्रीडमन हे अमेरिकेतील भारी विचारवंत पत्रकार आहेत. त्यानी अलीकडेच अमेरिकेत तिसरा शहाणा राजकीय पक्ष पुढे यायला हवा असे आग्रहाने म्हटले आहे. गुंतलेल्या हितासंबंधाना आधार देण्यात रिपब्लिकन आणि डेमोक्रटिक पक्ष पुरते रुतले आहेत. खाजगी गुंतवणदार, नफा-तोटा, निवडून यायचे आणि सत्ता- धन कमावायचे, यातच अडकून पडलेल्या सट्टे बाजारी पक्षाना डच्चू द्यावा आणि देशाला ग्रासून राहिलेल्या संकटामधून बेधड़क बाहेर येण्याची हाक देणारा, जे ऐकायला हवे आहे तेच नेमके ऐकवणारा असा हिम्मतबाज राजकीय पक्ष अमेरिकेला हवा आहे.

वॉशिंग्टन, लिंकन, केनेडी अशी राष्ट्राला सर्वांगानी उठून उभे रहा असा दिव्य मंत्र देणारी माणसे हवीत. आज सारा देश खुज्या माणसांचा झाला आहे. चिनी स्पर्धकांशी अमेरिकन धावपटू स्पर्धा करणार होता. चिनी स्पर्धक म्हणाला,"मीच स्पर्धा जिंकणार" आणि त्यानेच स्पर्धा जिंकली. अमेरिकन धावपटू मोठा बर्गर खात होता. बुदगुल्या धावपटूला धावता कसे येणार? अमेरिकेच्या स्वावलंबी सामर्थ्याबद्दल टिप्पणी वाचा. स्वातंत्र्यामधून समृद्धी येते. सारे मुबलक झाले की माणसे स्वार्थी बनतात. स्वार्थातून आत्मसंतुष्टपणा येतो. जे आत्मसंतुष्ट असतात ते इतराबद्दल उदासीन,बेपर्वा राहतात. ही बेपर्वाई परावलंबनाकडे नेते. परावलंबन म्हणजेच परतंत्र होणे.

मेलेल्या प्राणीदेहावर तुटून पडायला गिधाडे जमावीत तसे भारतात राजकीय पक्ष जमा झालेले आहेत. कुणाला जातीची, कुणाला प्रदेशाची, कुणाला भाषेची, स्विस बँकेतील गुप्त धनाची नखे आणि चोची फुटल्या आहेत. अमेरिकेतील रेड इंडियन जमाती एकमेकांशी लढून नष्ट झाल्या. ज्या उरल्या त्यांच्या जमिनी गेल्या. सत्ता गेली. व्यवसाय गेले. धर्म गेला. त्यांच्यातले काही धनदांडगे बनून नेवाडा राज्यात जुगार महाल खोलून बसले. तसेच भारतातील इंडियन्स करीत आहेत. परस्परांचे लचके तोडावेत, एकमेकाना अडचणीत गाठावे. कशाचेतरी भांडवल करुन निवडणुका जिंकाव्यात. त्यातून सत्ता,पैसा सारे काही! पुन्हा त्यातून इलेक्ट्रोनिक्स नावाच्या महाशक्तीने लबाडी, शोषण याना प्रचंड बळ पुरवले आहे. नेहरू, सावरकर, विवेकानंद, आंबेडकर यांची स्वप्ने, मायभूमीची भक्ती, दीनदलितांची खरी कळकळ, सकलहिताची दृष्टी कुठे आहे? डोके घट्ट बांधून बायकी आवाजात स्फुंदत स्फुंदत पंतप्रधान बोलतात. भर दिवसा आम्हा दिसू लागते रात!

सकल राष्ट्राला सामर्थ्य पुरवणारे नेतृत्व या देशात नाही. एक देश म्हणून जगावे ही इच्छाशक्ति हवी, असा कुठेतरी कॉमन सेन्स जागा होतोसुद्धा. श्री.वसंतराव पळशीकर यानी २००२ मध्ये वर्धा येथे विचारवेध संमेलनात सांगितले,"जागतिकीकरण, उदारीकरण यांच्या आव्हानाना यशस्वीपणे तोंड द्यायचे तर राष्ट्रात ऐक्य हवे. राज्य बलशाली हवे. परिवर्तनवादी आंदोलनाने स्वतःला प्रश्न विचारायला हवा की त्याची राष्ट्रवादी बैठक कोणती? "भारताची इतिहासपरंपरा अमुका तमुकाची आहे. आमची नाही. आम्ही कधी एक समाज, एक लोक नव्हतो. तेव्हा हे राष्ट्र आमचे नाही". असेच म्हणायचे तर राष्ट्रवादाच्या उभारणीसाठी आम्हाला पायाच सापडणार नाही.

कॉमन सेन्स तर आता मेलाय! मग कसे करणार?

पानवाला....