Sunday, December 5, 2010

कॉमन सेन्सला श्रद्धांजली!

कॉमन सेन्स म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. ते मेले आहे म्हणून त्याला लंडन टाईम्सने श्रद्धांजली वाहिली होती म्हणे. कित्येक वर्षे हे व्यावहारिक शहाणपण आपल्या संगे जगले होते. इतका काळ आपली साथसंगत केली की ते व्यावहारिक शहाणपण किती वयाचे होते ते सांगता येणार नाही. शिवाय नोकरशाही दफ्तरखान्याने कॉमन सेन्सची फाईल कधीच गहाळ केली आहे. सकाळी लवकर घरट्यातून बाहेर पडणारे पक्षी अधिक भक्ष्य खातात. आपले जगणे नेहमीच न्यायाने चाललेले नसते. कदाचित आपलाच काही दोष असेल. हे व असेच काही धडे त्या शहाणपणाने आपणाला शिकवले होते. कमाईच्या हिशेबाने खर्च करावा. पोराटोरामच्या हाती नव्हे तर प्रौढ पोक्त माणसांच्या स्वाधीन सत्ता करावी. या तत्वाच्या आधारे कॉमन सेन्स जिवंत होता. धर्माचा बाजार झाला. बळी गेलेल्यापेक्षा गुन्हेगारानाच सवलती वारेमाप मिळू लागल्या. तेव्हा कॉमन सेन्सने अंथरुण धरले. दरवडेखोरापासून बचाव करण्याचे स्वातंत्र्य निघून गेले. उलट घरलुटारूच घरमालकावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करू लागला, तेव्हा कॉमन सेन्सने आपला प्राण सोडला. त्या आधी कॉमन सेन्सचे आई वडील "सत्य आणि विश्वास" मेलेले आहेत. कॉमन सेन्सची बायको "दूरदृष्टी" परलोकी गेली आहे. "जबाबदारी" नावाची मुलगी नजरेसमोर मरण पावली आणि "बुद्धी" नावाच्या पोटच्या मुलाने आपला श्वास थांबवला आहे. कॉमन सेन्सची सावत्र भावंडे कब्जा करुन आहेत. त्यांची नावे अशी--

१. मला माझे हक्क पक्के ठाऊक आहेत.
२. ते मला लगेच मिळाले पाहिजेत.
३. दुसराच कुणीतरी दोषाचा धनी मानावा.
४. सगळ्यानी मिळून माझा बकरा केला आहे.

कॉमन सेन्स मेले याची वार्ताच नसल्याने अगदी मोजकी माणसे मर्तिकाला हजर होती.

थॉमस फ्रीडमन हे अमेरिकेतील भारी विचारवंत पत्रकार आहेत. त्यानी अलीकडेच अमेरिकेत तिसरा शहाणा राजकीय पक्ष पुढे यायला हवा असे आग्रहाने म्हटले आहे. गुंतलेल्या हितासंबंधाना आधार देण्यात रिपब्लिकन आणि डेमोक्रटिक पक्ष पुरते रुतले आहेत. खाजगी गुंतवणदार, नफा-तोटा, निवडून यायचे आणि सत्ता- धन कमावायचे, यातच अडकून पडलेल्या सट्टे बाजारी पक्षाना डच्चू द्यावा आणि देशाला ग्रासून राहिलेल्या संकटामधून बेधड़क बाहेर येण्याची हाक देणारा, जे ऐकायला हवे आहे तेच नेमके ऐकवणारा असा हिम्मतबाज राजकीय पक्ष अमेरिकेला हवा आहे.

वॉशिंग्टन, लिंकन, केनेडी अशी राष्ट्राला सर्वांगानी उठून उभे रहा असा दिव्य मंत्र देणारी माणसे हवीत. आज सारा देश खुज्या माणसांचा झाला आहे. चिनी स्पर्धकांशी अमेरिकन धावपटू स्पर्धा करणार होता. चिनी स्पर्धक म्हणाला,"मीच स्पर्धा जिंकणार" आणि त्यानेच स्पर्धा जिंकली. अमेरिकन धावपटू मोठा बर्गर खात होता. बुदगुल्या धावपटूला धावता कसे येणार? अमेरिकेच्या स्वावलंबी सामर्थ्याबद्दल टिप्पणी वाचा. स्वातंत्र्यामधून समृद्धी येते. सारे मुबलक झाले की माणसे स्वार्थी बनतात. स्वार्थातून आत्मसंतुष्टपणा येतो. जे आत्मसंतुष्ट असतात ते इतराबद्दल उदासीन,बेपर्वा राहतात. ही बेपर्वाई परावलंबनाकडे नेते. परावलंबन म्हणजेच परतंत्र होणे.

मेलेल्या प्राणीदेहावर तुटून पडायला गिधाडे जमावीत तसे भारतात राजकीय पक्ष जमा झालेले आहेत. कुणाला जातीची, कुणाला प्रदेशाची, कुणाला भाषेची, स्विस बँकेतील गुप्त धनाची नखे आणि चोची फुटल्या आहेत. अमेरिकेतील रेड इंडियन जमाती एकमेकांशी लढून नष्ट झाल्या. ज्या उरल्या त्यांच्या जमिनी गेल्या. सत्ता गेली. व्यवसाय गेले. धर्म गेला. त्यांच्यातले काही धनदांडगे बनून नेवाडा राज्यात जुगार महाल खोलून बसले. तसेच भारतातील इंडियन्स करीत आहेत. परस्परांचे लचके तोडावेत, एकमेकाना अडचणीत गाठावे. कशाचेतरी भांडवल करुन निवडणुका जिंकाव्यात. त्यातून सत्ता,पैसा सारे काही! पुन्हा त्यातून इलेक्ट्रोनिक्स नावाच्या महाशक्तीने लबाडी, शोषण याना प्रचंड बळ पुरवले आहे. नेहरू, सावरकर, विवेकानंद, आंबेडकर यांची स्वप्ने, मायभूमीची भक्ती, दीनदलितांची खरी कळकळ, सकलहिताची दृष्टी कुठे आहे? डोके घट्ट बांधून बायकी आवाजात स्फुंदत स्फुंदत पंतप्रधान बोलतात. भर दिवसा आम्हा दिसू लागते रात!

सकल राष्ट्राला सामर्थ्य पुरवणारे नेतृत्व या देशात नाही. एक देश म्हणून जगावे ही इच्छाशक्ति हवी, असा कुठेतरी कॉमन सेन्स जागा होतोसुद्धा. श्री.वसंतराव पळशीकर यानी २००२ मध्ये वर्धा येथे विचारवेध संमेलनात सांगितले,"जागतिकीकरण, उदारीकरण यांच्या आव्हानाना यशस्वीपणे तोंड द्यायचे तर राष्ट्रात ऐक्य हवे. राज्य बलशाली हवे. परिवर्तनवादी आंदोलनाने स्वतःला प्रश्न विचारायला हवा की त्याची राष्ट्रवादी बैठक कोणती? "भारताची इतिहासपरंपरा अमुका तमुकाची आहे. आमची नाही. आम्ही कधी एक समाज, एक लोक नव्हतो. तेव्हा हे राष्ट्र आमचे नाही". असेच म्हणायचे तर राष्ट्रवादाच्या उभारणीसाठी आम्हाला पायाच सापडणार नाही.

कॉमन सेन्स तर आता मेलाय! मग कसे करणार?

पानवाला....

Tuesday, November 30, 2010

म्हातारपण गात्रांना असते. स्वप्नांना नाही!

ज्यांची उपयुक्तता संपते त्यांचे रानातले फक्त तण बनते. तृण सर्वाना हवे असते. तण नकोसे होते. आज म्हातारी माणसे घरोघरी नकोशी होताहेत. ओझी बनताहेत. जेथे अजून मोठी कुटुंबे आहेत, तिथेही संसार अलग होताहेत. म्हातारा म्हातारी झालेल्या माणसाना औषधपाणी कुणी करायचे? तस्त कुणी आणून द्यायचे? 'दुखणाईत हा जळे दिवा -- खोकत खोकत काजळ ओकत - कुबट करी ही दमट हवा'! खाण्याची बडदास्त कशी ठेवायची? गावातल्या गावातही महिनाअखेर बिस्तरा घेऊन दुसरा उंबरा चढ़ावा लागतो. नाहीतर वृद्धाश्रमामध्ये रवानगी! ते तर रुग्णालय! ' 'टोकावाचुन चालू मरणे- ते त्याचे होते जगणे'. ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या बैठकीमधूनही ज्येष्ठाना जगण्याचा मार्ग सापडत नाही. कीर्तने पेंग आणतात. परदेशी मुलांकडे जावे. ग्रीनकार्ड प्रथम. मग परदेशी नागरिकत्व. हा उड्डाणउतारासुद्धा विफलतेच्या घसरतीला लागलेला.

'पैलतीर" नावाचा चित्रपट व्ही.सी. डी.वर बघता येतो. योगेश सोमणने लिहिला. अरुण नलावडे, रमा जोशी यानी Canada मधील ज्येष्ठांचे वृद्धावसान दाखवले. मग 'मातीची चूल' पिक्चर पाहण्याची हिम्मत उरत नाही. तक्रारी त्याच. उबग येणे. हुंदके देणेही तेच. आढ्याकड़े डोळे! अमेरिकेतील वृद्धांसाठी हिरव्या कंच बागांची, श्रीमंत, गरम पाण्याची कुंडे असणारी अलिशान घरे आहेत. महिना खर्च तीन हजार डॉलर्स. अलिशान शीतपेटी, प्रशस्त खड्डा यांचे आगाऊ बुकिंग. अमेरिकेत जन्माला आलेल्या गौरकायाना जन्माच्या क्षणापासून वेगळ्या खोलीत झोपणे, कुमार अवस्था गाठली की अलग निवास, अलग कमाई यांची सवय असते. ' 'माझ्या नशिबाचा मी स्वामी ' म्हणून ही माणसे आपल्या कारमधून वावरतात. सहलीना जातात. पण त्यांच्या डोळ्यातील पार गोठलेपणा लपत नाही. नेवाडा राज्यातून Death Valley कडे म्हणजे मरणाची दरी नावाच्या भयाण मुलुखाकडे रस्ता जातो. मोहावे नावाच्या वैराण प्रदेशातून सारा प्रवास. Death Valley च्या तोंडाशीच एक कोरडे रखरखीत, विशाल कुंपण लागते. आत वापरामधून काढून टाकलेली हजारो विमाने जणू वृद्धाश्रमात टाकलेली आहेत. एकेकाळी आकाशी झेप घेणारी निळ्या स्वप्नांची ही विमाने Death Valley कडे पाहत आता कायमची उभी आहेत. त्याना पाहिले की पोटात खड्डा पडतो. तोही लगेच बुजवायला हवा. नाही तर कुणासाठी तरी वापरला जाईल.

प्रश्न सोपा नाही. निकडीचा मात्र आहे. हा प्रश्न श्रावणबालकाला सोडवता येणार नाही. कावडीत बसलेल्या अंध आई बाबानाच आपली कावड सोडून बाहेर यावे लागेल. काशीयात्रेचे पुण्य जोडायचे म्हणून श्रावणबालकाचे तारुण्य वाया घालवायचे पाप जोडायचे का? याचा विचार श्रावणबालकाच्या आईबाबानी करायला हवा. मुक्या माणसालाही वाचा फुटू शकते. पंगू माणूससुद्धा डोंगर ओलांडून जातो. अंध माणसाच्या गात्राना डोळे लाभू शकतात. दोन्ही पाय गुडघ्यातून गेलेल्या तरुणाने परवा तुफान कसरतीचे नृत्य एका स्पर्धेत हजारोंच्या समोर करुन दाखवले. वृद्धांनी आपण वृद्ध म्हणजे समृद्ध आहोत, या उभारीने 'उठा उठा बांधा कमरा' असे म्हणत खरेच उभे राहिले पाहिजे.

कासवीण बनून तिच्या नजरेने नव्या उमलत्या पिढीकड़े पाहिले पाहिजे. कासवीण दुरून आपल्या पिल्लांकडे मायेने पाहते. पिलांचे रक्षण, पोषण तिच्या नजरेतून होते. पुत्ररूपाने आपण जगायचे, जिवंत राहायचे तर मुला-मुलींच्या फुलत्या, उमलत्या, फोफावत्या संसाराना भरल्या तृप्त डोळ्यानी आशीर्वाद आपण द्यायला हवा. आपली स्वतःची फ़ालतू चिंता नको. स्वतःला विसरा. मुलांची काळजी करा. आपली मुलेसुद्धा प्रौढ़त्वाची पायरी वेगाने पार करीत आहेत. त्यांचेही वार्धक्य त्याना लवकर भीती घालेल, भेटत राहील. त्यानाही संध्याछाया भिववू लागतील. आपणाप्रमाणेच आपल्या मुलानी त्यांच्या मुलांसमोर लाचार, हतबल होता नये. जे तुम्ही आज तुमच्या मुलापुढे म्हणाल, तेच तुमची मुले पुढच्या पिढीपुढे कदाचित मांडतील. खलील जिब्रान यानी एक मार्मिक कथा लिहिलीय. पिकलेली पाने भराभरा खाली पडत होती. आवाज करीत होती. खालचे गवत त्रासले. " "काय ही कटकट?आम्हाला झोपू पण देत नाही तुम्ही?" पिकली पाने रागावली. " "क्षुद्रानो! कधी वर आलात काय? भव्य स्वप्ने पाहिलीत काय?" पुढे खाली पडलेली पानेच गवत झाली. पुढच्या पानझडीच्या समयी झाडावरुन खाली पडलेल्या पानाना नावे ठेवू लागली. हे असे आपल्या बाबतीत व्हायला नको.

स्वतः मधून निसटला त्याला मोक्ष भेटला. आम्ही मुलाना वाढवले. मग आम्हाला नको का त्यानी आधार द्यायला? हा विचार लाजिरवाणा आहे. मुलानी आपल्या आयुष्यात येणे, रांगत रांगत सारे घर सोन्याचे करणे, दफ्तर घेऊन शाळेत जाताना मुले दिसली की आपल्या डोळ्यांची पाखरे होणे-- हे सारे आपले श्वासोच्छ्वास आहेत. मुलांसाठी आपण खाल्लेल्या खस्तांचे बिल शून्य आहे असे आई मुलाच्या उशाशी लिहून ठेवते. आचार्य अत्रे यानी लिहिलेला हा धडा आमच्या पुस्तकात होता.
वृद्धानी समाजाचे धन बनावे. कर्ज बनू नये. जे उपयुक्त आहे, दो हातानी वाटून टाकणारे आहे, त्याकडे माणसे यांचे देणे लागतो अशा नजरेने पाहतात. वन्य जमातीमधले वृद्ध जमातीचे प्रमुख असतात. ते शहाणपण देतात. लढावे कसे? शिकार कशी करावी? औषधे कोणती? एकजूट कशी राखावी? हे सांगून जगणे जागवतात. तरुण पिढी आदर राखून राहते. आज वैद्यकशास्त्राने आयुर्मर्यादा वाढवली. माणसे नको एवढी जगू लागलीत. एकत्र कुटुंबे विसर्जित होताहेत. खेड्यातल्या जुन्या ग्रामव्यवस्था मोडीत निघाल्यात. आजीचा बटवा कुणाला हवा? आजोबानी शिकवावे असे काही उरलेले नाही. एकूण कुटुंब या सामाजिक संस्थेची कामे शाळा, पुस्तके, दवाखाने, लॉजिस, होटेल वगैरे नव्या सोयीनी बळकावली आहेत. आजोबा कोणता इतिहास, कोणता भूगोल सांगणार? त्यानाच टी. व्ही.चा सत्तेचाळीस बटने असणारा रिमोट नातवाकडून समजावून घ्यावा लागतो. नातू संगणक पकडून असतो.

आजोबा, आजी ही माहिती पुरवणारी साधने राहिलेली नाहीत. पण व्यावहारिक समजशक्ति वयाबरोबर वाढायला हवी. वाढत जाते सुद्धा. ७०व्या वर्षी जे आकलन होते ते २५व्या वर्षी आकलनात येत नाही. वय ही वाढ आहे. क्षय नव्हे. मग आता कुटुंबाची जुनी कामे ज्या संस्थांकडे त्या कामांच्या विकासासाठी त्या त्या संस्थांकडे आजोबांनी जायला काय हरकत आहे? कितीतरी सामाजिक कार्ये आत्मीयतेची भुकेली आहेत. संशोधनाच्या दिशा वाट पाहत आहेत. मग असा धरी छंद -जाय तुटोनी हा भवबंध! वार्धक्याची उंची दूरवरचे दाखवते.

बाबा आमटे याना कुठे म्हातारपण छळत राहिले? ग.प्र.प्रधान आपले घर साधना साप्ताहिकाच्या स्वाधीन करून आपण वानप्रस्थी झाले. पण लेखन, कार्यकर्त्याना मार्गदर्शन चालूच ठेवले. गो.नी. दांडेकर गड चढत राहिले. बायको निधन पावली होती. एकुलता कर्ता मुलगा डोळ्यासमोर मरण पावला. एकटे एकटे राहिलेले माधवराव राणे नावाचे संशोधन तपस्वी सिंधुदुर्गातल्या माणगाव ग्रामी टेम्ब्ये स्वामींच्या सावलीखाली पोथ्या पुराणे, इतिहास ग्रंथ, लोककथा अभ्यासत राहिले. वय वर्षे ८४. स्वतःच आमटी भात शिजवून खाणार. तब्येत चांगली .घंटा वाजू लागली. बिस्तरा उचलला.कुडाळशेजारी आपल्या रानातल्या घरात एकटेच राहिले. शांतपणे एक दिवस उगवत्या सूर्याबरोबर आयुष्याच्या समाप्तीला निघून गेले. या माधवाने जगण्याचा अभंग केला.

अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे मी एक जराजर्जर बाई शाळा सुटायच्या सुमारास STOP असा बावटा घेउन रस्त्यात उभी राहिलेली पाहिली. शाळा सुटल्यावर घरी जाणारी चिमुरडी बिनधास्त रस्ता ओलांडून जावीत ही तिच्या जिवाची धडपड होती. मला त्या माऊलीचे पाय धरावेसे वाटले. पण तिच्या हातात माझ्यासाठी STOP हा बावटा होता.
पानवाला

Tuesday, November 23, 2010

ई-बुकांचे डिजिटल वादळ!

विसरा तो जुना घोष, नवी पुस्तके छापा छापा--- -बुकांच्या राशीमधुनी येतो आहे गणपतीबाप्पा! -बुके म्हणजे डिजिटल पुस्तके. त्याना कव्हर नको. छपाई नको. घट्ट बांधणी नको. पाने नकोत. ती उलटणे किंवा दुमडणे नको. पुस्तकातला ताव गेला. (मग तावदारणे कशाला?) काचेवर अक्षरांची चित्रे येणार. काचेवर बोटे फिरवा. हवा तो मजकूर मिळवा. पूर्वी पुस्तकांचे किती ते लाड? पाण्या पासून वाचवा. तेलापासून जपा. ढिले पडू देऊ नका. मग पाण्यात पडूनही तुकोबांचे अभंग तगले कसे? तुकारामांची गाथा हे मराठीतले पहिले ई-बुक असले पाहिजे. कागदावर लेखणीने अक्षरे काढणे म्हणजे साक्षरता नव्हे. आता इंटरनेट साक्षरता आलीय. ती जगभर, शाळाभर, गल्लीभर (आणि गल्लाभर सुद्धा) पसरली आहे. -बुके सर्वाना माहिती पुरवणार.. डिजिटल हे जागतिकीकरण अर्थशास्त्रातच आहे असे नाही तरशब्द आणि त्यांचे अर्थया शास्त्रातही घोंगावत आहे.

हे डिजिटल वारे या आधीच छपाईक्षेत्रात घुसले आहे. संगणकावर मजकूर येतो. त्याच्या प्रती निघतात. कागद मात्र शाबूत. बांधणी चालूच. घडी, सुरळी अगदी सुरक्षित. पण गुटेनबर्गच्या प्रेसची दाबादाबी, छापाछापी कुठे राहिली? चाके फिरतात पण प्रेस नावाचा दाबाचा पट्टा कुठे आहे? मग `प्रेस` ला प्रेस असं का म्हणायचं?  तुम्हाला ठाऊक आहे? पहिली -बुके गुटेनबर्गचे नाव सांगतच १९७१ मध्ये आली. मायकेल हार्ट नावाच्या इसमाने गुटेनबर्ग प्रोजेक्ट तयार केला आणि ई-बुकांची उलाढाल सुरु केली. आपली छपाई उडवली. अक्षरांच्या आकृत्या उमटवल्या म्हणून गुटेनबर्गचा आत्मा कासाविस झाला असेल का? मुळीच नाही. त्याच्या आत्म्याला मुक्तीच मिळाली असणार. गुटेनबर्गने कात टाकली. कात टाकली की फणा काढून पुढे धावता येते. छपाई आली तेव्हा हस्तलिखितांचा, पोथ्यांचा काळ संपला. माहितीचे क्षेत्र खुले झाले. छपाई मधून काहीही छपून राहत नाही. हे ध्यानी आल्यावर मक्तेदारानी काय कमी आरडाओरड केली असेल?

परवा 'हरिश्चंद्राची फैक्टरी ' हा चित्रपट पाहत होतो. चित्रपटाची फिल्म तयार करायची. प्रोजेक्टरमधून पुढील पडद्यावर हालचाल करणारी चित्रे दाखवायची याचा ध्यास घेतलेल्या दादासाहेब फाळके  याना समाजाने         मनोरुग्णालयात नेले. हरिश्चंद्र आणि तारामती यांचे आख्यान नाटकामधून लागत नाही का? मग सरकती चित्रे कशाला हवीत? अशी आरडाओरड दादासाहेब फाळके यांच्या "अयोध्येचा राजा"विरुद्ध रंगभूमीवरील हरिश्चंद्र तारामतीनी सुद्धा केली असणार. आजचे रंगभूमीवरचे नट आणि नट्या नाटकाचा पडदा वर जाण्याआधीच चित्रपटाच्या पडद्यावर पोचलेल्या असतात. अखिल भारतीय, जागतिक अशा पुरस्कारांची धन्यता चित्रपटाना मिळणे हा रंगभूमीचा विस्तार म्हणायचा की विसर समजायचा? थांबला तो संपला---धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे!

आता इलेक्ट्रोनिक नावाचे टॉनिक माध्यमाना मिळाले आहे. संगणकावर ई-मेल आली. ही इलेक्ट्रोनिक डाक क्षणभरात जगभरात धावते. संक्षेपातचि आणतो कथा सारी! ऑरकुट काय, फेसबुक काय - माणसे दूर दूर समुद्राच्या पैलतीरी राहूनही गप्पा मारायला लागलीत. कंपन्यांच्या मोठ मोठ्या बैठका, वाटाघाटी, व्यवहार मोठ्या पडद्यावर येऊन एकमेकांकडे बघत होताहेत. आपापल्या घरट्यात जो तो आपल्या ह्याच्यात. पण दिसतात मात्र सारे एकमेका पुढे कोचात. Future Shocks नावाच्या पुस्तकात भाकित केल्या प्रमाणे माणसे आज मोठ्या प्रमाणावर घरी बसूनच ऑफिसची कामे करताहेत. अर्थात रस्त्यावरची वाहनांची गर्दी हटली नाही. मॉलकड़े माल खरेदीसाठी गाड्या धावतच राहणार. ते असो! पण डिजिटल, संगणक, इंटरनेट वगैरे संचारानी माणसाचे काय काय करुन ठेवले आहे, हे नुसते पाहिले तरी जीव गडबडून आणि गलबलूनही जायला होतय! ग्लोबलायजेशनला कुणीतरी (मला वाटते मीच!) गलबलाय्जेशन असे म्हटले आहेच मुळी!

डिजिटल नावाच्या "भानामतीने" पुस्तक लिहिणे, वाचकांना ते डाउन लोड करुन देणे, लेखकानी ई-बुके लिहिणे, प्रकाशित करणे याबाबत जी काही अजब उलाढाल आणली आहे तिचा मती भानावर ठेऊन पुस्तक जगातल्या माणसानी विचार करायला हवा, म्हणुनच मी डिजिटल विद्येला "भानामती"असे म्हटले आहे. ई-बुके आल्यावर वा येत असताना एकूणच साहित्य या प्रकाराचे वजन, उंची, वाचनाचा मूळ हेतू, साहित्याचे भवितव्य, साहित्य प्रकारांची पडझड वा नवे धुमारे यांच्या बाबत आजतरी साहित्यिक मंडळी काही म्हणजे काही बोलत नाहीत. साहित्यात नवरस आहेत. त्यांच्या मध्ये इंटरनेट वरुन एखादा व्हायरस शिरेल काय याची कुणालाही चिंता का बरे नाही? एकाही मराठी साहित्य संमेलनात ई-बुका बद्दल चर्चा नाही. परिसंवाद सोडाच. मराठी मधील विज्ञान साहित्यालाही मराठी बुजुर्गांच्या हिशेबी फारशी जागा नाही. सायन्सकथांना कोणी विचारत नाही म्हणून हताश होउन  नारायण धारपांनी भय कथा लिहायला घेतली. धारप यानीच हे लिहून ठेवलेआहे. डॉ.बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डॉ.जयंत नारळीकर अशा विज्ञान साहित्यिकानीच आता मराठीत येत असलेल्या डिजिटल साहित्य प्रकाराबाबत सांगायला हवे.

मराठीत -बुके आलीत म्हणतात. दवबिंदू नावाची मराठी वेबसाईट आहे. नेट भेट नावाच्या मासिक वेब साईट वर एकट्या अनिकेत समुद्र यानी सात बुके लिहिलीत. मराठी ब्लॉग कट्टा वावरत आहे. पण बुके वाचण्यासाठी खास उपकरणे उदा. Apple ची Ipads वगैरे काचेवर बोटे फिरवायची सामग्री लागते. ती ई-मराठी बुकांसाठी येणार का? अमेरिकेत ही सामग्री दिसते. खाजगी वापरातसुद्धा दिसते. मराठीचिये नगरी काय घडणार?

ते काही असो. टाळी द्या मित्रानो! रान मुक्त आहे .पु..देशपांडे यांनीजो जे वांछील तो ते लिहो'' असे म्हणून पिकात गुरे सोडली आहेत. मला पेपरवाले सदरे देत नाहीत, प्रकाशक नाही म्हणतात. काय करावे? कोठे लिहावे?”  अशा वेळी ई-बुक तसेच ब्लॉग कामास येतो. जगी ज्यास कोणी नाही, त्यास ब्लॉग आहे. तिथे जा आणि आपल्या उत्कट भावना विचारांचा निचरा करा. लिहिणे स्वान्त: सुखाय असते ना? मग जा ब्लॉग मध्ये. रिकामा सुतार काहीतरी ताशी --तशी तुमची माझी ही खर्डेघाशी! हलके हलके वाट्ल्याशी कारण!

आणि तसच काही नाही बर का? गुगलवर टिचकी मारा. ब्लॉग लेखांचे ढीग हाती लागतील. वाचणार कोण? लिहिणारा जो कोणी त्याने लिहीत जावे. ब्लॉगवर उमटत यावे. ब्लॉग म्हणजे रामघळी आहे. रामदासानी आपला दासबोध रामगुहेतच लिहिला. पण कधीतरी आलाच की नाही बाहेर?

पानवाला.