Friday, March 21, 2014

लोकशाहीला राष्ट्रउभारणीचे स्वप्न हवे!

                          आपला भारत हा जर एक स्वतंत्र देश आहे तर तो एक राष्ट्र आहे की  नाही?देश म्हणजे फक्त भूगोल असतो का?ते सर्वांचे एकत्र  जगणे नसते का?इथे जनगणमन हाच भारत भाग्य विधाता आहे ना?हे जनगणमन फक्त निवडणुकीपुरतेच बघायचे का?की नित्याच्या जगण्यातही अनुभवायचे ?India is not a Nation ,She is only a Population--भारत हे राष्ट्र नाही .फ़क्त लोकसंख्या आहे ,असे विषादाने का  म्हणावे लागते बरे ?परिवर्तनवादी चळवळीला सुद्धा असा प्रश्न विचारायला हवा की  जर तुम्ही सतत "आम्ही कधी एक समाज ,एक लोक नव्हतोच. हे राष्ट्र आमचे नाही " असे म्हणत राहणार असाल ,तर या देशाच्या उभारणीचा पाया तुम्हाला कुठे आणि कसा सापडणार?
                               राष्ट्र हे नवनिर्मितीचे, सर्व भारतीयाना  जोडणारे एक विशाल स्वप्न असते. ते शून्यामधून राष्ट्र  उभे करते . शिवरायांनी आपल्या गडांना दिल्लीदरवाजे दिले . हे दिल्ली दरवाजे दिल्लीकडे बघत असतात . महान हिंदवी साम्राज्याचे स्वप्न आपल्या डोळ्याना दाखवत राहतात . मलेशियाच्या पायथ्याशी असलेला भूप्रदेशाचा एक इवलासा ठिपका म्हणजे सिंगापूर !सिगापूर म्हणजे सिंहपूर!भव्य काळ्या आयाळीच्या पराक्रमी सिंहाची नजर उसळत्या समुद्र लाटांकडे आणि समुद्र गर्जनेकडे असायची . तोही गर्जना करायचा . समुद्रातली सुंदर जलपरी सिंहाच्या प्रेमात पडली आणि  त्यांच्या पोटी एक मत्स्यसिंह -Merlion जन्माला आला . सिंहाचे मुख आणि माशाचा देह !हा मत्स्य सिंह सिंगापुराचे  जागते दैवत आहे . या मर्लिऑनने ली क्वान यू (Lee Kuan Yew)नावाचा  आकाश झेलून धरणारा राष्ट्रप्रमुख सिंगापूरला दिला . ली क्वान यू ने सिंगापूर या चिमुट भर  बेटाला  ३६००हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गजबजलेले जागतिक दर्जाचे शहर बनविले आहे . मलेशियाने सिंगापुरावर स्वातंत्र्य लादले . शेती नाही . फलोद्याने नाहीत . दूध दुभते ,पाणीही नाही . ते मलेशियाच्या जोहोरमार्गे नळ टाकून आणलेले. पण आज ऐंशी टक्के नागरिक स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात . स्वीडनच्या बरोबरीने वार्षिक उत्पन्न मिळवतात . आवाजात सिंहाची गर्जना आहे . ली क्वान यू म्हणाले "आमचे नेते कधीही स्वार्थी व आत्मकेंद्री बनूच शकत नाहीत . हा आमच्या राजकीय संस्कृतीचा विशेष आहे . राज रत्नम हे पूर्वीचे तमिळ भाषी उपपंतप्रधान म्हणाले "सिंगापूर हे सशाचे नेतृत्व लाभलेले सिंह प्रजेचे राष्ट्र नाही .कि सशाचे नेतृत्व मिळालेल्या सशांचा देश नाही . या सिंहपुरात सिंह नेतृत्व करील आणि तो सिंह प्रजेचे नेतृत्व करील "सिंगापुरात विविध देशांचे प्रतिनिधी आलेले . तेथे भारत विरोधी वक्तव्य  पाकिस्तानी प्रतिनिधीने सुरु केले मात्र . ली क्वान यू  ताडदिशी उठले आणि पाकिस्तानी प्रतिनिधीच्या बकोटीला  धरून खाली बसविले !
                                        विधायक नवनिर्मितीचे कार्यक्रम नसतील तर केवळ आंदोलने करणे हिंसा पेरणारेच  ठरते . केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध दांडे किंवा झाडू घेऊन उभे राहिले तर हताश, पीडित नागरिकांच्या झुंडी कदाचित तुमच्या मागे आवेगाने धावत राहतील . सतत घोषणा देत राहतील . निवडणुकीने हाती सत्ताही देतील . पण "मी आता पुढे काय करू ? "या प्रश्नाला जमावाकडे उत्तरे नसतात . मग पक्षाला जाहीरनामा उरत नाही . फक्त राजिनामा राहतो . अरविंद केजरीवाल यांनी ग्रीस देशाच्या अथेन्स नगरीतील 'थेट लोकशाही -Direct Democracy प्रकाराचा एक प्रयोग दिल्ली या नगर राज्यात केला . अथेन्स च्या भर चौकात हजारो नागरिक जमा होत . निर्णय घेत . तथापि हे हजारो लोकही काही प्रमाणात लोकप्रतिनिधी होतेच. व्यक्ती आणि जमाव किंवा  झुंड यातील फरक शासनाने दुर्लक्षून चालत नाही . Aristotle या ग्रीक तत्त्वचिन्तकाने लोकशाहीला  झुंड शाही -Mobcracy असे म्हटले आहे . येथे डोकी फक्त मोजली जातात . डोक्यांच्या आत काय आहे हे  पाहिले  जात नाही . लोकशाहीला गुणशाही - Meritocracy भेटायला हवी . रवींद्रनाथ म्हणाले होते की - "माणूस दयाळू   आहे पण माणसे क्रूर असतात "झुंडीला  संयम ,विवेक नसतो .ज्युलिअस सीझरला ठार करणारा  असतो ब्रुटस ! त्याच्या विजयाच्या घोषणा देणारा जमावच Antony या सीझर मित्राच्या भाषणा नंतर  ब्रुटस ला ठार मारायला धावू लागला . उद्या केजरीवाल यांचा पण ब्रुटस होईल काय ?केवळ अरविंद केजरीवाल यांच्याच मागे  नाही तर पश्चिम  महाराष्ट्रातील  आबा  ,राज ,राजू , तात्या ,दादा यांच्या मागे टोल पेटवू ,उस जाळू  झुंडी कशा धावत आहेत ,त्यांच्या धावण्यामागे कोणते हिशेब आहेत हे पाहा! खरेच ,आपण लोकशाही म्हणून  जी जोखीम पत्करली आहे ,तिचा आता शांतपणे विचार करायला हवा !"चला निघूया सरसावोनी ,देशाच्या  उद्धरणी" असा वसा नसेल ,"बलसागर भारत होवो " ही  साने गुरुजींची अंतरी तळमळ नसेल तर आपली  लोकशाही एक वग  ठरेल . महाराज दरबारात येऊ लागले आणि सेवक वराडला "हिप हायणेस ! फलाणे फलाणे  म्हाराज  आ राहे हय !अपना अपना खिसा पाकीट संभालो !!  
 
       पानवाला !

1 comment: