Friday, March 21, 2014

लोकशाहीला राष्ट्रउभारणीचे स्वप्न हवे!

                          आपला भारत हा जर एक स्वतंत्र देश आहे तर तो एक राष्ट्र आहे की  नाही?देश म्हणजे फक्त भूगोल असतो का?ते सर्वांचे एकत्र  जगणे नसते का?इथे जनगणमन हाच भारत भाग्य विधाता आहे ना?हे जनगणमन फक्त निवडणुकीपुरतेच बघायचे का?की नित्याच्या जगण्यातही अनुभवायचे ?India is not a Nation ,She is only a Population--भारत हे राष्ट्र नाही .फ़क्त लोकसंख्या आहे ,असे विषादाने का  म्हणावे लागते बरे ?परिवर्तनवादी चळवळीला सुद्धा असा प्रश्न विचारायला हवा की  जर तुम्ही सतत "आम्ही कधी एक समाज ,एक लोक नव्हतोच. हे राष्ट्र आमचे नाही " असे म्हणत राहणार असाल ,तर या देशाच्या उभारणीचा पाया तुम्हाला कुठे आणि कसा सापडणार?
                               राष्ट्र हे नवनिर्मितीचे, सर्व भारतीयाना  जोडणारे एक विशाल स्वप्न असते. ते शून्यामधून राष्ट्र  उभे करते . शिवरायांनी आपल्या गडांना दिल्लीदरवाजे दिले . हे दिल्ली दरवाजे दिल्लीकडे बघत असतात . महान हिंदवी साम्राज्याचे स्वप्न आपल्या डोळ्याना दाखवत राहतात . मलेशियाच्या पायथ्याशी असलेला भूप्रदेशाचा एक इवलासा ठिपका म्हणजे सिंगापूर !सिगापूर म्हणजे सिंहपूर!भव्य काळ्या आयाळीच्या पराक्रमी सिंहाची नजर उसळत्या समुद्र लाटांकडे आणि समुद्र गर्जनेकडे असायची . तोही गर्जना करायचा . समुद्रातली सुंदर जलपरी सिंहाच्या प्रेमात पडली आणि  त्यांच्या पोटी एक मत्स्यसिंह -Merlion जन्माला आला . सिंहाचे मुख आणि माशाचा देह !हा मत्स्य सिंह सिंगापुराचे  जागते दैवत आहे . या मर्लिऑनने ली क्वान यू (Lee Kuan Yew)नावाचा  आकाश झेलून धरणारा राष्ट्रप्रमुख सिंगापूरला दिला . ली क्वान यू ने सिंगापूर या चिमुट भर  बेटाला  ३६००हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गजबजलेले जागतिक दर्जाचे शहर बनविले आहे . मलेशियाने सिंगापुरावर स्वातंत्र्य लादले . शेती नाही . फलोद्याने नाहीत . दूध दुभते ,पाणीही नाही . ते मलेशियाच्या जोहोरमार्गे नळ टाकून आणलेले. पण आज ऐंशी टक्के नागरिक स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात . स्वीडनच्या बरोबरीने वार्षिक उत्पन्न मिळवतात . आवाजात सिंहाची गर्जना आहे . ली क्वान यू म्हणाले "आमचे नेते कधीही स्वार्थी व आत्मकेंद्री बनूच शकत नाहीत . हा आमच्या राजकीय संस्कृतीचा विशेष आहे . राज रत्नम हे पूर्वीचे तमिळ भाषी उपपंतप्रधान म्हणाले "सिंगापूर हे सशाचे नेतृत्व लाभलेले सिंह प्रजेचे राष्ट्र नाही .कि सशाचे नेतृत्व मिळालेल्या सशांचा देश नाही . या सिंहपुरात सिंह नेतृत्व करील आणि तो सिंह प्रजेचे नेतृत्व करील "सिंगापुरात विविध देशांचे प्रतिनिधी आलेले . तेथे भारत विरोधी वक्तव्य  पाकिस्तानी प्रतिनिधीने सुरु केले मात्र . ली क्वान यू  ताडदिशी उठले आणि पाकिस्तानी प्रतिनिधीच्या बकोटीला  धरून खाली बसविले !
                                        विधायक नवनिर्मितीचे कार्यक्रम नसतील तर केवळ आंदोलने करणे हिंसा पेरणारेच  ठरते . केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध दांडे किंवा झाडू घेऊन उभे राहिले तर हताश, पीडित नागरिकांच्या झुंडी कदाचित तुमच्या मागे आवेगाने धावत राहतील . सतत घोषणा देत राहतील . निवडणुकीने हाती सत्ताही देतील . पण "मी आता पुढे काय करू ? "या प्रश्नाला जमावाकडे उत्तरे नसतात . मग पक्षाला जाहीरनामा उरत नाही . फक्त राजिनामा राहतो . अरविंद केजरीवाल यांनी ग्रीस देशाच्या अथेन्स नगरीतील 'थेट लोकशाही -Direct Democracy प्रकाराचा एक प्रयोग दिल्ली या नगर राज्यात केला . अथेन्स च्या भर चौकात हजारो नागरिक जमा होत . निर्णय घेत . तथापि हे हजारो लोकही काही प्रमाणात लोकप्रतिनिधी होतेच. व्यक्ती आणि जमाव किंवा  झुंड यातील फरक शासनाने दुर्लक्षून चालत नाही . Aristotle या ग्रीक तत्त्वचिन्तकाने लोकशाहीला  झुंड शाही -Mobcracy असे म्हटले आहे . येथे डोकी फक्त मोजली जातात . डोक्यांच्या आत काय आहे हे  पाहिले  जात नाही . लोकशाहीला गुणशाही - Meritocracy भेटायला हवी . रवींद्रनाथ म्हणाले होते की - "माणूस दयाळू   आहे पण माणसे क्रूर असतात "झुंडीला  संयम ,विवेक नसतो .ज्युलिअस सीझरला ठार करणारा  असतो ब्रुटस ! त्याच्या विजयाच्या घोषणा देणारा जमावच Antony या सीझर मित्राच्या भाषणा नंतर  ब्रुटस ला ठार मारायला धावू लागला . उद्या केजरीवाल यांचा पण ब्रुटस होईल काय ?केवळ अरविंद केजरीवाल यांच्याच मागे  नाही तर पश्चिम  महाराष्ट्रातील  आबा  ,राज ,राजू , तात्या ,दादा यांच्या मागे टोल पेटवू ,उस जाळू  झुंडी कशा धावत आहेत ,त्यांच्या धावण्यामागे कोणते हिशेब आहेत हे पाहा! खरेच ,आपण लोकशाही म्हणून  जी जोखीम पत्करली आहे ,तिचा आता शांतपणे विचार करायला हवा !"चला निघूया सरसावोनी ,देशाच्या  उद्धरणी" असा वसा नसेल ,"बलसागर भारत होवो " ही  साने गुरुजींची अंतरी तळमळ नसेल तर आपली  लोकशाही एक वग  ठरेल . महाराज दरबारात येऊ लागले आणि सेवक वराडला "हिप हायणेस ! फलाणे फलाणे  म्हाराज  आ राहे हय !अपना अपना खिसा पाकीट संभालो !!  
 
       पानवाला !

Sunday, February 17, 2013

स्त्रीची गुलामगिरी !

स्त्रियांना वाली उरला आहे का? श्री.म.माटे यांनी कळवळून लिहिलेल्या एका लेखाचे हे शीर्षक आहे.१९५०च्या मानाने लिहिलेल्या निबंधाची शाई आज पुरती  वाळून गेली असली तरी अक्षरातील आग अजून धगधगत आहे.'हाय ए नारी! अजब तेरी कहानी --आंचलमे है दूध और आंखमे है पानी 'ही  व्यथा मांडणारे मैथिलीशरण जाऊनही दशके उलटलीत.पण नारीचे भय इथले संपत नाही.वीरभोग्या वसुंधरा तशा बलात्कारभोग्या नारीच्या डोळ्यातील जलधारा !
                                             ज्या क्षणी निसर्गाने स्त्रीच्या पोटात गर्भ ठेवला ,त्या क्षणी स्त्रीची गुलामगिरी सुरू  झाली .तिची देहरचना भुरळ घालणारी ठेवली.पण,शरीर हतबल राखले.बाईवर पुरुष बलात्कार करू शकतो.पण,सूड म्हणून बाई पुरुषावर बलात्कार करू शकत नाही.निसर्गाने स्त्रीवर क्रूर अन्याय करून ठेवलाय.तिला भोगदासी बनवली.कोणत्याही अर्थाने ती कामवालीच!सभ्य ,सुसंस्कृत पुरुषमन स्त्रीच्या मनाचा  विचार करू शकते.पण अस्मिता,अभिमान,चैतन्य यांनी बहरून ,फुलून येणारे स्त्रीमन कामांध बैलाना का म्हणून उलगडावे?
                                            स्त्री आणि पुरुष यांचे परस्पराबद्दलचे अनिवार आकर्षण ही  वस्तुस्थिती आहे.जगातल्या सर्व स्त्रिया नाहीशा झाल्या तर पुरुषांनी जगायचे तरी कशासाठी? असा प्रश्न पु.भा.भावे यांनी विचारला .तो विचारताना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभावतीबाई होत्या.ग्रीक पुराणकथेनुसार प्रथम स्त्री आणि पुरुष अशी दोन भिन्न शरीरे नव्हती.एकच मोठया चेंडूच्या आकाराचा माणूस होता.चार हातांचा आणि चार पायांचा!प्रचंड ताकद होती त्याला.देवाने माणसाला मधोमध कापले ते भीतीपोटी!तेव्हापासून स्त्री आणि पुरुष हे मानवी शरीराचे दोन्ही भाग अनिवार ओढीने एक होऊ पहातात.पण,आज प्रश्न स्त्री-पुरुष आकर्षण हा नाही.पुरुषाने स्त्रीच्या जगण्याचा चोळामोळा ,चिखलगोळा करून आपल्याच माणूसपणाचा नरक बनवला आहे.नरेचि केला हीन किती नर!हा प्रश्न प्राचीन काळापासून समाजातील विचारवंताना पडलेला आहे.
                                            स्त्री-पुरुष देहरचना ,अनिवार कामप्रेरणा ,बाराही महिन्यांचा हैदोस या सर्व वास्तवामधूनच मला वाटते ,'मानवी मूल्य 'नावाची औषधी माणसाला सापडली असावी.पशू  कधीही बलात्कार करीत नाहीत.त्याना प्रणयाराधनाने संमती मिळवावीच लागते.शिवाय त्यांचे ठराविक हंगाम असतात.माणसाला मग आपल्या जगण्यावर आपणहून निर्बंध आणावेच लागतात.फाशी किंवा लिंगविच्छेदन  ही भीती तकलादू असते. जयवंत दळवी यांच्या 'पुरुष' नाटकातील अंबिका आपटे हि तडफदार बंडखोर स्त्री मात्र   आपल्यावरील बलात्काराचा सूड म्हणून गुलाबराव जाधवाचे लिंगविच्छेदन घडवून आणते.बंडा नावाच्या जहाल तरुणाची तिला साथ मिळते.तरीपण विदारक इतिहास असा आहे की माणसे सातत्याने सर्वसंहारक युद्धावर जात राहिली.युद्धकाळातच जेत्याचे सैन्य जित  राष्ट्रात घुसते तेव्हा सैनिक कुठल्याही देशाचे असोत,ते बंदुका बाजूला ठेवून विजारीची बटणे सोडू लागतात.दुसरे महायुद्ध घ्या!पराभूत झालेल्या जर्मनीतील स्त्रिया असोत,व्हिएतनाममधील अमेरिकेचे भक्ष्य ठरलेल्या स्त्रिया असोत,जपानी सैनिकांचे भीषण बलात्कार असोत सर्वत्र स्त्रिया कामवासनेच्या भयानक बळी ठरल्या आहेत.भारताच्या फाळणीवेळच्या कथा तर आजही 'जळो जळो जिणे,  लाजिरवाणे' करून  सोडतात.
                                                 जे मानवी आहे ते सारे मानीव आहे.नर आणि मादी ही   दोनच नाती निसर्ग जाणतो. आई,बाबा,भाऊ,ताई ही नाती माणसाने निर्माण केली आहेत.जगण्याला सुगंध आणला आहे.वासनांचा दर्प घालवला. देहभाव ही  प्रकृती.देहाची दादागिरी रोखण्यासाठी येतो तो देवभाव.त्याला संस्कृती म्हणायचे.संस्कृती  म्हणजे माणसानेच आपल्या जगण्याला दिलेला आकार.ज्याला कुठे आणि कसे थांबावे हे कळते  त्यालाच चालण्याचा आणि धावण्याचा अधिकार असतो.गाडी चालवायला शिकणारा जो त्याला भरधाव गाडी कोठे  कशी कचकन थांबवायची हे शिकावे लागते.हे थांबणे आपल्या आणि  इतरांच्या हिताचे असते.मनाला ब्रेक नाही ही  आजची शोकांतिका आहे. माझे 'अस्तित्व 'ही एकच  गोष्ट मला पक्की ठाऊक आहे.त्या  अस्तित्वाला कुठे न्यायचे ,कसे बदलायचे,सजवायचे हे सारे माझे मी ठरवीन.तुम्ही कोण सांगणार?नाहीतरी  सामान्य माणसाचे जगणे म्हणजे श्री.ना. पेंडसे यांच्या 'गारंबीच्या बापू' मधले व्याघ्रेश्वराचे देऊळच !आण्णा खोतांच्या प्रणयलीला व्याघ्रेश्वराला साक्ष ठेवूनच होणार.असा एक हताशपणा साहित्यामधून रोजच्या जगण्यात  उतरतो आहे.पण,माझे 'अस्तित्व'निश्चित झाल्यावर त्या अस्तित्वाच्या अर्थपूर्णतेचा विचार नको का? ही  मानवी मूल्ये सांगणारी कथा महाभारतात आहे.रामायणात आहे.श्री.म.माटे सांगतात 'स्त्रीचे अपहरण करणारा  जो त्याला देहांताचे शासन करणे हे रामायणाचे सारसर्वस्व आहे.द्रौपदीचा अवमान आणि आणि त्यासाठी  श्रीकृष्ण भगवानांनी घडवून आणलेले भारतीय युद्ध हीच महाभारताची मध्यवर्ती कल्पना आहे. महाभारताची मुख्य निशाणी  द्रौपदीच्या मानभंगाचा सूड ही आहे'.माणूस हे नुसते जगत राहणे नाही.ते सतत घडत  राहणे असते.माणूस बनण्यासाठी ती उमेदवारी असते.
                                                     आज तरुणाई भरकटत आहे.तरुणांच्या जगण्यापुढे सुंदर सुंदर स्वप्नेच नाहीत."जीवनदीप जले ऐसा --सब जगको ज्योति  मिले'हे गीत त्यांच्या कानावर पडत नाही.मोठी माणसे माती पिकवत नाही. फक्त खात राहतात.आणि रानटी कुत्री शिकार शोधण्यासाठी रानभर झुंडीने धावत राहतात.शिकार खाली पडायच्या  आधीच निम्मी खाऊन टाकतात.असेच सावज परवा दिल्लीत खाल्ले गेले.गल्लीतही वेगळे  घडणार नाही.
                                                एक अस्वस्थ करणारी बाब म्हणजे शाळा, महाविद्यालये यामधील पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी जी मराठी, इंग्रजी पाठ्यपुस्तके तयार होताहेत त्यातील मजकूर.त्याचे कठोरपणे  परीक्षण करायला हवे. धड्यांचे गाभे न्याहाळले पाहिजेत.परिवर्तनवाद, दलितवाद यांच्या नावाखाली  नको ते साहित्य मुला-मुलीपुढे येते  आहे का ते पाहणे गरजेचे आहे.मुलाच्या ठायी आईबद्दलचे सुप्त लैंगिक  आकर्षण म्हणजे इडीपस कॉम्प्लेक्स .इडीपस हा राजा होता.दलित जीवनाची या देशांतील उपेक्षा असह्य  आहे.पण एक दलित कवी लिहितो "हे भारतमाते !मी इडीपस बनून तुझ्या कुशीत शिरलो तर काय करू?"ही  कविता पाठ्यपुस्तकात आली तर कळण्याचे तारतम्य मुलाना आणि शिकवण्याची पुरती पक्वता शिक्षकांना  असेलच का? कुसुमाग्रजांनी एक कथा सांगितली .बकाल चाळीतल्या बेकार मवाल्यांनी आवारातली  एक कोंबडी चोरून कापली.शिजवली.ताटे मांडून सारे खायला बसले.तेवढ्यात उघड्या दरवाज्यातून  कोंबडीची सात पिले आत आली.चिव चिव करीत पातेल्याभोवती फिरू लागली.मवाल्यांच्या डोळ्यातही पाणी आले.ते ताटे टाकून  निघून गेले.हा साहित्यातला परतत्त्वस्पर्श  पाठ्यपुस्तकामधून घडवायला  हवा की  नको? स्वातंत्र्यदेवीची हीच विनवणी आहे --
                                  "'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी
                                                   करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळू नका!"
 पानवाला.   

Monday, December 17, 2012

गुलामांची मुक्ताई हेरिएट टबमन !

रेड इंडियन माणसांची भूमी आणि त्यावर नीग्रो गुलामानी  फटके खात गाळलेला घाम ,सांडलेले रक्त यामधूनच आजची अमेरिकन श्रीमंती उभी राहिली आहे।श्वेत माणसांचा हा अश्वेत इतिहास आहे.इ.स.१४०० ते १८०० या कालखंडात पश्चिम आफ्रिकेच्या किनारा पट्ट्यातून नीग्रो मानवमेंढरे-स्त्री -पुरुष ,कच्ची बच्ची लेकरेसुद्धा फटके खात ,उपाशी पोटी,ओंडक्याप्रमाणे जहाजात आडवी रचून अमेरिकेत ओतली जाऊ लागली."अनंत अमुची ध्येयासक्ती -अनंत अन आशा "गाणारे कोलंबसाचे गर्वगीत असंख्य निरपराध ,लाचार माणसांच्या थडग्यावर नाचत राहिले .
                                               पण छळाला बळ येतेच.दुःखाला वाचा फुटतेच.अमेरिकेत "Uncle Tom's Cabin"ही अक्षरदाह घेऊन कादंबरी आली.Harriet Stoveच्या घळघळत्या लेखणीमधून.या कादंबरीने गुलामगिरी प्रश्नावर अमेरिकेत 'नागरी युद्ध '-Civil War पेटवले.आजही 'रूट्स 'ही नीग्रो कुटुंबाची मरणगाथा वाचा.Alex या कृष्णवर्णीय लेखकाने लिहिलेली ही ' पापाची मुळे 'वाचलीत तर "जळो जळो जिणे लाजिरवाणे "असे होऊन जाईल .अमृतातेही पैजा जिंकणारी अक्षरे ज्ञानोबानी आणली.मरणातेही खाली मान घालायला लावणारी अक्षरे Alex यांनी जगभरच्या मनाना दाखवली.नीग्रो मनात खदखदणारा  लाव्हा रस जोरदार फवारा टबमन या कृष्णवर्णीय गुलाम स्त्रीच्या रूपाने जमिनीतून वर आला.पण हा लाव्हा जमिन जाळणारा नव्हता.टबमनला "मोझेस 'हा किताब माणसांनी दिलेला.टबमन येशूच्या हाकेने भारावलेली होती.येशूने हिब्रू लोकाना स्वतः  स्वातंत्र्याच्या मुलखात आणले होते. म्हणून येशु होता 'मोझेस'.टबमननेही नीग्रो लोकांच्या असह्य वेदनांना मुक्तीच्या वाटा उघडून दिल्या.म्हणून ती 'मोझेस'.
                                                   टबमन अमेरिकेच्या डॉरचेस्टर परगण्यातील Mary Land मध्ये १८२०या वर्षी जन्माला आली .बाप रिट ग्रीन आणि आई बेन रॉस .दोघेही घनघोर गुलामगिरीत रुतलेले.मालकीण होती मेरी ब्रोडेस .गोरी वतनदारीण ,जमीनदारीण ,लागवडदारीण ,आणि गुलामांची हाडवैरीण!Madison आणि Maryland जवळून वाहते त्या नदीचे नावच पडले 'Black Water' या नदीचा काठ गुलामांच्या रक्त आणि घामात भिजायचा. पाच वर्षांची टबमन एका नर्सच्या हाताखाली तान्ह्या मुलाना सांभाळण्यासाठी नेमलेली.मुले रडू लागली की टबमनच्या पाठीची कातडी काढली जायची.कुठून कुठून चिंध्याचिरगुटे गोळा करून अंगाला लपेटून घ्यायची. एकदा गुदामाजवळून मालकाचे न ऐकता निघून जात होता एक गुलाम.त्याच्या डोक्याचा नेम धरून  मालकाने जड गोळा फेकला.तो लागला टबमनला .डोक्याची कवटी फुटली.मेंदू कायमचा आजारी बनला.फिट्स  यायच्या.बेशुद्ध अवस्थेत छोटी टबमन पडून राहायची.नाही अन्न,नाही दवापाणी !मेंदूच्या दुखण्यातून  टबमनला आकाशातला बाप भेटला.तिला दृष्टांत होऊ लागले.अंधारातून रस्ता दाखवणारा,मानवमुक्तीचे  स्वप्न पेरणारा 'प्रभूचा आवाज'टबमनला जन्माची साथ करीत राहिला.टबमन हाच एक चमत्कार आहे.
                                             अशक्त ,आजारी टबमन काय कामाची ?तिची विक्री करण्याची धडपड सुरू झाली.१८४९ मधील गोष्ट.टबमनने  ठरवले की आपण पळून जायचे.स्वातंत्र्याच्या मुलखात पोचायचे.दोन भावाना घेऊन रात्रीचे  तिने केलेले पलायन फसले .भाऊ कच खाऊन गुलामगिरीत परतले.पळून गेलेल्या गुलामाना  पकडून आणण्यासाठी गुंडांच्या टोळ्या मागे लागत आणि बक्षिसे कमावत.भयंकर शिकारी कुत्री हुंगत हुंगत  झाडाझुडपातून त्तपास करायची. टबमनच्या स्वातंत्र्याच्या ध्यासाने अमेरिकेत एक विलक्षण मुक्तिमार्ग  तयार केला होता.
                                        भूमिगत  रेल्वेचे अचाट जाळे (Underground Railroad). देवकीनंदन कंसाच्या तावडीतून  सोडवण्यासाठी यमुनेने रस्ता खुला केला.यशोदेच्या कुशीत गोपाळाला पोचवले.तसेच गुलामीच्या नरकयातना  भोगणारे गुलाम अभागी जीव याना विशेषतः दक्षिण अमेरिकेतील टेनेसी वगैरे कर्दनकाळ मुलखामधून  लपतछपत ,ओसाड पडक्या घरातून ,गोठ्यातून एका रात्रीचा मुक्काम करत ,अर्धपोटी ,पायाच्या  चिंध्या करीत  कॅनडा देशाच्या मुक्त प्रदेशात पोचवणारी एक अनौपचारिक संघटना होती.तिलाच म्हणायचे 'भूमिगत रेल्वेमार्ग'  काही धनिक,उदारमतवादी गोरे धाडसी नागरिक आपला भक्कम आधारही उभा करायचे.त्याना म्हणत  Quacks. एरवी या शब्दाचा अर्थ आहे दांभिक वैद्य.पण तो शब्द दाम्भिकाविरुध्द उठणारा  असा अर्थगौरव घेऊन उठला.पसार झालेले गुलाम पकडले गेले तर हातपाय तुटणे ,प्रसंगी शिरच्छेद्सुद्धा ! नायगरा धबधबा ,बफेलो शहर ,ईरी कालव्याभवतालचे लॉकपोर्ट  येथेही आजही भूमिगत रेल्वेमार्गाचा  इतिहास बोलला जातो,लिहिला जातो.
                                         या भूमिगत रेलमार्गाने टबमन मुक्तियात्रेला  निघाली.पूर्ण खबरदारीने. Delaware मार्गे  उत्तरेला पेन्सिल्वानिया ,फिलाडेल्फिया  वगैरे गुलामी बेकायदेशीर मानणारा नव्वद मैल दूरवरचा प्रदेश गाठण्यासाठी  टबमनने तीन आठवड्यांची तंगडतोड केली.वाटेत निबिड अंधार.वरून केवळ उत्तरेची  तारका करणार  दिशेचे मार्गदर्शन!चिडीचिप जायचे.पुढेही गप्पच राहायचे.फिलाडेल्फियात टबमन येऊन पोचली.प्रभूचा बळकट  हात पाठीवर होता!
                                             आता कुटुंबीय ,परिवार आणि गुलामीत खितपत पडणारा नीग्रो माणूस याना स्वातन्त्र्याचा  प्रकाश भेटवायचा होता.पेनसिल्वानिया,फिलाडेल्फिया वगैरे गुलामी बेकायदेशीर मानणारा  प्रदेशही  '१८५०चा फरारी गुलामांच्या अटकेचा कायदा'उगारून ऊग्र झाला.फरारी नीग्रो गुलाम पकडून देणे हे सरकारी अधिकारीपदाचे  कर्तव्य ठरले.अंधार गडद झाला.टबमनची हिम्मत खचली नाही.
                                         सतत अकरा वर्षे टबमन वारंवार Marylandच्या भागात येत राहिली.तेरा मोहिमामधून  तिने ७०गुलामाना मुक्तिधाम मिळवून दिले.विलक्षण व्यवहारचातुर्य अंगी!धैर्य अपार!!.हातात पिस्तुलही  असायचे.गुंडांच्या टोळ्या,शिकारी कुत्री यांच्यासाठी ते पिस्तुल होते.कचखाऊ गुलामाना प्रसंगी प्राणांची  भीती घालून टबमनने कॅनडात पोचविले.जॉन ब्राऊन  या सशस्त्र क्रांतिकारक मानवताभक्ताच्या बाजूने टबमन उभी राहिली.जॉन ब्राऊन रण हरला.फासावर चढला.
                                       नागरी युद्धात  उतरली रणरागिणी !
                      गुलामीच्या प्रश्नातूनच  अमेरिकेत नागरी युद्ध पेटले.दक्षिणेकडील राज्ये गुलामगिरीची कडवी समर्थक होती. अमेरिकेची एकात्म संघराज्याची मागणी अब्राहम लिंकनच्या नेतृत्वाखाली झालेली होती.गुलामीच्या  निर्मूलनाला कटिबद्ध झालेल्या अब्राहम युनियन आघाडीच्या बाजूने ताठ उभी राहिली टबमन !पोर्ट रॉयल येथे शुश्रूषा केंद्रात सेवाभावी काम करू लागली.युद्धहेर  म्हणून तिचा वावर असायचा.भुयारी मार्गांनी  टबमन सर्वत्र फिरलेली होती.नागरी युद्धात रणांगणी वावरणारी टबमन ही  पहिलीच स्त्री! कुम्बी नदीवरील हल्ल्यात टबमनच्या सहभागाने सातशेहून अधिक गुलामांची मुक्तता साधली.नागरीयुद्ध नागरी स्वातंत्र्याच्या  बाजूनेच संपले.टबमन शांतपणे Auburnला  एका छोट्या गावातील छोट्या निवासात परतली.
                        पण छळ  संपला नव्हता.नागरी युद्ध लढून रेल्वेने न्यूयॉर्कला परत जात होती रणरागिणी!पण उन्मत्त  रेल्वे कंडक्टरने  तिच्या दंडाला धरून तिला बाजूच्या भंगार डब्यात फेकून दिले.हाड मोडले.युद्धकाळात  तिला  नियमित पगारही मिळायचा नाही. १८९९पर्यंत पेन्शनचा सुद्धा पत्ता नव्हता.निग्रोद्वेष  रोमारोमात भिनलेली  गोरी माणसे सर्वत्र असायची.
                          Auburnला इवलेसे स्वतःचे घर होते.निर्वाहाला पैसे कुठून आणणार ?आयुष्यभर कफल्लक!मग टबमन हलकीसलकी कामे करू लागली.दोन संभावितानी सोन्याच्या लगडीचे आमिष दाखवून उसने  पैसे उभे करायला टबमनला लावले.टबमनने उधारउसनवार केली.पैसे लुबाडून ,टबमनला बेशुद्ध होईपर्यंत  मारझोड करून संभावित पळून गेले.संध्याछाया उतरू लागल्या.टबमनने स्त्री-पुरुष समानतेचे व्रत घेतले.परिषदांना  जायचे तर रेल्वेला पैसे नसायचे.एकदा आपली गाय विकून तिकिटाला पैसे उभे केले.पण हातपाय  गाळले नाहीत.
                     आपले घर चर्चला टबमनने देऊन टाकले."निर्धन काळ्या वृद्धाना राहायला जागा द्या"ही अटही चर्चने  मानली नाही.१९११मध्ये टबमनचे थकलेले शरीर विश्रामधामात ठेवले."एका व्याधिग्रस्त आणि कफल्लक  टबमनला मदत करा"हे वृत्तपत्रांचे पब्लिकला आवाहन!
                  न्यूमोनियाने ग्रासले. काही मित्र आणि कुटुंबीय यांच्या साक्षीने १० मार्च १९१३ रोजी टबमनने प्रभूच्या मुक्तिधामाचा  रस्ता धरला! "मी तुमच्याकरिता एक जागा मोकळी करून जात आहे"हे शेवटचे शब्द होते!  १० मार्च १९१३ रोजी टबमन गेली.म्हणजे १० मार्च २०१२पासून तिची पुण्याशताब्दी सुरु झाली आहे.
                                            येथे कर माझे जुळती!
             पानवाला.

Sunday, December 9, 2012

एसटीची रंगभूमी!

महाराष्ट्रातील परिवहन मंडळाने एसटी गाडयांच्या  माध्यमातून एक अभूतपूर्व संपर्कपर्व  घडवून आणले आहे.एक सामाजिक ,राजकीय,सांस्कृतिक अभिसरण आंदोलन उभे केले आहे.याची विचारवंतानी ,लेखकांनी फारशी दखल घेतलेली आढळत नाही.आज एसटी गाडया म्हणजे जणू देहातील मज्जासंस्था वा नससंस्था बनल्या आहेत.देहातील लक्षावधी पेशी जाणिवांचे दळणवळण  घडवतात.मेंदूकडे वार्ता पुरवतात.मेंदूचे संदेश गात्राना सांगतात.देहाचे स्वास्थ्य ,अस्वास्थ्य माणसाला कळत  राहते.महाराष्ट्रातील सर्व माणूसवस्त्या बहुतांशी एसटीने जोडल्यात.माणसे एकमेकाना जोडलीत.भेटवली  आहेत.उपजीविकांच्या जागा त्याना दाखवल्या आहेत.तिकडे नेले आहे.परत आणले आहे.पाठीवरची ओझी उतरून घेतलीत.यामधून कितीतरी आनंद ,धन्यता ,दुःख -दैन्य  सांगत कथा खुल्या होतात.कथा,कादंबरी,नाटक याना कथानके उपलब्ध झालीत.
                  एसटी गाडी ही  गरिबांचे प्रवाससाधन आहे. साहजिकच एसटी रंगभूमी ही  श्रमिक ,कष्टकरी ,गरीब माणसाची लोकरंगभूमी आहे.घरोघरी भरपूर स्वास्थ्य ,खुळखुळाट असणारी माणसे आज दारी दोन किंवा तीन चारचाकी वाहने बाळगून आहेत.आरामशीर,प्रचंड भाडेदर असणारी गाडी लीलया अंगाखाली घेऊन गुबगुबीत माणसे सहली,मौजमजा करायला जातात.वातानुकूल खाजगी शयनगृहे घेऊन चक्रवर्ती अप्सरा धावतात.श्रीमंतापरी गरिबा कोठे दरवळ तो सुखवितो?कच्चीबच्ची ,थाळी-चिरगुट यांच्यासह बाहेर पडतात त्याना महाराष्ट्रात फक्त एसटी गाड्यांच  कुशीत घेतात."जेथे जेथे काबाडकष्टी -तेथे तेथे धावे एष्टी "हे गरिबाचे वाहन एसटी रंगभूमीने नित्य  न्याहाळून घेतले पाहिजे.त्यामधून स्वतःची नाटके रंगभूमीला मिळतील.विषयानुसार सादरीकरणाचे आकृतिबंध (Forms)उभे करावे लागतील.रंगभूमी नित्य परिवर्तनशील ,लवचिक असते.साहित्य स्वतःचा आकृतिबंध घेऊन जन्माला येते.यासाठी एसटी श्रमिक रंगभूमीने (तिला लोकनागर रंगभूमी असेही म्हणता येईल.)एकूण लोकरंगभूमीशी गहिरे नाते जोडावे.भावना,आवेग त्यांच्या पायाखालच्या मातीची भाषा बोलतात.पूर्वीचे वग  वाचावेत.जात्यावरच्या ओव्या ऐकाव्यात.श्रावणातल्या कथा समजून घ्याव्यात.आठवडी बाजारातील घासाघीस ऐकावी.फुक्कट चौकश्या करून चालू लागलेल्या इष्टुरफाकड्याकडे  बघत पाटीवाली म्हणते "खिशात न्हाई आना  आणि म्हने पाटील म्हना !" याने एकूण मराठी रंगभूमीचाच  कायापालट होईल.
                          आज मला एसटी नावाचा जो लोकजागर दिसतोय,ऐकायला येतोय ,वृत्तपत्रातून पोचतोय त्याच्या  आधारे मराठी नाटकासाठी दोन आग्रही विषय  मला जाणवत आहेत.
                 १. कालचक्र सतत फिरते तसे महाराष्ट्राचे  दैनंदिन जीवनचक्र एसटीच्या रूपाने सतत फिरत आहे.एसटी बंद  की  महाराष्ट्रही एकदम बंद होतो.हे ध्यानात घेऊन सारे आंदोलक महाराष्ट्र बंद पाडण्यासाठी एसटी गाड्या  प्रथम बंद पाडतात.आंदोलक लगोलग बसेस फोडतात,तोडतात ,आगी लावतात.गेल्या काही महिन्यात  किती एसटी गाड्या जाळून टाकल्यात याचा हिशेब करावा.कुचंबलेली ,भ्यालेली,होरपळलेली अश्राप  माणसे डोळ्यासमोर आणावीत.महाराष्ट्रातील ही  एक सार्वजनिक शोकांतिका वरील सर्व हिंसक घटनांच्या  संवेदनशील,सूक्ष्म ,साक्षेपी ,निःस्पृह विश्लेषणातून एसटी रंगभूमीला "अग्निदाह ","अग्निदिव्य" किंवा "दाह"नावाचे ताकदीचे नाटक देऊ शकते.
                      २.एसटी कर्मचारीही श्रमिक वर्गातील आहेत.येथे पेशा महत्त्वाचा .जात ही  महत्त्वाची नाही.
     शारीरिक कष्ट करणारा बसचालक (ड्रायव्हर )हा घटक एक उदाहरण आहे.या चालकाचे गाडी चालवणे,दुरुस्त करणे, एकाग्रचित्त राहणे,मुक्काम करणे, आसरा-अन्न,संसारापासून सतत दूर राहणे,बायकापोरांची  काळजी,मुख्य म्हणजे शारीरिक आरोग्य हा विलक्षण अस्वस्थ करणारा विषय आहे.वाहनचालकाच्या  आरोग्यविषयक समस्यांचा गंभीरपणे विचार आयुर्वेदाचार्य श्री.बालाजी तांबे यांनी नुकताच  दै.सकाळच्या आरोग्य पुरवणीमधून मांडला आहे. तर या चक्रधरांच्या संसार कथा नाटकाना आशय पुरवतील. एसटी कर्मचारी कलाकार,कथाकार म्हणूनही प्रवेश करतील.पहाडी आवाजात पोवाडे ऐकवणारा एक कंडक्टर मला मिरज-बोरीवली  बसमध्ये भेटला होता.आजरा -पंढरपूर बसमध्ये माणुसकीचा गहिवर आणून सगळ्या  प्रवाशाना सांभाळत नेणारा कंडक्टर मी देखिला .बसची पंढरी झाली.या विठोबाला आणाना  रंगभूमीवर!
                         कला क्रीडा क्षेत्रात स्पर्धा घुमू लागल्यात. तिथेही जागतिकीकरण येते आहे.जागतिक पातळीवरची सुवर्ण, रजत पदके मोह घालीत आहेत.लोककलांचे श्वास घुसमटत आहेत.मातीशी नाते तुटत आहे.आईचे दूध  बाटलीत भरले जात आहे.अखिल भारतीय मेळाव्यात आमचे डफ ,झांज,तुणतुणे शहरी सोंग बनले.स्वयं  नादब्रह्मात गुंगून जाणारा जो  खग त्याला पक्षीप्रदर्शनात कंठ फुटत नाही.नाटक हे कलाकार व प्रेक्षक यांनी एकमेकाना भेटणे आहे. लोककलांमध्ये प्रेक्षकसुद्धा रंगभूमीचा एक भाग असतात.नाटक म्हणजे आपण आपल्याला  पाहणे असते. दाखवणे  कमी असते.स्पर्धा या चुरस,द्वेष, संशय वाढवतात.तडजोडी करायला लावतात.मग नाटकावरचे लक्ष उडते.कलाकाराना चिंब होता येत नाही.म्हणून स्पर्धांच्या आहारी जाणे नको. नाटकाने स्वतःची रबरी गादीवरची कबड्डी होऊ देऊ नये!महाभारतापासून कबड्डी हा सामूहिक व्यायामप्रकार  ठरला आहे. अभिमन्यू,अर्जुन कबड्डीपटू होते.कबड्डीचा सूर हा प्राणायाम आहे.शिवरायांनी मल्लखांबासारख्या व्यायामप्रकाराना खास प्रोत्साहन दिले.मातीतली कबड्डी गावोगावी आणली.गावाच्या वेशीवर मारुतीचे देऊळ आणि गावात तालीम आली की सशक्त तरुण वर्ग गावाचे रक्षण करू शकतो.रामदासाना  ही  दृष्टी होती.कबड्डी रबरी गादीवर वर मर्यादित झाली  तर छोट्या छोट्या तालमीनी काय करावे?क्रीडा संस्थांनी महागडी रबरी  गाद्या  कोठून आणाव्यात ?कबड्डी, नाटक हे बहुजनांचे जगणे आहे.तो एक जागर आहे.या दृष्टीने  स्पर्धा जरूर  करावी पण ती स्वतःशी!आपणच आपणाला सतत मागे टाकत जावे.नाटक हा प्रयोग असतो. आवृत्ती काढणे नसते.प्रत्येक प्रयोगात नाटक कलाकारांना नव्याने कळत जाते.स्पर्धांच्या जल्लोषात नाटकांचे  हे प्रयोगपण हरवणार नाही,हे आपण जरूर जरूर पाहिले पाहिजे!
 पानवाला !

Monday, November 5, 2012

कभी अलविदा ना कहना!

माणूस सतत माणसाच्या शोधात असतो.त्याला मित्र हवा असतो.संकटी धावून येतो म्हणून तो मित्र नव्हे.उपाशी मित्राला भरले ताट देणे,सणासुदीला नवीन कपड्यांच्या  घड्या उशापायथ्याशी आणून ठेवणे हा मदतीचा हात झाला.परोपकारातून मैत्री जुळत नाही.द्रौपदीला कृष्ण वस्त्रे पुरवत राहिला.त्याला द्वारकेची बाजारपेठ दाखवायची नव्हती.कृष्ण द्रौपदीचा सखा होता.त्याचे काळीज द्रौपदीच्या आभाळफाटल्या स्थितीने स्वतःच विवस्त्र होऊ पाहत होते.द्रौपदीचे मन तो जाणत होता.तिची हैराणी त्याला पुरती उमगली होती.त्याचे आणि द्रौपदीचे दुःख वेगळे नव्हतेच.एकमेकाना कडकडून भेटणे ,अंतरीचे धागे वस्त्राप्रमाणे घट्ट विणणे हे घडते तेथे मैत्री जुळते.यालाच सामाजिक मानसशास्त्र Social penetration-आतून एकमेकात भरून राहणे ,असे म्हणते.कुणीतरी मला आरपार जाणलंय,मला समजून घेतलय ,माझ्या गुणांबरोबर माझ्या दोषांचाही प्रेमाने स्वीकार केलाय,अशी अंतरी घट्ट गाठ बसली की माणसे प्रसंगी बेशक  धाडधाड भांडतात .अबोला धरतात.प्रचंड संतापाने आपल्या घरच्या कपबशांचा सेट फोडतात आणि दुसरे दिवशी नवीन सेट घेऊन मित्राच्या दारी उभी राहतात.मी आहे तस्सा मला जवळ करणारा कुणीतरी मला हवा असतो.ही काळजाची भूक अन्नाच्या भुकेपेक्षाही मोठी असते.मग मान,प्रतिष्ठा .मतमतांतरे काहीकाही आड येत नाहीत.पु.भा.भावे आणि ग.दि.माडगुळकर वेगळ्या झेंड्यांची माणसे होती.पण एकमेकावाचून त्याना चैन पडायचे नाही.गप्पा मारून एकमेकाना आपापल्या घरी पोचवत राहायचे.एके दिवशी उभयतांचे कडाक्याचे भांडण झाले.भावे तरातरा घरी गेले.दुसरे दिवशी तेच भावे निमूटपणे माडगुळकर यांच्या अंगणात तुळशीवृंदावनापाशी उभे राहिले.आण्णा माडगुळकरसुद्धा खाली मान घालून समोर उभे!भावे पुटपुटले ,"काल माझे चुकले बांडुंगबुवा!"(भावे-माडगुळकर एकमेकाना नव्या नव्या टोप्या घालायचे)माडगुळकर खालच्या सुरात म्हणाले,"मी तरी काही   कमी गाढवपणा केला नाही". एवढे म्हणायचा अवकाश ,दोघांनी शड्डू ठोकून कुस्तीचा पवित्रा घेतला.दुरून माडगुळकर यांची आई भरल्या डोळ्यांनी आशीर्वादपूर्वक हसत होती. रामाला कुणी जिवलग मित्र नव्हता.कृष्ण मात्र जगाचा सखा होता.म्हणून कृष्ण ज्याचा त्याचा मित्र ठरतो.लोकगंगेत कृष्ण      नाचतो.त्याच्या पाठीवर थाप मारून कुणालाही त्याच्याशी बोलता येते.सुदाम्याला पोह्यांची पुरचुंडी घेऊन त्याच्याकडे  जावेसे वाटले.
                                       हातचे राखून मैत्री होत नाही. अंतःकरणाचा कौल घ्यायचा असतो.भौगोलिक अंतर पडले  तरी आंतरिक नाते सुकत नाही. 'मित्र कसे मिळवावेत आणि त्यांच्यावर प्रभाव कसा टाकावा?'यावर पुस्तके आहेत. पण पोथ्या वाचून कोणी आजवर कुणावर जीवापाड प्रेम केलेले नाही. माझा सावंतवाडीचा परममित्र  रमेश चिटणीस आनंदमार्गाचा पराकोटीचा भक्त.पण मला कधीही दीक्षा द्यायला पाणी घेऊन नाही आला. कवटीनाच त्याच्या मार्गात होता म्हणे!मला कधी दिसला नाही.आनंदमार्गावर त्याने भाषणे ठेवली.आपण बोलला. एकदा मी भरसभेत त्याची टिंगलटवाळी केली."काखेतले आणि नाकातले केस काढायचे नाहीत म्हणे! कलकत्त्याला जाऊन आनंदमूर्तींकडून वेताच्या छड्या अंगभर खायच्या म्हणे!काय रे तुमचा हा आनंदमार्ग ?"मी म्हणालो.पण मित्र रागावला नाही.समारोपात माझ्याकडे वळून म्हणाला "माझ्याकडे बटाटेवडा  नव्हता म्हणून!नाहीतर याच्या तोंडात कोंबून त्याचे भाषण बंद पाडले असते!"कलकत्त्याच्या बाबांच्या  छड्या खाऊन परत येताना माझ्यासाठी मित्राने रसगुल्ले आणले.आमच्यात गैरसमजाला वावच नव्हता. मी सावंतवाडी सोडून सांगलीस कायमचा  परतण्याचा निर्णय  घेतला.माझ्याकडे मित्राने डोळ्याचे डोह करून  खूप वेळ पाहिले.स्वस्थ राहिला.घायकुतीला आला नाही.निरोप घेऊन दूर गेल्याने मैत्रीला गंज येत नाही. खलिल जिब्रान यांचा प्रेषित (Prophet)सांगतो-"तुमचा जिवलग मित्र तुमच्यापासून दूर अंतरी जातो तेव्हा  शोक करायचा नाही.उलट तुमचे त्याच्यातील ज्या गुणावर अतिशय प्रेम आहे त्या प्रेमगाभ्याचे स्वरूप तुम्हाला विरहातच  अधिक स्पष्ट दिसू लागते.पर्वतारोहण करणारा जो त्याला तो पर्वत तळातल्या सपाट मुलखातूनच चांगला स्पष्ट आणि एकसंध दिसतो!शब्दावाचुन   कळते सारे शब्दांच्या पलिकडले !
                                                    मैत्रीचे गणित नसते.कुणाशी किती  काळात,कोणत्या प्रसंगात मैत्री जुळेल याचा  मंत्र नाही.ती एक ईश्वरी देणगी आहे.तुमचे भाग्य आहे. प्रसन्नता बाळगल्याचा तो प्रसाद आहे.राजाराम महाविद्यालयात  तात्पुरत्या नेमणुकीने मी आलो होतो.पुढची खात्री नव्हती.सरकारी महाविद्यालय!त्यामुळे नेमणुकीनंतर  पगाराचा आदेशकागद कचेरीत कधी पोचणार  याची हमी नाही. पैशावाचून कसा राहणार?संसाराला  लागलो होतो.कोणी तसा ओळखीचा नव्हतां.माझ्या चेहरा पाहून माझी चिंता एका तरुण गोखले- बापट यासारख्या आडनावाच्या प्राध्यापकाने जाणली.मी मित्रप्रेम शोधतो हे त्या देवदत्त मित्राने ताडले असणार.तो माझ्याकडे आला. त्याचा पगार नुकताच झाला होता.पगाराचे अख्खे पाकीट त्याने माझ्या हातात दिले. खांद्यावर हात ठेवला."तुझा पगार होईल तेव्हा रक्कम परत कर.संसाराची काळजी घे!"एवढेच बोलून तो निघून गेला. मी नंतर पैसे परत केले.मित्राने कधीही वाच्यता केली नाही.आज तो कुठे आहे ते मला ठाऊक नाही.या मित्राला मी कसा विसरू?
                                                     परवाच मला अचानक एक फोन आला.चाळीस वर्षांपूर्वीच्या माझ्या  कॉलेज मित्राने दणकेबाज आवाजाने जणू माझे कान धरले!"भाव्या,साल्या मला विसरलास?इथे माझ्या शेतातल्या ओल्या शेंगा तुझी आठवण काढून वाळून जाताहेत.तुझा पत्ता नाही.पंढरपूरला ये.मी तिथे  आहे  .
चंद्रभागेच्या वाळूत बसू..एकमेकाच्या अंगावर पाणी उडवू.शेंगा खाऊ"मला आता गोपाळ  देशमुखाची मूर्ती लख्ख दिसू लागली.कॉलेजच्या होस्टेलवर तो राहायचा.गावाहून शेंगांचे टिक्के म्हणजेच मोठे बोचके आणलेले असायचे. मी गोपाळाला  कॉटवरून उठवायचो आणि खुर्चीवर अभ्यासाला बसवायचो .आणि मग त्याच्या
कॉटवर बसून मनसोक्त शेंगा खायचो.गोपाळ प्राध्यापकांचा लाडका होता.या ना त्या समितीवर जायचा.मी म्हणायचो,"गोप्या एकदिवस तू त्या मास्तरची पोरगी पळवणार बघ ."गोप्या म्हणायचा ,"तेवढे मला  जमत नाही रे !तुला नक्की जमेल. तू अस कर.मी दाखवतो त्या मुलीवर लाईन मार!प्रेम जमव .पुरेसे प्रेम जमले की ते माझ्या  खात्यावर ट्रान्स्फर कर .शेंगा देईन खायला!" हा गोपाळ मला येथून असां बन्सीधर  दिसतोय .त्याला येथूनच मिठी मारू की  प्रत्यक्ष  भेटायला जाऊ?याचा विचार करतोय.त्यावेळचा गोपाळ मला भेटेल का?
                                                   आता पंढरी कुठली?मित्र जगभर विखुरलेत.पण त्यांनी मैत्रीचा हात उबदारपणे  जवळ केलाय.वीस पंचवीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गातून शिकून हायस्कूलमधून बाहेर  पडलेली मुले  आणि मुली मेळावा ठरवतात.त्यांच्याकडे मोबाईल नंबर्स असतात.अमेरिकेतून मुलगा भारतात येतो.कोकणातल्या  शाळेत मित्र मैत्रिणीना भरल्या डोळ्यांनी भेटतो.गप्पा करतो.गाणी म्हणतो.समूहाचां फोटो  काळजाशी धरून रुद्ध कंठाने अमेरिकेच्या उद्योगाला परततो .काळीज झाडावर असते.उड्या  जगभर चालू राहतात.शाळेत असताना मुलींना मित्रांशी मोकळेपणाने बोलता यायचे नाही.आता त्या संसारी असतात.मैत्री आता  खळखळून निकोपपणे बोलू लागते.चार दिवसांसाठी मुलगा सातासमुद्रापलीकडून येतो.भराभरा गावातले  शाळकरी मित्र गोळा होतात .गप्पा,जेवण,आईस्क्रीम यांनी रातराणीचा गंध दरवळून जातो!कुठे संपते मैत्री? मैत्रीला अंत नाही.आपला अंत झाला तरी आपले गुण  चिरंजीव झालेले असतात.मित्रांनी त्यांना खोल  कप्प्यात जपलेले असते.लाँगफेलोची कविता सांगते--"मी एक बाण जोराने हवेत सोडला--कुठे पडला ते दिसले नाही  मी एक आर्त गाणे हवेत फेकले--कुठे गेले कळले नाही!  दिवस उलटला आणि बाण झाडाच्या खोडात रुतलेला  आढळला .आणि गाणे मात्र मला मित्राच्या काळजातून ऐकू येऊ लागले "
                                  मित्रांनी कधीही एकमेकांची रजा घ्यायची नाही..अलविदा म्हणायचे नाही .
                           दर्द जितना सह जाये उतना सहना
                            दिलको लग जाये वो बात न कहना
                            मिलते  है हमारे दोस्त बहोत कम
                            इस लिये कभी अलविदा ना कहना  !
   पानवाला
                                        

Friday, October 5, 2012

हे भाग्य फक्त शिक्षकाचे !

त्या घटनेचा गंध अजून ताजा आहे. डोळ्यांचे आभाळ भारावले आहे. माणसाच्या जगण्याची थोरवी सांगणारा असा एक क्षण आयुष्यात येतो की आपले चालणे-बोलणे, श्वास घेणेही पंढरीची वाट  चालणे वाटते. तो दिवस असा होता. मला पर्सटाईप पिशवीला चेन बसवून घ्यायची होती. म्हणून एका Paradise नावाच्या गजबज इमारतीत शिरलो. पूर्वीच्या औरस चौरस वाड्याच्या जागी हा नाना प्रकारच्या आर्थिक उलाढालींचा स्वर्ग उभा राहिला आहे. एक गाळा माझ्या परिचयाचा होता. तिथे गेलो. पूर्वीचा मालक तिथे नव्हता. हातात घेऊन वावरायच्या, काखोटीला लावायच्या रंगीबेरंगी, अंगाला लगटून न्यायच्या पिशव्या इकडेतिकडे छानपैकी लावलेल्या. समोरच्या भिंतीवरही काही काही आकर्षणे लटकावून ठेवायची सोय. तिथे शुभ्रकेशी पण खुटखुटीत शरीराचे गाळामालक पिशव्यांशी गुलूगुलू करीत होते. मी त्याना विचारले "चेन लाऊन मिळेल का हो?" शांत स्पष्ट आवाजात उत्तर आले "हो,मिळेल की !" मी त्यांच्याकडे निरखून पाहिले. चेहरेपट्टी ओळखीची होती. एक अवखळ चुणचुणीत शाळकरी मुलगा त्या चेहरेपट्टीवर दफ्तर घेऊन उभा होता. मी म्हटले "तुमची चेहरेपट्टी पाहून तुम्हाला एक विचारायचे आहे.त्याने कुतुहलाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला "विचारा ना!" "अरे तू पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकत होतास का?" थेट अरेतुरेने वर्गातला प्रश्न विचारला. तो शुभ्रकेशी, अवखळ नेत्री गाळावाला एकदम चकित! "होय की  हो? पण आपण?" त्याचे डोळे आता काही शोधू लागले. "अरे मला तू ओळखले नाहीस! पण मी तुझा शिक्षक होतो. मराठी शिकवायचो. तू पटवर्धन हायस्कूलच्या पागा चौकात नववीच्या वर्गात होतास. कमानीतून शिरताना लगेचच डाव्या हाताच्या वर्गात! एकदा तू वर्गात खूप दंगा केलास. मी तुला धपाटे घातले. वर्गातून घालवूनही दिले. तू निमूटपणे बाहेर गेलास. पण कधीही तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल राग नसायचा. मलाही अजून तुला धपाटे घातल्याचे, वर्गातून घालवून दिल्याचे दु:ख आहे रे! कारण तुझा चेहरा निष्पाप असायचा. आजही तसाच आहे!!" आता तो शुभ्रकेशी, साठी उलटलेला गाळामालक म्हणून माझ्यापुढे उभा नव्हता. तो टक  लावून माझ्याकडे बघत होता.त्याने जणू शाळेचा युनिफॉर्म अंगावर चढवला होता.आपल्या बाकावर बसून फळ्याकडे पाहात होता. सुरवातीच्या चौकशीच्या वेळातच त्याने सफाईने छानपैकी  चेन माझ्या छोट्या पिशवीवर चढवली होती. मी तरी त्यावेळी कुठे गुरुजीबिरुजी होतो? ऐन तारुण्यातला मी! उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद म्हणून करायची होती, म्हणून शिक्षक झालेलो! पण कामाशी  बांधिलकी होती!


मी आता Paradise मध्ये उभा होतो माझ्या विद्यार्थ्यापुढे! पुढे किती शिकलास? हा व्यवसाय  तुझ्या वडिलांकडून मिळाला का? शेती वगैरे आहे काय तुझी? मुलेबाळे किती? बायकोपण दंगा करून करून मिळवलीस  काय? किती किती प्रश्न मी विचारलेले? पूर्वीचा दंगेखोर चेहरा मी आलो त्यावेळी होता. पण आता तोच चेहरा  श्यामलवर्ण मेघासारखा झाला होता. तो बोलला "सर,कुठलं शिक्षण? दहावी झालो. वडिलांचा एक स्थिर  उद्योग असेल तर ना? गावभागात एवढ्याश्या जागेत राहणारे आम्ही कर्नाटकातून आलेलो! वडिलांकडून व्यवसाय वगैरे  काही मिळाले नाही. माझा मी प्राप्तीची साधने शोधू लागलो. सर्वत्र लक्ष्य असायचे. व्यवसाय कौशल्ये आत्मसात करण्यात मी खूप चटपटीत आहे सर! पण गुंतवणुकीला पैसा होता कुठे? छोटीछोटी  कामे करीत पण नेकीने संसार रेटत, पसारा वाढवत आज पासष्टी गाठलेला उद्योगी माणूस म्हणून मी तुमच्यापुढे  उभा आहे. मुलगे आहेत. मुली आहेत. त्या सासरी गेल्यात. मला नातवंडे पण झालीत सर!" मला त्याचे नाव आठवत नव्हते पण चेहरा चित्तात कायम कोरलेला! मी भरभरून बोलत राहिलो. आत्मीयतेने  चौकशी करीत राहिलो. पुन्हा त्याला शाळेतल्या बाकावर बसवत राहिलो. तोही कंटाळला वा उबगला नाही. इतक्या वर्षानंतर आपले सर आपल्याला आपणहून भेटत आहेत. कदाचित हजेरीपटावरचा  आपला नंबरही सांगतील. मी बोलत होतो. तो नुसते ऐकत राहिला. चेहरा बालसुलभ झाला. डोळे पाणावले आणि एकाएकी तो  हमसाहमशी रडू लागला. मी त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. "तुझे अश्रू पवित्र आहेत" म्हणालो! पासष्टी गाठू पाहणारा माझा एके काळचा विद्यार्थी भावाकुल होऊन माझ्यापुढे रडत होता. मला काय करावे ते सुचेना!


आपले कर्तबगारीचे आयुष्य स्वतः कोरून, तासून उभे करणारा माझा विद्यार्थी केवळ लहानपणातील  आठवणीमुळे रडू लागला असेल काय? सरांनी आपली आठवण ठेवली. मला ते प्रेमाने भेटले. याबद्दलची ती कृतज्ञता असेल काय? शाळेतल्या आठवणी जागवण्याने एरवी आनंदच वाटला असता. माझ्या विद्यार्थ्याचे अश्रू खोटे  नव्हते. पण ते आणखी एक वेगळी कथा सांगत असावेत. त्या माझ्या विद्यार्थ्याने एकाकी  धडपडीने संसार उभवला. सर्वाना आधार दिला. पण आपण केलेले कुणाला बोलून न दाखवण्याचा त्याचा स्वभाव असणार. शक्यता अशी आहे की कोणी कधी त्याची चौकशीच केलेली नाही. मुलांनी आणि मुलीनीही कधी बाबांच्या थकल्या पायाना तेल चोळले नसेल. बायकांनी कधी नवरा म्हणून त्याच्याशी आपल्या  आयुष्याबद्दल बोलायचे नाही, असा जुना रिवाज होता. मित्र उणेदुणे तेवढे काढत बसणारे  असू शकतात. जे राबणारे त्यांनी राबत जावे. त्यांच्यापासून इतरांनी घेत जावे. अशाच एकाला विद्यार्थीदशेत रानावनातून काटेकुटे  तुडवत शहराकडे शाळेत जावे लागले. माधुकरी मागावी लागली. हेटाळणी ऐकावी लागली. पुढे कुणीही या वनवासाबद्दल विचारलेही नाही. त्याला कुणीतरी विचारले तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आले. असेच माझ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत  झाले असेल काय?


असेल असेच वाटते.कारण मी त्याला वर्गात वि.स.खांडेकरांच्या कवितेतील ओळी  ऐकवल्या होत्या.

"फुलासारखे केवळ कोमल देऊ नको रे मन मज देवा!
                                     असती सुंदर हसरी सुमने ,जग आहे परि जळता लाव्हा "

या कविता ओळीनी त्याला हलवून टाकले असणार. मला माझ्या कॉलेज जीवनात  अभ्यासलेले  My ideas of University 'विद्यापीठासंबंधीच्या माझ्या कल्पना' हे न्यूमन यांनी लिहिलेले पुस्तक आठवले. न्यूमन म्हणतात "Teacher is a living voice".  शिक्षक हा एक जिवंत आवाज आहे. त्याचा परिणाम आयुष्याची साथ करतो. Henry Adams या लेखकानेही लिहिले आहे की  शिक्षकालाच आपल्या बोलण्या शिकवण्याचे परिणाम दीर्घ काळ टिकून राहणारे असतात  याची कल्पना नसते. दोन व्यक्तित्वे जो अन्तःसंवाद करतात तो मला  ऐकायला मिळाला. मी शब्दांतून बोलत होतो. माझा पासष्ट वर्षांचा विद्यार्थी आपल्या अश्रूमधून  आपले मनोगत मांडत होता!

पानवाला.
                                                

Sunday, September 23, 2012

बाप्पा मोरया ,यावे ताराया !

          विठूरायाला उराउरी भेटायला माणसे पंढरीला जातात. गणरायाला मात्र  कडेखांद्यावरून नाचत बागडत घरी आणतात. विठूरायाची वारी तशी गणरायाची सुद्धा वारीच! वारे घेऊन वारी निघते. विठूराया आणि गणराया हे दोघेही उंच पिकातून डोलत असतात. पेरणीचा हंगाम आणि सुगीचा हंगाम विठूरायाच्या भेटीला नेतो. श्रावणाने राने हिरवी हिरवी गार केलेली असतात. ही फुललेली राने वने पर्णसंभार घेऊन गणरायाला भेटायला येतात. गणपती बसतो त्यावेळी त्याला मधुमालती, माका, बेल, धोत्रा, आघाडा, पिंपळ, जाई, केवडा सारे सारे येतात भेटायला! कोकणात माटव नावाची चौकट असते गणरायापुढ़े! त्यावर नारळ, बेडे तर असतातच पण त्याहीपेक्षा लडिवाळपणे येतात ती हरणे नावाची नाजुक पिवळी पिवळी गवतफुले! हिरव्या हिरव्या गवत पानासह! कोकणात पूर्वी पिवळी, लाल रंगाची मातीही मिळायची. रंगीत मातीतून गणराया प्रकट व्हायचा. हिरवा रंग हवा ना? कारल्याची हिरवीचार पाने पायरीवर वरवंटा घेऊन वाटायची. वाटीत रस भरायचा. भिंतीवरील चित्रामध्ये, गणरायाच्या गात्रावर हरितसृष्टी खुलायची. रानातून, मातीतून गणराया येणार. विसर्जन जलप्रवाहात! गणपतीचे नाते भूमीशी, मातीत राबतात त्या दोन्ही हातांशी, गाळला जातो त्या घामाशी!! पार्वतीने अंगावरील मळ थोपटून गणेशबालक जन्माला घातले. घामावर मातीचा थर जमतो तेव्हा मळ तयार होतो. गणपतीचा उल्लेख गणपती अथर्वशीर्षामध्ये व्रातपती असा येतो. नमः व्रातपतये । व्रात म्हणजे अंगमेहनतीने उदरनिर्वाह करणारा समुदाय! भूमी पिकवणारे, घाम गाळणारे. या श्रमवीरांचा म्हणजे व्रातीनांचा प्रमुख तो गणपतीराया!

                  विठोबा आणि गणोबा  हे अवतार नव्हेत. त्यांची जीवनगाथा नसते. ते नित्य असणे, सर्वत्र वसणे आहे. उराउरी भेटणे आहे. श्रमाला नित्य भेटतात ते विठोबा आणि   गणोबा! खेड्यात बघा, पुरुष माणसे एकमेकाना बहुधा विठोबा आणि गणोबा असे हाकारतात. मारुतराया, विठूराया आणि गणूराया ही लोकप्रतिभेतून उत्पन्न झालेली विलक्षण महाकाव्ये आहेत. ती मिथके -Myths आहेत. किती त्यांची दर्शने म्हणावीत? मूर्तीकार, चित्रकार, कवी यांना गणोबा - विठोबा म्हणजे एक अखंड प्रेरणा आहे. अरुण दाभोळकरानी गणरायाची हजारो विविध दर्शने  कुंचल्यातून साकारली आहेत. विठुराया - गणरायाचे अद्वैत अरुण दाभोळकर यांच्या प्रतिभेला खुणावू लागले आणि मग विठू-गणरायाचे विलक्षण रंग रेखावतरण झाले. विठू म्हणून ध्यान कटीवर हात ठेवून उभे तर त्या ध्यानाचे मस्तक आहे गणरायाचे. नीलवर्णी मुख .डोळे खोल चिंतनात उतरलेले - जणू डोहच! सोंडेला शेवटी पीळ घातलेला. मस्तकावर अर्धचंद्राकृती अरुणरंगी  चन्दन लेपी तृतीय नेत्र! कुंचल्याची पूजाच करावी!! भारतीय मनाला सुचलेले गणपती हे जे भावप्रतिक आहे, जी एक archetypal मिथक निर्मितीची प्रतिभाशक्ती आहे, ती  आपण सतत समजून घ्यावी असा आग्रह प्रा .रा .ग .जाधव यानी धरला आहे.

                      सीता ही भूमिकन्या. गणपती हा भूमिपुत्र. पाण्यात डुम्बणारा. नदीत उतरलेला हत्ती बाहेर यायला बघत नाही. उत्सवमूर्ती म्हणून पाण्यातच विसर्जन होते. भूमीवरील सकल जगण्यावर, अंकुरण्यावर आभाळमाया पांघरत येणारा गणराया मग विघ्नकर्ता का असावा? गणपती मूळचा विघ्नकर्ता मग त्याच्या सोंडेला बिलगून, त्याच्या पायघडया उरावर घेऊन त्याला विघ्नहर्ता बनविला. गणेश पुराणात कथा आहे. पार्वतीने गुणेश  नावाच्या पुत्राला जन्म दिला. शिवाने त्याला वैनायक नावाच्या गणांचे आधिपत्य देऊन जगावर विघ्न आणायला मोकाट सोडला. विघ्नकर्ता हा त्याचा मूळ स्वभाव. विघ्नहर्ता ही माणसाने केलेली प्रार्थना!

                     आपल्याच दैवताची विघ्नकर्ता म्हणून  पूजा करणारा, त्याचे दर्शन घेणारा आणखी कुठला मानव समूह जगात नसावा.  देव जर विश्वनिर्माता आहे, विश्वचालक आहे, आणि विश्वसंहारकही आहे, तर माणसाला  भोगाव्या लागतात त्या आपत्ती, क्लेश, फरफट, उपासमार, पारतंत्र्य त्यानेच आणले असणार हे उघड  आहे की नाही? विघ्ने तर येतातच. शोक, निराशा, हताशा यांचे अस्तित्व कुणी नाकारलेले नाही.  सारे क्षणिक आहे. शोकपूर्ण आहे. असे भगवान् बुद्ध सांगत फिरले. उपाय सांगत  राहिले. ' सुख पाहता जवापाड़े - दु:ख पर्वताएवढे ' असे तुकोबा सांगत होतेच की! जगभरची धर्म संस्थापक मंडळी माणसातूनच  फिरली. विव्हळ माणसाच्या जगण्यावर उपाय शोधायला निघाली. भ्रमण करीत निघालेल्या समर्थांचा जीव सैरभैर झाला. विवेकानंद स्वामींचा प्रवास हाल, यातना यांचे त्याना दर्शन घडवणारा होता. 'बुडती जन न देखवे डोळा ' म्हणूनच कळ सोसणारे थोर आपल्या जगण्याचे रान करीत राहतात.  इतरांच्या जगण्याचे ओझे हलके करतात. आपली गोड  गोड गाणी शोकाची विराणी असतात. शेवटी दु:ख म्हणजे तरी काय? आपल्या धडपडीला, इच्छा वासनांना, सुखाच्या निवासाला, पोटभर खाण्याला, निवांत लोळण्याला सुरुंग लागणे म्हणजे दु:ख ना? शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापना करू देणे म्हणजे औरंगजेबावर विघ्ने आणणे  होते की नाही? आपल्याला हवे ते मिळत नाही म्हटले की माणसाला संकटे आल्यासारखे वाटते.

                       तरीपण हे बाप्पा गणराया, जे अन्यायी आहेत, शोषक आहेत त्यांच्यावर तू जरुर  संकटे आण. पण पापभीरू, सज्जन जीवांना, हे विघ्नहर्त्या,  तू विघ्ने आणून का बरे छळतोस? सारे कोकण गणरायाच्या उपासनेत गढ़लेले आहे. गणरायाच्या भक्तिसागराला तेथे उधाण येते. मग त्याच दक्षिण कोकणात तू रानातून, गावातून, केळीच्या लागवडीतून रानटी हत्तींची फ़ौज का म्हणून सोडलीस? असेच पिसाळलेले सत्यानाशी रानटी हत्ती सर्व भारतभर राजकारणात, उद्योगकांडात, शिक्षण खाणीत का म्हणून घुसवलेस? खाणीतला कोळसा स्विस बँका भरायला का पाठवत आहेस? श्रीखंड, आम्रखंड सोडून तू ज्याला त्याला भूखण्ड का म्हणून खायला  घालतोस? सतत रस्ते खोदून रस्त्यांची बारमाही शेती तूच सांगितलीस ना? दलितांच्या स्त्रियांना विवस्त्र करून  त्यांच्या मातृत्वाची अशी विटंबना तुला बघवते कशी? दुष्काळ पडून माणसे मरतात. कसाबाला कोट्यवधी  रुपयांचा मलिदा मिळतो. सहकारमहर्षी, शिक्षणसम्राट, धोतर फिटलेले पुढारी लक्षावधी रुपयांच्या वाढदिवस पुरवण्या काढतात. खदा खदा हसत राहतात. तुला कसे चालते हे?

                      यावर गणरायाचे  उत्तर ऐका! सुख, चैनीने माणसाला गुंगी येते. दारूची झिंग चढते. माणसे गटारीत लोळत राहतात. दारुची झिंग उतरायची तर  दु:ख यातना यांचा उतारा हवाच. दु:ख माणसाला जागृत, सतर्क, क्रियाशील बनवते. रानात तण  मी वाढवतो कारण मग शेतकरी ते तण जाळतो. काटेकुटे नष्ट करतो. ढेकूळ  दगड फोडतो. नांगर मारतो. त्यातून शेती फुलते. मीच जपानला भूकंपाचे धक्के दिले. सारे बरबाद करून  टाकले. पण त्या विघ्नातून जपानी माणसाचा पुरुषार्थ जागा झाला. पूर्वीपेक्षा समर्थ, सुंदर जपान उभा करायला सज्ज  झाला. कष्टाच्या जपानेच जपान देश मोठा झाला. हे जगणे माझ्या विघ्नकर्तेपणाचे एक वरदान आहे.

                   मी विघ्ने आणतो  कारण संकटानेच माणसे एकत्र येतात. संकट माणसाना आणते निकट!मग ती संकटाशी  सामना करतात. नव्या जीवनाची स्वप्ने पाहतात. कळ येणे म्हणजे कळणे आणि वळ उठणे म्हणजे वळणे. असे असते माणसाचे कळवळणे. संकटे माणसाला संकुचितपणातून, कोंझेपणातून बाहेर काढतात. आपल्या जगण्याचा सतत विचार करू लागतात. 'एकमेका सहाय्य करू -अवघे धरु सुपंथ' हे विघ्नकर्ता  मी तुम्हाला आवाहन करीत असतो. "एका आम्रतरूतळी' काय झाले?तुफान वादळ, विजांचा कडकडाट, भुई थरथरणे  रानभर उठले. एक भक्कम विशाल आम्रवृक्ष होता. त्या आम्रवृक्षाखाली हरिण, वाघ, सिंह, लांडगे, ससे, कोल्हे सारे निमूटपणे, शांतपणे एकत्र आले. विघ्नाला तोंड देवू लागले.

                        बाप्पा! आम्ही दक्ष राहू.  संकटप्रसंगी ठाम उभे राहू. पण विघ्नानी हद्द ओलांडली आहे!दैत्य तुझीच सोंड कापून टाकण्याच्या ताकदीचे आग्यावेताळ  झालेत रे! परशू घेऊन ये. जगावर जरुर विघ्ने आण . .आग  ओत. पण हे सारे संहारकार्य तिमिरासुरांचे कर. दुष्टांचा विघ्नकर्ता हो! सुष्टांचा विघ्नहर्ता हो!!

             पानवाला .

Friday, September 14, 2012

निदान पश्चात्ताप तरी हवा!

माणूस आजवर चुकतमाकतच जगत आलाय. मेंदूच्या ज्या मर्यादा त्या माणसाच्या आकलनाच्याही मर्यादा. मग काय झाले? सुख शोधत जाताना आपणच काही अन्याय, यातना निर्माण केल्या. या जगी सर्वात सुंदर आहे ते माणसाचे मन आणि सर्वात कुरूप आहे तेही माणसाचे मनच. भव्य, देखण्या व प्रचंड वास्तू मानवी प्रतिभेची उत्तुंग भरारी दाखवतात. पण प्रत्येक चिरा-वेठबिगारांचे अश्रू, घाम-रक्त यांचे गळणे, पाठफोडू फटके ऐकवत राहतात. स्वातंत्र्यामागे बलिदाने असतात. साम्राज्यामागे शोषण, लूटमार असते. नीग्रो गुलाम आणि रेड इंडियन यांच्या शोषण आणि कत्तलीमधून अमेरिकेची श्रीमंती उभी राहिली आहे.
          
मुद्दा असा की आपण चुका करीत आलो आहोत. जातपात, उच्च -नीच भाव, जवळचा-दूरचा, शत्रू-मित्रभाव या गोष्टी जीवन बकाल करीत आले. माणसातली आई, बाबा, भाऊ, लेकरु, सखासोबती आपणास नेहमीच नाही ओळखू येत! कारण आपण पुरेशा प्रमाणात आपणावरच डोळे नाही रोखत. आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू आहोत हे श्रीकृष्ण बजावत असतो.

चुका करणे माणसाच्या रचनेतच आहे. चुकांची जाणीव ठेवणे. त्या पुन्हा होऊ न देणे - प्रसंगी कबुली देणे हे गंगास्नान आहे. पश्चात्ताप, प्रायश्चित्त, कबूली (Confessions) हे धर्ममार्ग अशा अर्थाने की ते माणसाला कात टाकायला लावतात. काही प्रमाणात पश्चात्तापाची, आत्मचिंतनाची, आत्मसुधारणेची ही तळमळ आज मला सर्वत्र दिसतेय का? मला समाज नावाची वस्तू  तरी दिसतेय का?

दूरदर्शनवर आज मराठीतून दोन मालिका चालू  आहेत. अंतर्मुख व्हावे अशा योग्यतेच्या! महादेव गोविन्द रानडे आणि त्यांची रमाबाई यांच्या जीवनावर "उंच माझा झोका" ही मालिका आणि विखेपाटील खानदानाच्या मिशाउगारु जगण्यावर मारझोड दाखवणारी नारीछळ मालिका! दोन्ही तुलना करण्यासारख्या आहेत. न्यायमूर्ती रानडे यांचा काल -- स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही. पुनर्विवाह, संपत्तीत वाटा  नाही. समान हक्क नाही. विकासाला वाव नाही. ही सनातनी कुबट आणि घुसमट करणारी मालिका पाहताना ब्राह्मण वर्ग अपराधी मनाने, पश्चात्तापाने  वरमलेला असतो. तिकडे विखे  पाटील दरडावून, मुस्कटात मारून, दंडुका वापरून सुनांना, मुलींना, पशूप्रमाणे छळतात, थोर कूळ आणि अस्सल रक्त सांगतात ते पाहून पश्चात्तापाने होरपळणे किती प्रमाणात घडते याचे उत्तर ज्याचे त्यानी मनाशी द्यावे. दलित स्त्रियावरील बलात्कार, घरेदारे जाळणे, जमिनी हिसकावून घेणे वगैरे अपप्रकारातील  बहुजनसमाजाचा मोठा सहभाग मान्य करुन मन खंतावते का? ब्राम्हणेतर चळवळी बद्दल केशवराव जेधे लिहितात "ब्राम्हणेतर चळवळीत राष्ट्रीय वृत्तीला  काही वाव नव्हता. बारा वर्षे मी या चळवळीत काढली पण देशाची सेवा करतो असे मला कधीही वाटले  नाही". माधवराव बागल खंत व्यक्त करतात "आज अस्पृश्यावरचे अन्याय  ब्राम्हण समाजाकडून होत नाहीत. पण आपणच मनुस्मृतीचे पुनर्जीवन करीत आहोत" (भारतीय प्रबोधन ग्रंथ पृष्ठ क्रमांक 221). पश्चात्तापाची  अशी भावना आहे आज कुठे? ब्राम्हण पुरुष कापून काढा. स्त्रियाना भोगा --असा ग्रंथ प्रसिद्ध करणारा  महामराठा पुढारी किती लोकांना पश्चात्ताप आणि शरम वाटायला लावतो?

"पालावरचे  जिणे"  हे गिरीश प्रभुणे यांचे भडभडून आणणारे पुस्तक वाचा. पारधी स्त्रियांचे जीणे  पारधी पुरुषांनीच कसे असह्य करून  सोडलय. मग भटक्या, दलित पुढारलेल्या स्त्री पुरुषांना  अपराधी वाटायला  नको काय? वाटते का तसे?  "आमच्याशी रोटीबेटी व्यवहार करा "असे म्हणणारे लक्ष्मण माने. त्यांची बायको ब्राम्हण  कुटुंबातील! तिचे सासरी स्वागत कसे झाले? बायका म्हणाल्या "लक्ष्मणाच्या +++ कड़े बघून ही या घरात  आली आहे" हे स्वागत लक्ष्मण माने याना शरम आणते का? निगरगट्टपणा पाहून निराश झालेले ना .ग  .गोरे लिहितात "राष्ट्रीय उत्थापनाची आशा बाळगण्याची हिम्मत माझ्या ठिकाणी नाही" (भारतीय प्रबोधन).

" देशाची फाळणी" ही काळजाला  घरे पाडणारी दुर्घटना नाही का? पण कोणालाही पश्चात्ताप वाटत  नाही. पु. भा. भावे  जळत जळत मरुन गेले. "हिंदू मूळचे भ्याड तर मुसलमान गुंड प्रवृत्तीचे" हे मत ठाम पणे सांगणारे गांधीजी मग मुसलमानांच्या नैतिक, शैक्षणिक सुधारणेकडे, त्यांच्या आधुनिकीकरण प्रक्रियेकडे  एवढे सुद्धा ध्यान का देत नाहीत? त्याना गुंड आणि उन्मत्त का राहू दिले? मुसलमानांच्या उद्धाराविषयी  गांधीजीना काही आस्था का म्हणून नव्हती? वाईट वाटायला नको? बलात्कारित हिन्दू स्त्रियांना गांधीजी  म्हणाले "जीभ चावा आणि मरा! आत्महत्त्या करा!!" ज्यू लोकानी सामूहिक आत्महत्त्या करावी  म्हणजे  हिटलरची जगभर निंदा होईल" हे गांधीजी सांगत  होते . याबद्दल काही पश्चात्ताप?

आक्रमक, पिसाटधर्मी वृत्तीच्या लोकांना सुसंस्कृत, राष्ट्रीय वृत्तीचे करण्यासाठी काहीच न  करावे असे व्रत घेणारे गांधीजी अन्त्योदयाची कल्पना मांडतात. ती  मग कशी साकारणार? "एका दिशेचा शोध" घेणारे संदीप वासलेकर याना वाटते की  महात्माजींची अन्त्योदय ही कल्पना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची  भौतिक शास्त्राविषयीची  निष्ठा यांचे मीलन करून आपल्या देशातील लोक समाधानी, आनंदी होणे  शक्य होते. मग सावरकर का मानवले नाहीत? गांधीजीनी  त्यांचे का ऐकले नाही? आणि आता वासलेकराना  काश्मिरात दहशतवादी तरुण भेटला. वासलेकराना म्हणाला "आमचा मार्ग चुकीचा आहे . मान्य! पण आमची कोंडी झाली आहे. तुमचा मार्ग कोणता? ते  सांगा ना?" गांधीजी कोणता मार्ग सांगणार होते?

आता काय करणार? निदान पश्चात्ताप तरी वाटू दे ना? अपयशाची जबाबदारी जे स्वीकारत नाहीत, त्यांना यशातही  भागीदार होता येत नाही. आणि पुढील उन्नतीतही  ते स्वावलंबी होत नाहीत.

पानवाला.

Sunday, September 2, 2012

अरेरे कैनडा विट्ठलू पोचलाच नाही पैलथडी !

कानडा  विट्ठलू  टोरन्टोला उतरु पाहत होता. रुक्मिणीचा त्याला सतत आग्रह! "भक्त थोर ते गेले निघुनी| गेला महिमा तव नामाचा। रहायचे मग इथे कशाला?" देवाला कसला प्रॉब्लेम? सारे देव आकाशमार्गे उडत जातात. तुकोबा विमानाने उडाला. दुसरा भिंत उडवत होता. रामाकडे तर पुष्पक विमान, सारे महामंडळ टोरंटोला अलगद पोचले असते.  या विमान तिकिटाच्या लफड्यात आमचा कैनडा विट्ठलू साहित्यिकू ना. धो. महानोर राहिला की नाही इथेच अजंठा  वेरुळच्या गुंफांमध्येच!  तिकडे टोरन्टो मध्ये भाषण कोण गुंफणार? माइक मिळेल का हो माइक? मंच मिळेल का हो मंच असे गणपतराव बेलवलकर  यांच्या आवाजात महानोरानी म्हणावे का हो? भीमरूपी महारुद्रा एवढे म्हटले असते तरी मारुतीरायाने नाधो आणि राधा याना टोरंटोच्या देवधरे यांच्या समोर उभे करुन  "देवधरे या देवाला धरा बरे" असे म्हटले नसते का? महानोर यांच्या सारखा द्रष्टा कवी जायलाच हवा होता.  पंढरपूर येथे चंद्रभागा तर टोरंटो भवती ईरी सारख्या अथांग सरोवरांचा पसारा. नायगारा धबधब्याला त्यांचे धो धो पाणी. महानोराना उधाण  आले असते की हो! शिवाय याच भूमीने नीग्रो गुलाम जीवाना मुक्तीचा श्वास घेऊ दिला होता. मराठीला तिथे Harriet Tubman भेटली असती.  दलित लेखकानाच नव्हे तर आपणा सर्वाना तेथे बाबासाहेब भेटले असते.

                       मराठी सारस्वताला अमेरिकेच्या आधी जी भूमी भेटली ती Canada हीच! येथेच एकता नावाचे मासिक निघते. अमेरिकेतील मराठी माणसानी लिहिलेल्या मराठी कथांचा संग्रह याच मायमराठी वाल्या लेकरानी प्रकाशित केला. त्यांच्या एकता मासिकात, एरवीच्या पाक्षिकातसुद्धा मराठी मजकुरात एक जरी इंग्रजी शब्द आला तरी अमेरिकन मराठी माणूस आकांत करतो! आणि महामंडल दल दल प्रदेशी पहा! मराठी नाटकांची नावे इंग्रजीत, पुस्तकांची शीर्षके इंग्रजीत, पहिला Science Fiction वर मराठी चित्रपट येतोय! नाव आहे -Welcome to the jungle! कविता तर मड्डम झाली आहे. ओळीपण इंग्रजीत! म्हणजे इंग्लिश झाली बरबाद! स्वत्वाला त्यजुनी गुलाम बनती ते शंख वा शिंपल्या! आता वीणा वादिनी जाते परदेशात!

                             मला कधीच वाटले नव्हते की साहित्यिक अचानक सावरकरांचे ऐकतील आणि लेखणी मोडून बंदूक हाती घेतील म्हणून! गोरा परका हाकलायचा तर बंदूक ठीक पण मराठी माणूस गोरे लोकांच्या देशात नेताना बंदूक कशाला? टोरंटो ला झाशीची राणी  इकडे सुद्धा लक्ष्मीबाई! येऊ तर सारे  नाही तर एकही नाही. वराढ़ निघाले टोरंटोला! मागे पानिपतला मराठे वीर गेले लढायला नाना फडणीस यांची आई गेली तीर्थयात्रेला! मराठी आई  बिचारी ओशाळ वाणी  उभी राहिली!

अमेरिकेतील मराठी माणसाना उद्देशून प्रा रा. ग. जाधव यानी ह्युस्टन च्या स्नेह या वार्षिक अंकात आवाहन केले होते "ही अमेरिकेतील मराठीप्रेमी माणसे म्हणजे दोन भिन्न संस्कृती मधील संपर्क वाहिन्या आहेत. भाषिक तथा  कलासाहित्यातील गुणवत्ता यांची ओळख करून घेणे व दोन भिन्न सांस्कृतिक समाजातील योग्य आदान प्रदान  सुरु करणे हे या संपर्क वाहिन्यांचे काम आहे. प्रथम आपण मराठी भाषा, साहित्य, कला,  प्रथा यांची नीट  माहिती घ्या. अमेरिकेतील भाषा संस्कृती यांची गुणवत्ता जाणा. एक तौलनिक दृष्टी कमवा ती  महाराष्ट्राला द्या. अमेरिकन भाषासंस्कृति पहा. आपली भाषासंस्कृति त्याना समजावून द्या".  तेथील दलितत्व जाणून घ्या.  आपले दलित साहित्य परिचित करा. संवाद घडवा.  एकत्र बसा आणि संवाद घडवा. नुसते पुसी मांजरी  बनू नका! "दुरिताचे तिमिर जावो" हा संदेश विश्व साहित्य सम्मेलनातून जावा हा केवढा व्यापक, मुक्तिदायक  विचार आहे! साहित्य सम्मेलन आयोजकांना, पगडीधारकांना  दे रे सद्बुद्धि माझ्या Canada विट्ठलू साहित्यिका!

पानवाला.

Friday, February 18, 2011

आई न घरी न दारी!

 आईला मारून तिचे काळीज आपल्या प्रेयसीला द्यायला धावत निघालेल्या मुलाची कथा सानेगुरुजीना सुचली.ठेच लागून खाली पडलेल्या मुलाला आईच्या काळजाने "बाळ, लागले का रे तुला?"असे काळजीने विचारलेले गुरुजीनी ऐकले.कवी यशवंतानी तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी आहे, असे सांगून कित्येकान्च्या डोळ्याला पाणी आणले.या आईचे महात्म्य किती किती प्रकारानी जगभरच्या माणसानी गावे हो?विंदा करंदीकर यानी तर सत्ययुगाच्या अखेरची एक गोष्टच कवितेत आणली.ते म्हणाले" सत्ययुगाच्या अखेरीस प्रेम आणि द्वेष यांच्यात लढाई झाली.द्वेष विजयी झाला आणि प्रेम आईच्या हृदयी लपून बसले."आई आपल्या मैत्रिणीच्या मुलालाही अंगावर पाजते.मैत्रिणीला पान्हा फुटत नाही म्हणून!राजस्थानच्या विष्णोई जमातीचे साऱ्या चराचर सृष्टीवर प्रेम.आईविना पोरक्या झालेल्या तान्ह्या हरीणपाडसाला स्तनपान देणारी विष्णोई माता मी फोटोत पाहिली.मूल घाबरले की 'बाप रे!'असे म्हणते.वेदनानी कासावीस झाले की 'आई ग!' म्हणते.बाप कथित असतो.आई एक तथ्य असते.Mother is a fact. Father is a fiction.शुक्रपेशी फलित झाली की बापाचा सम्बन्ध संपला,असे एका कथालेखकाने म्हटले आहे.गे आई,थोर तुझे उपकार!
                    यशवंतांच्या नंतर मराठीतील आई कुठे गेली?असा प्रश्न कुसुमाग्रजाना पडला.मलाही वाटू लागते की कुठे जाते ही आई काही काही वेळा?सांगली महापालिकेने नुकताच झोपड़पट्टी हटाव कार्यक्रम घाव घालत राबवला.झोपड्या उडवून लावल्या. सामान रस्त्यावर फेकले.झोपडी उध्वस्त!संतप्त! शिव्या,दगडफेक  हे समजता येते.पण एका मातेने काय करावे?तिनेआपले दोन वर्षांचे मूल कडेवरून उचलले आणि दाणदिशी दगडावर आपटले.मुलाने डोळे फिरवले .बेशुद्ध झाले.रक्ताने भिजले.सुरक्षा दलातल्या दोन तरुण स्त्रिया पुढे आल्या मुलाला उचलले.औषधपाणी केले.त्या पोलिस बाईनी तान्ह्याला उचलले.सख्ख्या आईने आपटले.मुलाची ती आई तेव्हा कुठे गेली असेल हो?प्रश्न आपण  जिवंत राहण्याचा असेल तर माणसाना कठोर व्हावे लागते हे मला ठावूक आहे. कित्येक वन्य जमाती अन्नाला महाग झाल्या,वैराण वाळवंटी वा बर्फमय प्रदेशातून कित्येक महिने हाय हाय करीत जावे लागणार म्हटले की म्हातारी माणसे बिनदिक्कत मारून टाकावी लागतात ,हे मी वाचलेआहे.पण आजच पेपरात मी वाचले की आईचे बापाशी नाते तुटले आणि कुठे तरी नवीन जमले.आई मग उठली.मोका साधला.आठ वर्षांच्या आपल्याच मुलीचे नाक आणि तोंड दाबून धरले.भल्या पहाटेच्या अंधारात ती आई लेकीचे प्रेत कुठेतरी फेकायला निघाली.लोकांना दिसली आणि फसली.
                                            सानेगुरूजी या आईला काय म्हणणार?त्याना कधी ही आई दिसलीच नव्हती.माकडीण नाकातोंडात पाणी जाऊ लागले की पिल्लाला आपल्या पायाखाली घेते. ही माणसाने लिहिलेली कथा आहे.पण परवाच डिस्कव्हरी वाहिनीवर पाहिले की मरून पडलेल्या आपल्या पिल्लाजवल माकडमाता शोकाने जाते.त्याला नाना प्रकारे तपासते.परिवाराला बोलावते .सर्वजण येतात. पिल्लाची बारीक पाहणी करतात.माता मग ज़रा दूर जाते.डोळे पंजाने पुसत राहते.दुष्काळ पडणार.खायला कमी असणार .लेकरानी जगावे म्हणून वानरी झाडाच्या ढोलीत ,धान्य आणि फळजाती चावून चावून बनवलेले लाडू    ठेवते आणि मग नरमादी दोघेही लाकडाच्या खोडावर प्राण सोडतात.मारुती चितमपल्ली यानीच हे लिहिलय!माणसाची मादी मग काही वेळा आपल्याच पिलांचा प्राण का घेते?तिचे स्तन्य पार आटून का जाते?
                                                मला सरोगेट आईबद्दल आज तरी काही म्हणायचे नाही.पण सरेंडर -Surrender-आईचे मात्र काही कळत नाहीसे होते आहे.चार दोन वर्षांच्या कराराने तरुण तरुणी एकत्र येऊ पाहत आहेत.ती नर आणि मादी म्हणून राहतात.बाप आणि आई म्हणून नाही.सोविएत रशियाचा मार्ग ठीक होता.मुले सरकारने आपले धन म्हणून वाढ करायला न्यावीत.पुढे श्रमिक शक्ति हाताशी येते.आता गर्भाशय जिथे विकायला बाजारात येते,तिथे मूल ही क्रयवस्तू बनणार हे निश्चित!पण बैंड  लावून ,भटजी बोलावून ,पंक्ती उठवून ,मंगलाष्टक म्हणून ,अग्निसाक्ष विवाह होतात.मधुचंद्र धुंद होतो.ट्याहा होते.आजोबा आजी डोळ्यातून निरांजने दाखवतात.पुढे रान सुकते.विवाहाला तडा जातो. मग भटजी जोड़ी बदलून मंत्राला आणतात.सप्तपदी पुन्हा एकदा साता जन्मांची आण घेऊन येते.आधीचे मूल मात्र कोठेतरी लांब भेदरून,गुदमरून उभे राहते.बन्सीधराला आई मिळते तर बाप परागंदा होतो.बाप जवळ तर आई नव्या संसाराला लागलेली.बन्सीधराने  आता कोठे जावे?श्री.म.माटे यानी लिहिलेली कथा आठवत राहते.परवा दोन डोहाळजेवणप्रकार पहायला मिळाले.कुठे बारशांचे थाट उडालेले ऐकले.अंगाई गीते म्हटली गेली."कित्ती क्यूट आहे बाळ!"म्हणून कौतुक करीत पोक्त मंडळी गोड तोंडाने घरी परतली.पहिल्या लग्नाची मुले भेदरल्या ,हरवल्या डोळ्यानी कुठेतरी एकाकी जगत होती.त्याना आता कोण जवळ घेणार?आईची माया त्याना कुठून मिळणार? मला खरच प्रश्न पडतो .पहिली आई दुसरे आईपण भोगायला बोहल्यावर चढते.डोहाळ जेवण उखाणे घेऊन सजवते.जुनी आई नव्या बापाला घेऊन नव्या संसारात नव्या मुलाच्या कौतुकाला लागते ,तेव्हा तिला पहिल्या मुलाची एवढीतरी आठवण येत असेल का?मला बापाबद्दल काही प्रश्न विचारायचे नाहीतच.शुक्रबीजाच्या फलनापासून त्याचा सम्बंधच तुटलेला असतो.पण आईचे काय? एका मुला-मुलीची आई नव्या गर्भाधानाची नवलाई मिरवत राहते,तेव्हा तिच्या आधीच्या लेकराच्या डोळ्यातले आसू काही म्हणजे काहीसुद्धा तिला दिसत नसतील का?
                                                          घटस्फोट कोर्टात सहीशिक्क्यानी पक्के होतात.पोटगी म्हणून बाईला रक्कम मिळते.मुलाच्या शिक्षणासाठी,पोषणखर्च म्हणूनसुद्धा पैसे मागितले जातात."मरू दे तिकडे ब्याद" म्हणून पैसे फेकले जातात.पण परित्यक्त आईनेच दुसरा घरोबा केला तर मुलाला कोण शिकवणार?कोण त्याला ठेवून घेणार?आजोबा आणि आजीच  वृद्धाश्रमात गेले तर?
                                  माझ्या दारी सकाळच्या कोवळ्या उन्हात एक गोड चेहरा असणारा गुबगुबीत मुलगा काखेला रामदासी झोळी लावून 'जय जय रघुवीर समर्थ'पुकारत आला.मुलगा वात्सल्य जागे करणारा होता.चेहरा कोमल ,बालसुलभ भाव सांगणारा.नरसोबावाडीतून आलो म्हणाला.तेथेही कुठूनतरी आलेला.आईबाप आठवायचे.देवाच्या हवाली केले म्हणाला.वाडीला ओवरीत राहतो ,भिक्षा मागतो.अन्न छत्रात जेवतो.लोक कपडे देतात.मला हुंदका फुटला.मुलगा मात्र स्थिर चेहरा घेऊन उभा.त्याला खाऊ घातले.नवे धोतर दिले.पैसे दिले.पुन्हा ये म्हटले.मुलगा 'जय जय रघुवीर समर्थ'म्हणत पुढे गेला.पुन्हा आला नाही.वाडीत चौकशी केली.उत्तर आले."येथे असा एक चांगल्या घरचा मुलगा आलेला खरा.पण आता कुठे ते ठाऊक नाही.अशी मुले येतच राहतात"या मुलांच्या आया कुठे असतील बरे?जगभर माणसांची गुलामगिरी वाढत आहे.भारतात गरीबी आहे.गरीबी तिथे मुले भारम्भार!"तुमच्या मुलाना कामाला लावतो.शिकवतो"असे सांगून काही पैसेही घेऊन मुले नेली जातात.परदेशात त्यांची विक्री होते.भारतातसुद्धा गुलामांचे जगणे कमी संख्येने नाही.
                                             अरबस्थानात उंटाच्या मानेला बांधलेले मूल जीवाच्या आकांताने ओरडत राहते.ऊंट आवाजाला घाबरून जोराने धावत सुटतो.त्याचा शर्यतीत नंबर लागतो.बक्षीस मिळते.उंटाच्या मानेला बांधलेले मूल कोणत्या आईने पाठवलेले असेल?त्याची आई त्यावेळी कोठे असेल?ती कुणाच्या दारी आणि कुणाच्या घरी संसार करीत असेल बरे?
    पानवाला.

Monday, February 7, 2011

कविता वेचत जाणारा एक वेडा चकोर!

मला कधीतरी अचानक पंचवीस पैशांचे कार्ड पोस्टातून येते. पत्ता लिहिण्याच्या बाजूला भारत सरकारच्या कल्याण मंत्रालयाचा गुलाबी छापील संदेश असतो. मागील कोऱ्या बाजूवर मात्र वेड्यावाकड्या ओळीमधून शब्दांची उभी आडवी पाखरेच पाखरे असतात. एका वेड्या कविताप्रेमी जीवाने चोच भरून जमा केलेल्या कविता माझ्यापुढे मांडलेल्या असतात. खिडकीसमोरच्या फांदीवर नाचरा पक्षी शेपटीचा पंखा फुलारून कधी बसेल याची खात्री नसते. मात्र तो आला की चोच इकडे तिकडे फिरवेल, मानेचा नखरा दाखवेल. तालात काय नाचेल. तसाच हा कलंदर कविता-संकलक आपल्या उरावरच्या रेघा किती किती प्रकारे मला दाखवेल याची आधी दाद लागत नाही. तो तशी दाद लागू देणारही नाही. पण दाद मागत मात्र राहणार. या भन्नाट माणसाने प्रथमच मला लिहिले होते ,"काव्याला दोन गोष्टी मारक ठरतात. एक-जाण नसते त्याची मिळत राहणारी दाद आणि दोन-जाणकाराचे मौन! तुम्ही मौन सोडले आहे ना?"

या लोकविलक्षण कवितावेड्याच्या एका पायावरून आणि उजव्या हातावरून वारे गेले आहे. पण डाव्या हातात संचार भरलाय. असे वारे गेले म्हणून काय झाले? कवितेचा श्वास वारा अंगभर घुमतोय ना? बोलणे कमी. बघणे हेच बोलणे. डोळे सदोदित कविता शोधणारे. कुणाकुणाला कविता धाडत राहणारे. फायलीच फायली अवती भवती. त्यात कविता गरम गरम श्वास टाकत असतात. या कविता त्याने कुठून आणल्या? कुण्या कवीच्या त्या आहेत?कधी त्या भेटल्या? हे असले कधीही त्याला विचारायचे नाही. भुंगा पुढे आला तर त्याला कुणी विचारते का  की बाबा तू कोण, कोणत्या फुलामधून मध जमा केलास म्हणून? त्याला तरी ते सांगता येणार का? तो काय म्हणेल? तो म्हणेल,"मधुकर माझे नाव असे. जिथे जिथे रसगंध उमलती तिथे तिथे मम गाव वसे!" या कवितावेड्या संकलकाने पहिल्याच पत्रात मला लिहिले होते-"मी पाठवलेल्या कविता हा माझा आनंदाचा ठेवा आहे.या कवितामधून मी आई वडीलाना शोधत असतो. ते मला दिसतात. संग्रहित कवितामधून आपल्याला झाडे, चिमणी पाखरे, शेत एवढी प्रकर्षाने भेटतील. कृपया यांचे कवी कोण एवढे विचारू नका. मी लिहीत नाही." "मी लिहीत नाही म्हणजे मी कविता लिहिणारा नाही", की "याबाबत मी काही लिहिणार नाही" या संदिग्धतेचा मीही कधी बाऊ केलेला नाही. आयुष्याचे शेत, आई-वडिलांची झाडे आणि फांद्या-फुलांचा निवारा करणारी जिवाची पाखरे एवढा संदर्भ मला पुरेसा आहे. पाखरू आयुष्याच्या संध्यासमयी काळजात कविता जपून आहे हेसुद्धा मला ठाउक आहे. मला पाखराचे पंख मोजायचे नाहीत. त्याच्या उरातली कविता वाचायची आहे.

कविता हे खरोखरीच वेड आहे. मग हे वेड कसे आणि का बरे लागत असावे? कविता ही तरी काय चीज आहे? लिहिली म्हणून ती कविता असते का? गायले गेले म्हणून गीत गाणे बनते काय? उच्चारला गेला तरच तो शब्द असतो का? तसे असेल तर मग आत्मसंवादच गेला. 'शब्दाविन संवादिजे'असे माऊली  का बरे म्हणाली असेल? तरीसुद्धा शब्द हवाच असतो. शब्दांच्या पलीकडे जे काही असते ते सांगायलासुद्धा शब्दानाच यावे लागते. शब्द हे साक्षात ब्रह्म आहे.कविता म्हणजे तुम्हाला सांगतो, एक यड ताक आहे.कविता हा माणसाचा श्वासवारा आहे. माणूस जन्माला येतो आणि मग त्याला श्वास मिळतो हे खरे नाही. श्वासवाराच माणसाच्या रूपाने आईच्या उदरात, घरट्या मधील पिलासारखे ऊर वरखाली करीत राहतो. मग बाहेर येतो. श्वासवाराच डोळे उघडतो. त्याला गंध भेटतो. रसवेदन खुलवते. श्वासवाराच नादब्रह्माचा अवतार! असा हा श्वासवारा मग जीवाला ऊन, पाऊस, नाजुक पाऊले आणि कठोर रपाटे यांची विलक्षण दुनिया दाखवत राहतो. कविता माणसाला उपरी नसते. ती त्याच्या रक्तात, हृदयाच्या ठोक्यात असते. 'सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे. प्रीतिसारिकेचे गीत तियेचे ऐकावे कानी - आणि मग बनवावे मन धुंद रंगुनी काव्यसुधापानी' हे वेड बालकवीना  गुरुजीनी लावले काय? 'स्वयं नाद्ब्रह्मात गुंग  होणारा, शब्दजगताचा चतुर विधाता तो - जगन्मोहन या खगापरी गातो' अशी ग्वाही चंद्रशेखर कवीनी दिलीय ना?

जेव्हा तुम्ही कविता समरसून वाचता, तेव्हा तुम्ही स्वतः कवीच असता. प्रा.रमेश तेंडुलकरानी १९९७च्या अधिष्ठान या दिवाळी अंकात लिहिलय,"एके काळी प्रत्येक आदिमानव हा कवी होता. वस्तूना शब्द देणे  हीच स्फूर्ति होती. एकेकाळी जग कसे ताजेतवाने, गरमगरम, अगदी फ्रेश होते. अशा वेळी बोलणे म्हणजेच कविता करणे. म्हणून तर साहित्याला वाणीमय - वाणीरूप असे म्हणायचे ना? आणि पुन्हा असे की कवींची नावे विचारण्याची आपली परंपरा नाही. लोकगीते कोण लिहिते? ती सर्वांची असतात. रानात सीता प्रसूत होते. कशी? लोकगीत आपणाला सांगते-

                              'एवढ्या वनामंदी कोण रडते ऐका--
                               सीतेला समजाया बोरीबाभली नायिका'

लोकगीत गायले जाते ते ऐकायचे. कुणी लिहिले, उच्चारिले ते विचारायचे नाही. माझा वेडा चकोर कविता संकलक मला कार्डामधून उरीचे उसासे कळवतो.

   'उगवायच म्हटल काहीही तरी--जमिनीसारख मन थोड़े तरी --सुपीक असायला हवे'
   'बकुळी म्हणते सावळ्या रंगान हिरमुसायचे नसते --गुण गंधाने सर्वाना जिंकायचे असते'
   'मी झाडाला चिमण्या पाखरांशी आणि चिमण्या पाखराना झाडांशी बोलताना पाहिलय,
   'आणि मीही माझे एकटेपण जपत--आईला तुलशी रोपाशी बोलताना कैकदा पाहिलय'   
   'सबंध अंगभर दाटीवाटीने फांद्या खोचून घेतल्या--तेव्हा कुठे मी झाडासारखा दिसू लागलो,
   'वेदना रुतल्या नाहीत--फान्द्याना पाने होती, फान्द्याना फुले होती,
    'चिमण्या पाखरांची खूप खूप वाट पाहिली --हात पसरले पण पाखरे काही परतली नाहीत'  

माझ्या वेड्या कवितावेचू मित्राचे शेत कधीच अंधारून गेले आहे मग ----
           "शिवारात आता बैल दिसत न्हाईत --का कुणाची बी --
             माज्या s s राजा, माज्या s s सर्जा  अशी साद येत न्हाई--
             सार शिवार आता मुकं झालय"

असे शिवार मुके होते तेव्हा कविताही मुकी  होते. आणि मग मुकेपण स्वतःच कविता बनते!

- पानवाला.

Sunday, December 5, 2010

कॉमन सेन्सला श्रद्धांजली!

कॉमन सेन्स म्हणजेच व्यावहारिक शहाणपण. ते मेले आहे म्हणून त्याला लंडन टाईम्सने श्रद्धांजली वाहिली होती म्हणे. कित्येक वर्षे हे व्यावहारिक शहाणपण आपल्या संगे जगले होते. इतका काळ आपली साथसंगत केली की ते व्यावहारिक शहाणपण किती वयाचे होते ते सांगता येणार नाही. शिवाय नोकरशाही दफ्तरखान्याने कॉमन सेन्सची फाईल कधीच गहाळ केली आहे. सकाळी लवकर घरट्यातून बाहेर पडणारे पक्षी अधिक भक्ष्य खातात. आपले जगणे नेहमीच न्यायाने चाललेले नसते. कदाचित आपलाच काही दोष असेल. हे व असेच काही धडे त्या शहाणपणाने आपणाला शिकवले होते. कमाईच्या हिशेबाने खर्च करावा. पोराटोरामच्या हाती नव्हे तर प्रौढ पोक्त माणसांच्या स्वाधीन सत्ता करावी. या तत्वाच्या आधारे कॉमन सेन्स जिवंत होता. धर्माचा बाजार झाला. बळी गेलेल्यापेक्षा गुन्हेगारानाच सवलती वारेमाप मिळू लागल्या. तेव्हा कॉमन सेन्सने अंथरुण धरले. दरवडेखोरापासून बचाव करण्याचे स्वातंत्र्य निघून गेले. उलट घरलुटारूच घरमालकावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करू लागला, तेव्हा कॉमन सेन्सने आपला प्राण सोडला. त्या आधी कॉमन सेन्सचे आई वडील "सत्य आणि विश्वास" मेलेले आहेत. कॉमन सेन्सची बायको "दूरदृष्टी" परलोकी गेली आहे. "जबाबदारी" नावाची मुलगी नजरेसमोर मरण पावली आणि "बुद्धी" नावाच्या पोटच्या मुलाने आपला श्वास थांबवला आहे. कॉमन सेन्सची सावत्र भावंडे कब्जा करुन आहेत. त्यांची नावे अशी--

१. मला माझे हक्क पक्के ठाऊक आहेत.
२. ते मला लगेच मिळाले पाहिजेत.
३. दुसराच कुणीतरी दोषाचा धनी मानावा.
४. सगळ्यानी मिळून माझा बकरा केला आहे.

कॉमन सेन्स मेले याची वार्ताच नसल्याने अगदी मोजकी माणसे मर्तिकाला हजर होती.

थॉमस फ्रीडमन हे अमेरिकेतील भारी विचारवंत पत्रकार आहेत. त्यानी अलीकडेच अमेरिकेत तिसरा शहाणा राजकीय पक्ष पुढे यायला हवा असे आग्रहाने म्हटले आहे. गुंतलेल्या हितासंबंधाना आधार देण्यात रिपब्लिकन आणि डेमोक्रटिक पक्ष पुरते रुतले आहेत. खाजगी गुंतवणदार, नफा-तोटा, निवडून यायचे आणि सत्ता- धन कमावायचे, यातच अडकून पडलेल्या सट्टे बाजारी पक्षाना डच्चू द्यावा आणि देशाला ग्रासून राहिलेल्या संकटामधून बेधड़क बाहेर येण्याची हाक देणारा, जे ऐकायला हवे आहे तेच नेमके ऐकवणारा असा हिम्मतबाज राजकीय पक्ष अमेरिकेला हवा आहे.

वॉशिंग्टन, लिंकन, केनेडी अशी राष्ट्राला सर्वांगानी उठून उभे रहा असा दिव्य मंत्र देणारी माणसे हवीत. आज सारा देश खुज्या माणसांचा झाला आहे. चिनी स्पर्धकांशी अमेरिकन धावपटू स्पर्धा करणार होता. चिनी स्पर्धक म्हणाला,"मीच स्पर्धा जिंकणार" आणि त्यानेच स्पर्धा जिंकली. अमेरिकन धावपटू मोठा बर्गर खात होता. बुदगुल्या धावपटूला धावता कसे येणार? अमेरिकेच्या स्वावलंबी सामर्थ्याबद्दल टिप्पणी वाचा. स्वातंत्र्यामधून समृद्धी येते. सारे मुबलक झाले की माणसे स्वार्थी बनतात. स्वार्थातून आत्मसंतुष्टपणा येतो. जे आत्मसंतुष्ट असतात ते इतराबद्दल उदासीन,बेपर्वा राहतात. ही बेपर्वाई परावलंबनाकडे नेते. परावलंबन म्हणजेच परतंत्र होणे.

मेलेल्या प्राणीदेहावर तुटून पडायला गिधाडे जमावीत तसे भारतात राजकीय पक्ष जमा झालेले आहेत. कुणाला जातीची, कुणाला प्रदेशाची, कुणाला भाषेची, स्विस बँकेतील गुप्त धनाची नखे आणि चोची फुटल्या आहेत. अमेरिकेतील रेड इंडियन जमाती एकमेकांशी लढून नष्ट झाल्या. ज्या उरल्या त्यांच्या जमिनी गेल्या. सत्ता गेली. व्यवसाय गेले. धर्म गेला. त्यांच्यातले काही धनदांडगे बनून नेवाडा राज्यात जुगार महाल खोलून बसले. तसेच भारतातील इंडियन्स करीत आहेत. परस्परांचे लचके तोडावेत, एकमेकाना अडचणीत गाठावे. कशाचेतरी भांडवल करुन निवडणुका जिंकाव्यात. त्यातून सत्ता,पैसा सारे काही! पुन्हा त्यातून इलेक्ट्रोनिक्स नावाच्या महाशक्तीने लबाडी, शोषण याना प्रचंड बळ पुरवले आहे. नेहरू, सावरकर, विवेकानंद, आंबेडकर यांची स्वप्ने, मायभूमीची भक्ती, दीनदलितांची खरी कळकळ, सकलहिताची दृष्टी कुठे आहे? डोके घट्ट बांधून बायकी आवाजात स्फुंदत स्फुंदत पंतप्रधान बोलतात. भर दिवसा आम्हा दिसू लागते रात!

सकल राष्ट्राला सामर्थ्य पुरवणारे नेतृत्व या देशात नाही. एक देश म्हणून जगावे ही इच्छाशक्ति हवी, असा कुठेतरी कॉमन सेन्स जागा होतोसुद्धा. श्री.वसंतराव पळशीकर यानी २००२ मध्ये वर्धा येथे विचारवेध संमेलनात सांगितले,"जागतिकीकरण, उदारीकरण यांच्या आव्हानाना यशस्वीपणे तोंड द्यायचे तर राष्ट्रात ऐक्य हवे. राज्य बलशाली हवे. परिवर्तनवादी आंदोलनाने स्वतःला प्रश्न विचारायला हवा की त्याची राष्ट्रवादी बैठक कोणती? "भारताची इतिहासपरंपरा अमुका तमुकाची आहे. आमची नाही. आम्ही कधी एक समाज, एक लोक नव्हतो. तेव्हा हे राष्ट्र आमचे नाही". असेच म्हणायचे तर राष्ट्रवादाच्या उभारणीसाठी आम्हाला पायाच सापडणार नाही.

कॉमन सेन्स तर आता मेलाय! मग कसे करणार?

पानवाला....

Tuesday, November 30, 2010

म्हातारपण गात्रांना असते. स्वप्नांना नाही!

ज्यांची उपयुक्तता संपते त्यांचे रानातले फक्त तण बनते. तृण सर्वाना हवे असते. तण नकोसे होते. आज म्हातारी माणसे घरोघरी नकोशी होताहेत. ओझी बनताहेत. जेथे अजून मोठी कुटुंबे आहेत, तिथेही संसार अलग होताहेत. म्हातारा म्हातारी झालेल्या माणसाना औषधपाणी कुणी करायचे? तस्त कुणी आणून द्यायचे? 'दुखणाईत हा जळे दिवा -- खोकत खोकत काजळ ओकत - कुबट करी ही दमट हवा'! खाण्याची बडदास्त कशी ठेवायची? गावातल्या गावातही महिनाअखेर बिस्तरा घेऊन दुसरा उंबरा चढ़ावा लागतो. नाहीतर वृद्धाश्रमामध्ये रवानगी! ते तर रुग्णालय! ' 'टोकावाचुन चालू मरणे- ते त्याचे होते जगणे'. ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या बैठकीमधूनही ज्येष्ठाना जगण्याचा मार्ग सापडत नाही. कीर्तने पेंग आणतात. परदेशी मुलांकडे जावे. ग्रीनकार्ड प्रथम. मग परदेशी नागरिकत्व. हा उड्डाणउतारासुद्धा विफलतेच्या घसरतीला लागलेला.

'पैलतीर" नावाचा चित्रपट व्ही.सी. डी.वर बघता येतो. योगेश सोमणने लिहिला. अरुण नलावडे, रमा जोशी यानी Canada मधील ज्येष्ठांचे वृद्धावसान दाखवले. मग 'मातीची चूल' पिक्चर पाहण्याची हिम्मत उरत नाही. तक्रारी त्याच. उबग येणे. हुंदके देणेही तेच. आढ्याकड़े डोळे! अमेरिकेतील वृद्धांसाठी हिरव्या कंच बागांची, श्रीमंत, गरम पाण्याची कुंडे असणारी अलिशान घरे आहेत. महिना खर्च तीन हजार डॉलर्स. अलिशान शीतपेटी, प्रशस्त खड्डा यांचे आगाऊ बुकिंग. अमेरिकेत जन्माला आलेल्या गौरकायाना जन्माच्या क्षणापासून वेगळ्या खोलीत झोपणे, कुमार अवस्था गाठली की अलग निवास, अलग कमाई यांची सवय असते. ' 'माझ्या नशिबाचा मी स्वामी ' म्हणून ही माणसे आपल्या कारमधून वावरतात. सहलीना जातात. पण त्यांच्या डोळ्यातील पार गोठलेपणा लपत नाही. नेवाडा राज्यातून Death Valley कडे म्हणजे मरणाची दरी नावाच्या भयाण मुलुखाकडे रस्ता जातो. मोहावे नावाच्या वैराण प्रदेशातून सारा प्रवास. Death Valley च्या तोंडाशीच एक कोरडे रखरखीत, विशाल कुंपण लागते. आत वापरामधून काढून टाकलेली हजारो विमाने जणू वृद्धाश्रमात टाकलेली आहेत. एकेकाळी आकाशी झेप घेणारी निळ्या स्वप्नांची ही विमाने Death Valley कडे पाहत आता कायमची उभी आहेत. त्याना पाहिले की पोटात खड्डा पडतो. तोही लगेच बुजवायला हवा. नाही तर कुणासाठी तरी वापरला जाईल.

प्रश्न सोपा नाही. निकडीचा मात्र आहे. हा प्रश्न श्रावणबालकाला सोडवता येणार नाही. कावडीत बसलेल्या अंध आई बाबानाच आपली कावड सोडून बाहेर यावे लागेल. काशीयात्रेचे पुण्य जोडायचे म्हणून श्रावणबालकाचे तारुण्य वाया घालवायचे पाप जोडायचे का? याचा विचार श्रावणबालकाच्या आईबाबानी करायला हवा. मुक्या माणसालाही वाचा फुटू शकते. पंगू माणूससुद्धा डोंगर ओलांडून जातो. अंध माणसाच्या गात्राना डोळे लाभू शकतात. दोन्ही पाय गुडघ्यातून गेलेल्या तरुणाने परवा तुफान कसरतीचे नृत्य एका स्पर्धेत हजारोंच्या समोर करुन दाखवले. वृद्धांनी आपण वृद्ध म्हणजे समृद्ध आहोत, या उभारीने 'उठा उठा बांधा कमरा' असे म्हणत खरेच उभे राहिले पाहिजे.

कासवीण बनून तिच्या नजरेने नव्या उमलत्या पिढीकड़े पाहिले पाहिजे. कासवीण दुरून आपल्या पिल्लांकडे मायेने पाहते. पिलांचे रक्षण, पोषण तिच्या नजरेतून होते. पुत्ररूपाने आपण जगायचे, जिवंत राहायचे तर मुला-मुलींच्या फुलत्या, उमलत्या, फोफावत्या संसाराना भरल्या तृप्त डोळ्यानी आशीर्वाद आपण द्यायला हवा. आपली स्वतःची फ़ालतू चिंता नको. स्वतःला विसरा. मुलांची काळजी करा. आपली मुलेसुद्धा प्रौढ़त्वाची पायरी वेगाने पार करीत आहेत. त्यांचेही वार्धक्य त्याना लवकर भीती घालेल, भेटत राहील. त्यानाही संध्याछाया भिववू लागतील. आपणाप्रमाणेच आपल्या मुलानी त्यांच्या मुलांसमोर लाचार, हतबल होता नये. जे तुम्ही आज तुमच्या मुलापुढे म्हणाल, तेच तुमची मुले पुढच्या पिढीपुढे कदाचित मांडतील. खलील जिब्रान यानी एक मार्मिक कथा लिहिलीय. पिकलेली पाने भराभरा खाली पडत होती. आवाज करीत होती. खालचे गवत त्रासले. " "काय ही कटकट?आम्हाला झोपू पण देत नाही तुम्ही?" पिकली पाने रागावली. " "क्षुद्रानो! कधी वर आलात काय? भव्य स्वप्ने पाहिलीत काय?" पुढे खाली पडलेली पानेच गवत झाली. पुढच्या पानझडीच्या समयी झाडावरुन खाली पडलेल्या पानाना नावे ठेवू लागली. हे असे आपल्या बाबतीत व्हायला नको.

स्वतः मधून निसटला त्याला मोक्ष भेटला. आम्ही मुलाना वाढवले. मग आम्हाला नको का त्यानी आधार द्यायला? हा विचार लाजिरवाणा आहे. मुलानी आपल्या आयुष्यात येणे, रांगत रांगत सारे घर सोन्याचे करणे, दफ्तर घेऊन शाळेत जाताना मुले दिसली की आपल्या डोळ्यांची पाखरे होणे-- हे सारे आपले श्वासोच्छ्वास आहेत. मुलांसाठी आपण खाल्लेल्या खस्तांचे बिल शून्य आहे असे आई मुलाच्या उशाशी लिहून ठेवते. आचार्य अत्रे यानी लिहिलेला हा धडा आमच्या पुस्तकात होता.
वृद्धानी समाजाचे धन बनावे. कर्ज बनू नये. जे उपयुक्त आहे, दो हातानी वाटून टाकणारे आहे, त्याकडे माणसे यांचे देणे लागतो अशा नजरेने पाहतात. वन्य जमातीमधले वृद्ध जमातीचे प्रमुख असतात. ते शहाणपण देतात. लढावे कसे? शिकार कशी करावी? औषधे कोणती? एकजूट कशी राखावी? हे सांगून जगणे जागवतात. तरुण पिढी आदर राखून राहते. आज वैद्यकशास्त्राने आयुर्मर्यादा वाढवली. माणसे नको एवढी जगू लागलीत. एकत्र कुटुंबे विसर्जित होताहेत. खेड्यातल्या जुन्या ग्रामव्यवस्था मोडीत निघाल्यात. आजीचा बटवा कुणाला हवा? आजोबानी शिकवावे असे काही उरलेले नाही. एकूण कुटुंब या सामाजिक संस्थेची कामे शाळा, पुस्तके, दवाखाने, लॉजिस, होटेल वगैरे नव्या सोयीनी बळकावली आहेत. आजोबा कोणता इतिहास, कोणता भूगोल सांगणार? त्यानाच टी. व्ही.चा सत्तेचाळीस बटने असणारा रिमोट नातवाकडून समजावून घ्यावा लागतो. नातू संगणक पकडून असतो.

आजोबा, आजी ही माहिती पुरवणारी साधने राहिलेली नाहीत. पण व्यावहारिक समजशक्ति वयाबरोबर वाढायला हवी. वाढत जाते सुद्धा. ७०व्या वर्षी जे आकलन होते ते २५व्या वर्षी आकलनात येत नाही. वय ही वाढ आहे. क्षय नव्हे. मग आता कुटुंबाची जुनी कामे ज्या संस्थांकडे त्या कामांच्या विकासासाठी त्या त्या संस्थांकडे आजोबांनी जायला काय हरकत आहे? कितीतरी सामाजिक कार्ये आत्मीयतेची भुकेली आहेत. संशोधनाच्या दिशा वाट पाहत आहेत. मग असा धरी छंद -जाय तुटोनी हा भवबंध! वार्धक्याची उंची दूरवरचे दाखवते.

बाबा आमटे याना कुठे म्हातारपण छळत राहिले? ग.प्र.प्रधान आपले घर साधना साप्ताहिकाच्या स्वाधीन करून आपण वानप्रस्थी झाले. पण लेखन, कार्यकर्त्याना मार्गदर्शन चालूच ठेवले. गो.नी. दांडेकर गड चढत राहिले. बायको निधन पावली होती. एकुलता कर्ता मुलगा डोळ्यासमोर मरण पावला. एकटे एकटे राहिलेले माधवराव राणे नावाचे संशोधन तपस्वी सिंधुदुर्गातल्या माणगाव ग्रामी टेम्ब्ये स्वामींच्या सावलीखाली पोथ्या पुराणे, इतिहास ग्रंथ, लोककथा अभ्यासत राहिले. वय वर्षे ८४. स्वतःच आमटी भात शिजवून खाणार. तब्येत चांगली .घंटा वाजू लागली. बिस्तरा उचलला.कुडाळशेजारी आपल्या रानातल्या घरात एकटेच राहिले. शांतपणे एक दिवस उगवत्या सूर्याबरोबर आयुष्याच्या समाप्तीला निघून गेले. या माधवाने जगण्याचा अभंग केला.

अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे मी एक जराजर्जर बाई शाळा सुटायच्या सुमारास STOP असा बावटा घेउन रस्त्यात उभी राहिलेली पाहिली. शाळा सुटल्यावर घरी जाणारी चिमुरडी बिनधास्त रस्ता ओलांडून जावीत ही तिच्या जिवाची धडपड होती. मला त्या माऊलीचे पाय धरावेसे वाटले. पण तिच्या हातात माझ्यासाठी STOP हा बावटा होता.
पानवाला

Tuesday, November 23, 2010

ई-बुकांचे डिजिटल वादळ!

विसरा तो जुना घोष, नवी पुस्तके छापा छापा--- -बुकांच्या राशीमधुनी येतो आहे गणपतीबाप्पा! -बुके म्हणजे डिजिटल पुस्तके. त्याना कव्हर नको. छपाई नको. घट्ट बांधणी नको. पाने नकोत. ती उलटणे किंवा दुमडणे नको. पुस्तकातला ताव गेला. (मग तावदारणे कशाला?) काचेवर अक्षरांची चित्रे येणार. काचेवर बोटे फिरवा. हवा तो मजकूर मिळवा. पूर्वी पुस्तकांचे किती ते लाड? पाण्या पासून वाचवा. तेलापासून जपा. ढिले पडू देऊ नका. मग पाण्यात पडूनही तुकोबांचे अभंग तगले कसे? तुकारामांची गाथा हे मराठीतले पहिले ई-बुक असले पाहिजे. कागदावर लेखणीने अक्षरे काढणे म्हणजे साक्षरता नव्हे. आता इंटरनेट साक्षरता आलीय. ती जगभर, शाळाभर, गल्लीभर (आणि गल्लाभर सुद्धा) पसरली आहे. -बुके सर्वाना माहिती पुरवणार.. डिजिटल हे जागतिकीकरण अर्थशास्त्रातच आहे असे नाही तरशब्द आणि त्यांचे अर्थया शास्त्रातही घोंगावत आहे.

हे डिजिटल वारे या आधीच छपाईक्षेत्रात घुसले आहे. संगणकावर मजकूर येतो. त्याच्या प्रती निघतात. कागद मात्र शाबूत. बांधणी चालूच. घडी, सुरळी अगदी सुरक्षित. पण गुटेनबर्गच्या प्रेसची दाबादाबी, छापाछापी कुठे राहिली? चाके फिरतात पण प्रेस नावाचा दाबाचा पट्टा कुठे आहे? मग `प्रेस` ला प्रेस असं का म्हणायचं?  तुम्हाला ठाऊक आहे? पहिली -बुके गुटेनबर्गचे नाव सांगतच १९७१ मध्ये आली. मायकेल हार्ट नावाच्या इसमाने गुटेनबर्ग प्रोजेक्ट तयार केला आणि ई-बुकांची उलाढाल सुरु केली. आपली छपाई उडवली. अक्षरांच्या आकृत्या उमटवल्या म्हणून गुटेनबर्गचा आत्मा कासाविस झाला असेल का? मुळीच नाही. त्याच्या आत्म्याला मुक्तीच मिळाली असणार. गुटेनबर्गने कात टाकली. कात टाकली की फणा काढून पुढे धावता येते. छपाई आली तेव्हा हस्तलिखितांचा, पोथ्यांचा काळ संपला. माहितीचे क्षेत्र खुले झाले. छपाई मधून काहीही छपून राहत नाही. हे ध्यानी आल्यावर मक्तेदारानी काय कमी आरडाओरड केली असेल?

परवा 'हरिश्चंद्राची फैक्टरी ' हा चित्रपट पाहत होतो. चित्रपटाची फिल्म तयार करायची. प्रोजेक्टरमधून पुढील पडद्यावर हालचाल करणारी चित्रे दाखवायची याचा ध्यास घेतलेल्या दादासाहेब फाळके  याना समाजाने         मनोरुग्णालयात नेले. हरिश्चंद्र आणि तारामती यांचे आख्यान नाटकामधून लागत नाही का? मग सरकती चित्रे कशाला हवीत? अशी आरडाओरड दादासाहेब फाळके यांच्या "अयोध्येचा राजा"विरुद्ध रंगभूमीवरील हरिश्चंद्र तारामतीनी सुद्धा केली असणार. आजचे रंगभूमीवरचे नट आणि नट्या नाटकाचा पडदा वर जाण्याआधीच चित्रपटाच्या पडद्यावर पोचलेल्या असतात. अखिल भारतीय, जागतिक अशा पुरस्कारांची धन्यता चित्रपटाना मिळणे हा रंगभूमीचा विस्तार म्हणायचा की विसर समजायचा? थांबला तो संपला---धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे!

आता इलेक्ट्रोनिक नावाचे टॉनिक माध्यमाना मिळाले आहे. संगणकावर ई-मेल आली. ही इलेक्ट्रोनिक डाक क्षणभरात जगभरात धावते. संक्षेपातचि आणतो कथा सारी! ऑरकुट काय, फेसबुक काय - माणसे दूर दूर समुद्राच्या पैलतीरी राहूनही गप्पा मारायला लागलीत. कंपन्यांच्या मोठ मोठ्या बैठका, वाटाघाटी, व्यवहार मोठ्या पडद्यावर येऊन एकमेकांकडे बघत होताहेत. आपापल्या घरट्यात जो तो आपल्या ह्याच्यात. पण दिसतात मात्र सारे एकमेका पुढे कोचात. Future Shocks नावाच्या पुस्तकात भाकित केल्या प्रमाणे माणसे आज मोठ्या प्रमाणावर घरी बसूनच ऑफिसची कामे करताहेत. अर्थात रस्त्यावरची वाहनांची गर्दी हटली नाही. मॉलकड़े माल खरेदीसाठी गाड्या धावतच राहणार. ते असो! पण डिजिटल, संगणक, इंटरनेट वगैरे संचारानी माणसाचे काय काय करुन ठेवले आहे, हे नुसते पाहिले तरी जीव गडबडून आणि गलबलूनही जायला होतय! ग्लोबलायजेशनला कुणीतरी (मला वाटते मीच!) गलबलाय्जेशन असे म्हटले आहेच मुळी!

डिजिटल नावाच्या "भानामतीने" पुस्तक लिहिणे, वाचकांना ते डाउन लोड करुन देणे, लेखकानी ई-बुके लिहिणे, प्रकाशित करणे याबाबत जी काही अजब उलाढाल आणली आहे तिचा मती भानावर ठेऊन पुस्तक जगातल्या माणसानी विचार करायला हवा, म्हणुनच मी डिजिटल विद्येला "भानामती"असे म्हटले आहे. ई-बुके आल्यावर वा येत असताना एकूणच साहित्य या प्रकाराचे वजन, उंची, वाचनाचा मूळ हेतू, साहित्याचे भवितव्य, साहित्य प्रकारांची पडझड वा नवे धुमारे यांच्या बाबत आजतरी साहित्यिक मंडळी काही म्हणजे काही बोलत नाहीत. साहित्यात नवरस आहेत. त्यांच्या मध्ये इंटरनेट वरुन एखादा व्हायरस शिरेल काय याची कुणालाही चिंता का बरे नाही? एकाही मराठी साहित्य संमेलनात ई-बुका बद्दल चर्चा नाही. परिसंवाद सोडाच. मराठी मधील विज्ञान साहित्यालाही मराठी बुजुर्गांच्या हिशेबी फारशी जागा नाही. सायन्सकथांना कोणी विचारत नाही म्हणून हताश होउन  नारायण धारपांनी भय कथा लिहायला घेतली. धारप यानीच हे लिहून ठेवलेआहे. डॉ.बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डॉ.जयंत नारळीकर अशा विज्ञान साहित्यिकानीच आता मराठीत येत असलेल्या डिजिटल साहित्य प्रकाराबाबत सांगायला हवे.

मराठीत -बुके आलीत म्हणतात. दवबिंदू नावाची मराठी वेबसाईट आहे. नेट भेट नावाच्या मासिक वेब साईट वर एकट्या अनिकेत समुद्र यानी सात बुके लिहिलीत. मराठी ब्लॉग कट्टा वावरत आहे. पण बुके वाचण्यासाठी खास उपकरणे उदा. Apple ची Ipads वगैरे काचेवर बोटे फिरवायची सामग्री लागते. ती ई-मराठी बुकांसाठी येणार का? अमेरिकेत ही सामग्री दिसते. खाजगी वापरातसुद्धा दिसते. मराठीचिये नगरी काय घडणार?

ते काही असो. टाळी द्या मित्रानो! रान मुक्त आहे .पु..देशपांडे यांनीजो जे वांछील तो ते लिहो'' असे म्हणून पिकात गुरे सोडली आहेत. मला पेपरवाले सदरे देत नाहीत, प्रकाशक नाही म्हणतात. काय करावे? कोठे लिहावे?”  अशा वेळी ई-बुक तसेच ब्लॉग कामास येतो. जगी ज्यास कोणी नाही, त्यास ब्लॉग आहे. तिथे जा आणि आपल्या उत्कट भावना विचारांचा निचरा करा. लिहिणे स्वान्त: सुखाय असते ना? मग जा ब्लॉग मध्ये. रिकामा सुतार काहीतरी ताशी --तशी तुमची माझी ही खर्डेघाशी! हलके हलके वाट्ल्याशी कारण!

आणि तसच काही नाही बर का? गुगलवर टिचकी मारा. ब्लॉग लेखांचे ढीग हाती लागतील. वाचणार कोण? लिहिणारा जो कोणी त्याने लिहीत जावे. ब्लॉगवर उमटत यावे. ब्लॉग म्हणजे रामघळी आहे. रामदासानी आपला दासबोध रामगुहेतच लिहिला. पण कधीतरी आलाच की नाही बाहेर?

पानवाला.