Monday, February 7, 2011

कविता वेचत जाणारा एक वेडा चकोर!

मला कधीतरी अचानक पंचवीस पैशांचे कार्ड पोस्टातून येते. पत्ता लिहिण्याच्या बाजूला भारत सरकारच्या कल्याण मंत्रालयाचा गुलाबी छापील संदेश असतो. मागील कोऱ्या बाजूवर मात्र वेड्यावाकड्या ओळीमधून शब्दांची उभी आडवी पाखरेच पाखरे असतात. एका वेड्या कविताप्रेमी जीवाने चोच भरून जमा केलेल्या कविता माझ्यापुढे मांडलेल्या असतात. खिडकीसमोरच्या फांदीवर नाचरा पक्षी शेपटीचा पंखा फुलारून कधी बसेल याची खात्री नसते. मात्र तो आला की चोच इकडे तिकडे फिरवेल, मानेचा नखरा दाखवेल. तालात काय नाचेल. तसाच हा कलंदर कविता-संकलक आपल्या उरावरच्या रेघा किती किती प्रकारे मला दाखवेल याची आधी दाद लागत नाही. तो तशी दाद लागू देणारही नाही. पण दाद मागत मात्र राहणार. या भन्नाट माणसाने प्रथमच मला लिहिले होते ,"काव्याला दोन गोष्टी मारक ठरतात. एक-जाण नसते त्याची मिळत राहणारी दाद आणि दोन-जाणकाराचे मौन! तुम्ही मौन सोडले आहे ना?"

या लोकविलक्षण कवितावेड्याच्या एका पायावरून आणि उजव्या हातावरून वारे गेले आहे. पण डाव्या हातात संचार भरलाय. असे वारे गेले म्हणून काय झाले? कवितेचा श्वास वारा अंगभर घुमतोय ना? बोलणे कमी. बघणे हेच बोलणे. डोळे सदोदित कविता शोधणारे. कुणाकुणाला कविता धाडत राहणारे. फायलीच फायली अवती भवती. त्यात कविता गरम गरम श्वास टाकत असतात. या कविता त्याने कुठून आणल्या? कुण्या कवीच्या त्या आहेत?कधी त्या भेटल्या? हे असले कधीही त्याला विचारायचे नाही. भुंगा पुढे आला तर त्याला कुणी विचारते का  की बाबा तू कोण, कोणत्या फुलामधून मध जमा केलास म्हणून? त्याला तरी ते सांगता येणार का? तो काय म्हणेल? तो म्हणेल,"मधुकर माझे नाव असे. जिथे जिथे रसगंध उमलती तिथे तिथे मम गाव वसे!" या कवितावेड्या संकलकाने पहिल्याच पत्रात मला लिहिले होते-"मी पाठवलेल्या कविता हा माझा आनंदाचा ठेवा आहे.या कवितामधून मी आई वडीलाना शोधत असतो. ते मला दिसतात. संग्रहित कवितामधून आपल्याला झाडे, चिमणी पाखरे, शेत एवढी प्रकर्षाने भेटतील. कृपया यांचे कवी कोण एवढे विचारू नका. मी लिहीत नाही." "मी लिहीत नाही म्हणजे मी कविता लिहिणारा नाही", की "याबाबत मी काही लिहिणार नाही" या संदिग्धतेचा मीही कधी बाऊ केलेला नाही. आयुष्याचे शेत, आई-वडिलांची झाडे आणि फांद्या-फुलांचा निवारा करणारी जिवाची पाखरे एवढा संदर्भ मला पुरेसा आहे. पाखरू आयुष्याच्या संध्यासमयी काळजात कविता जपून आहे हेसुद्धा मला ठाउक आहे. मला पाखराचे पंख मोजायचे नाहीत. त्याच्या उरातली कविता वाचायची आहे.

कविता हे खरोखरीच वेड आहे. मग हे वेड कसे आणि का बरे लागत असावे? कविता ही तरी काय चीज आहे? लिहिली म्हणून ती कविता असते का? गायले गेले म्हणून गीत गाणे बनते काय? उच्चारला गेला तरच तो शब्द असतो का? तसे असेल तर मग आत्मसंवादच गेला. 'शब्दाविन संवादिजे'असे माऊली  का बरे म्हणाली असेल? तरीसुद्धा शब्द हवाच असतो. शब्दांच्या पलीकडे जे काही असते ते सांगायलासुद्धा शब्दानाच यावे लागते. शब्द हे साक्षात ब्रह्म आहे.कविता म्हणजे तुम्हाला सांगतो, एक यड ताक आहे.कविता हा माणसाचा श्वासवारा आहे. माणूस जन्माला येतो आणि मग त्याला श्वास मिळतो हे खरे नाही. श्वासवाराच माणसाच्या रूपाने आईच्या उदरात, घरट्या मधील पिलासारखे ऊर वरखाली करीत राहतो. मग बाहेर येतो. श्वासवाराच डोळे उघडतो. त्याला गंध भेटतो. रसवेदन खुलवते. श्वासवाराच नादब्रह्माचा अवतार! असा हा श्वासवारा मग जीवाला ऊन, पाऊस, नाजुक पाऊले आणि कठोर रपाटे यांची विलक्षण दुनिया दाखवत राहतो. कविता माणसाला उपरी नसते. ती त्याच्या रक्तात, हृदयाच्या ठोक्यात असते. 'सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे. प्रीतिसारिकेचे गीत तियेचे ऐकावे कानी - आणि मग बनवावे मन धुंद रंगुनी काव्यसुधापानी' हे वेड बालकवीना  गुरुजीनी लावले काय? 'स्वयं नाद्ब्रह्मात गुंग  होणारा, शब्दजगताचा चतुर विधाता तो - जगन्मोहन या खगापरी गातो' अशी ग्वाही चंद्रशेखर कवीनी दिलीय ना?

जेव्हा तुम्ही कविता समरसून वाचता, तेव्हा तुम्ही स्वतः कवीच असता. प्रा.रमेश तेंडुलकरानी १९९७च्या अधिष्ठान या दिवाळी अंकात लिहिलय,"एके काळी प्रत्येक आदिमानव हा कवी होता. वस्तूना शब्द देणे  हीच स्फूर्ति होती. एकेकाळी जग कसे ताजेतवाने, गरमगरम, अगदी फ्रेश होते. अशा वेळी बोलणे म्हणजेच कविता करणे. म्हणून तर साहित्याला वाणीमय - वाणीरूप असे म्हणायचे ना? आणि पुन्हा असे की कवींची नावे विचारण्याची आपली परंपरा नाही. लोकगीते कोण लिहिते? ती सर्वांची असतात. रानात सीता प्रसूत होते. कशी? लोकगीत आपणाला सांगते-

                              'एवढ्या वनामंदी कोण रडते ऐका--
                               सीतेला समजाया बोरीबाभली नायिका'

लोकगीत गायले जाते ते ऐकायचे. कुणी लिहिले, उच्चारिले ते विचारायचे नाही. माझा वेडा चकोर कविता संकलक मला कार्डामधून उरीचे उसासे कळवतो.

   'उगवायच म्हटल काहीही तरी--जमिनीसारख मन थोड़े तरी --सुपीक असायला हवे'
   'बकुळी म्हणते सावळ्या रंगान हिरमुसायचे नसते --गुण गंधाने सर्वाना जिंकायचे असते'
   'मी झाडाला चिमण्या पाखरांशी आणि चिमण्या पाखराना झाडांशी बोलताना पाहिलय,
   'आणि मीही माझे एकटेपण जपत--आईला तुलशी रोपाशी बोलताना कैकदा पाहिलय'   
   'सबंध अंगभर दाटीवाटीने फांद्या खोचून घेतल्या--तेव्हा कुठे मी झाडासारखा दिसू लागलो,
   'वेदना रुतल्या नाहीत--फान्द्याना पाने होती, फान्द्याना फुले होती,
    'चिमण्या पाखरांची खूप खूप वाट पाहिली --हात पसरले पण पाखरे काही परतली नाहीत'  

माझ्या वेड्या कवितावेचू मित्राचे शेत कधीच अंधारून गेले आहे मग ----
           "शिवारात आता बैल दिसत न्हाईत --का कुणाची बी --
             माज्या s s राजा, माज्या s s सर्जा  अशी साद येत न्हाई--
             सार शिवार आता मुकं झालय"

असे शिवार मुके होते तेव्हा कविताही मुकी  होते. आणि मग मुकेपण स्वतःच कविता बनते!

- पानवाला.

No comments:

Post a Comment